Sufi
भाग: २ 

सर्वेक्षणातून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा केला. खरे तर वास्तव किती वेगळे आहे ते जाणवले. कारण
पौगंडावस्थेतील मुली आणि स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक आणि टॅबू पद्धतीबद्दल विचारले तेव्हा स्पष्टीकरण देण्यास त्या असफल राहतात. त्यांचे म्हणणे असते कि, आम्ही केवळ त्या पाळत आलो, कारण त्यांना असे करण्यास सांगितले गेले.

या अंधश्रद्धामध्ये, धार्मिक प्रथा, धार्मिक स्थळांपासून दूर राहणे, औषधे न खाणे, नवीन कपडे न घालणे, लोणच्याला स्पर्श न करणे, काजळ न लावणे, अतिथींचे आदरातिथ्य न करणे, अन्न न शिजवणे या आणि अशा इतर गोष्टींपासून दूर राहण्यास पाळीच्या पहिल्या दिवसापासून सांगितले गेले.

झोपडपट्टीतील मुलींमधील मासिक पाळी आलेल्या मुलींमध्ये सामान्यतः गैरसमज आहे कि या दिवसांत अंघोळ केल्यास रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होतो. तसेच काही कुटुंबांमध्ये केसांवरून पाणी घेण्यास कठोरपणे बंदी आहे, कारण गर्भधारणेच्या काळात प्रसूतीदरम्यान यामुळे धोका उद्भवतो असा समज आहे. त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये, प्रत्येक वेळी मासिक पाळीच्यावेळी शौचालयास गेल्यानंतर तिला तिचे हात मातीने धुवावे लागत असे, त्यानंतरच ती शुद्ध मानली जाते.

थोडक्यात, या काही अंधश्रद्धा आहेत, ज्या किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीची भीती निर्माण करतात. या टॅबूमुळे या रूढी अजूनही प्रचलित आहेत. त्या भीतीदायक पद्धतीने मांडल्या जात असल्यामुळे स्त्रीयांच्या शरिरावर जीवघेणे परिणाम होत आहे आणि ‘ मासिक पाळीला’ सामाजिक दृष्टिकोनातून क्षुल्लक समजून दुर्लक्षित केल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने, मासिक पाळीबाबत अज्ञान वाढतच चालले आहे.  
शहरी, ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग पातळीवरील मासिक पाळीचे स्वरूप हे सर्वेक्षणानुसार आधारे मांडले आहे ते पाहूया;
सर्वेक्षणासाठी किती लोकांचा सहभाग?

तर, शैक्षणिक वार्तालेखाचे प्रात्यक्षिक प्रमाण आणि आकडेवारी याकरिता मी सिन्नर, गोंदे या खेड्यातील आणि नाशिक, पुणे, मुंबई या शहरातील सर्वसामान्यांची मानसिकता, सामाजिक दृष्टिकोन  समजून घेण्याकरिता सर्वेक्षण केले. त्याकरिता मी  १५-३० वयोगटातील २५ स्त्रिया, ३०-४५ वयोगटातील २५ स्त्रिया आणि ४५ वयानंतरच्या २५ स्त्रिया यांच्याकडून प्रश्नावली भरून घेतली.
त्याचबरोबर सदर  विषयात पुरुषांचा सहभाग जाणून घेण्यासाठी पुरुषांकरिता वयोगटानुसार प्रत्येकी २५ अशी प्रश्नावली भरून घेतली आणि विषयाचे सविस्तर आकडेवारीनुरूप आणि पाय चार्टद्वारे हि आकडेवारी मांडली आहे.
तसेच, स्वयंसेवी संस्थांचे कार्य जाणून घेण्याकरिता पाच संस्थांशी संपर्क करून माहिती समजून घेतली.

शहरी भागात :

प्राचीन काळापासून आपल्याकडे मासिक पाळीचा धर्म आईकडून मुलीला शिकवला जातो. पण आजच्या धकाधकीच्या शहरी स्पर्धेच्या युगात, आई ही सुद्धा मूलभूत ज्ञानापेक्षा जाहिरातीच्या गर्तेत अडकलेली दिसून येते. मुलीजवळ आईच्या आधीच टीव्हीवरील भडक व बीभत्स जाहिराती येऊन पोहचतात. या जाहिरातींत दाखवल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सवरून मुलींना हा काळ वरवरचा आणि सहज वाटतो, पण अनुभव येताच मात्र त्यांची चिडचिड व्हायला लागते. तेव्हा त्यांची सर्वांत जवळची मैत्रीण ही आई असते. मात्र या दिवसांत शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो. त्याचा साहजिकच परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. यातूनच जंतूसंसर्गापासून ते कर्करोगापर्यंतच्या आजारांना निमंत्रण मिळते. मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर शहरी भागातही तितक्याच प्रमाणात त्याचा प्रभाव अजूनही आहे. परंतु बऱ्याच घरांत जुनी पिढी होती तोपर्यंत बाजूला बसणं, घरात कोणत्याही वस्तूला हात न लावणे, काही हवं असल्यास मागून घ्यायचे त्यासाठी दुसर्यावर अवलबूंन राहावे लागायचे. आधुनिक पिढीत हे स्वरूप बदलून फक्त घरात देवासंबधी कार्यक्रम असेल तर बाजूला बसविले जाते.

सॅनिटरी पॅड्स तुमचा जीवही घेऊ शकतात…

होय, कारण शहरी भागात ज्या स्त्रिया नोकरीवर जाणाऱ्या आहेत त्या चौथ्या दिवशी सॅनिटरी पॅड्स सहा तासाहून अधिक वेळ ठेवतात. सॅनिटरी पॅड्स योनीच्या ठिकाणी अधिक वेळ ठेवल्यामुळे त्यातील प्लास्टिक आणि इतर सामग्री म्हणजेच सोडियम ऍक्रिलेट, पोटॅशियम ऍक्रिलेट, अल्किल ऍक्रिलेट हे योनीच्या भागास घातक असतात. यामुळे संसर्ग होऊन गर्भास धोका आणि तो त्रास न कळल्यामुळे जीव जाण्याचा धोका असतो.

ग्रामीण भागात :

जास्तीत जास्त मुलींनी शाळेत जावे यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न होऊ लागले. पण या प्रयत्नांनंतरही मुलींचे घरी राहण्याचे प्रमाण वाढत होते. बऱ्याच पाचवी सहावीच्या मुली मोठ्या संख्येने शाळा सोडू लागल्या होत्या. याचे कारण शोधले असता लक्षात आले कि, मुलींच्या पहिल्या मासिक पाळीत उद्भवणाऱ्या अनेक समस्या आणि नव्या अनुभवांना त्यांना तोंड द्यावे लागत होते.

ग्रामीण भागात तर मासिक पाळी हि एक समस्या वाटते आणि त्यांना या समस्येबद्दल काहीही माहिती नसते. ९-१२ वयातील मुलींसाठी तर हि मासिक पाळी एक त्रासदायक अनुभव असतो, जो समाजाने निषिद्ध मानल्यामुळे व मर्यादा घातल्यामुळे अव्यक्तच राहतो आणि परिणामी, माहिती संदर्भात ग्रामीण भागातील प्रत्येक घटक हा प्रचंड ‘माहितीशून्य’ आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांची स्थिती भयानक आहे. कारण गैरसमजुती, कर्मकांड, अज्ञान; इतकंच नव्हे तर सर्वांत मोठी अडचण आहे आर्थिक अडचणीची! हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटुंबांकडून स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी महिना २०० ते ३०० रुपये खर्च उचलणं ही अशक्य गोष्ट असते. अशा वेळेस कितीही नवं तंत्रज्ञान समोर असलं तरी ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबं ही पूर्वीपासून चालत आलेल्या कालबाह्य साधनांचाच उपयोग करतात. यामध्ये सुती वा सिंथेटिक कपडा, वर्तमानपत्रं, वाळूच्या पिशव्या, पॉलिथिन बॅग्ज इ. मासिक पाळीमध्ये केवळ सॅनिटरी नॅपकिन्सच वापरावीत असंही नाही. सुती कपडाही वापरता येऊ शकतो. पण या कपड्याची स्वच्छता ठेवणंही ग्रामीण स्त्रियांना शक्य होत नाही. त्यातून खाज येणं, जंतुसंसर्ग होणं, पांढरं पाणी जाणं यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे केवळ स्त्रियांचंच आरोग्य धोक्यात येतं असं नाही, तर संपूर्ण सामाजिक आरोग्य धोक्यात येतं, हे आपण आजही समजून घेत नाही.

ग्रामीण भागातील प्रमुख चिंता ही 'स्वच्छता' आहे. स्वच्छता न पाळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मासिक पाळीचा आजवर जपला गेलेला टॅबू! हा टॅबू गुप्तपणे आजही एखाद्या गुप्तरोगासारखा लपून ठेवला जात आहे. मासिक पाळीत महत्त्वाचं म्हणजे कापड वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही त्यात वाढ म्हणजे मासिक पाळीत वापरलेले कापड हे एकत्र कुटुंबपद्धतीमुळे ते कापड मोरीत वाळत घातले जाते. त्यामुळे दमटपणा राहून कपड्याचा दुर्गंध येतो, आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. महागडे सॅनिटरी नॅपकिन्स ग्रामीण स्त्रिया वापरू शकत नाहीत. यावर अनेक सामाजिक संस्था व आरोग्य संघटनांनी आवाज उठवला. तेव्हा सरकारी संस्था पुढे आल्या. पण या संस्थांकडून कमी दरात जे नॅपकिन्स पुरवले गेले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने स्त्रियांना जंतुसंसर्गाला समोरं जावं लागलं.

ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्य रक्षणासाठी महागडे डॉक्टर्स व खर्चिक तंत्रज्ञानही लागत नाही. लोकजागृती करून स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं एवढंच गरजेचं असतं. ‘लाख मेले तरी चालतील पण लाखाच्या पोशिंद्याला आपण वाचवलंच पाहिजे’, असं आपण म्हणतो, पण स्त्रियांकडे पोशिंदा म्हणून पाहण्याची दृष्टी जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत पुरुषी मानसिकतेतून तिच्या आरोग्याची हेळसांड होतच राहील.

आदिवासी भागात:

आदिवासी भागात बऱ्यापैकी भागात कापड वापरले जाते. परंतु काही ठिकाणी तांदूळ काढल्यानंतर त्याचे काड असतात किंवा मक्याचे आवरण वापरले जाते.

मक्याच्या कणसाचे आवरण पॅडच्या रचनेनुसार करून, त्याच्या आत राख किंवा माती किंवा गहू तांदळाचे खोड/ काड याचा भुगा करून वापरले जातात. हे पर्याय सुरुवातीला योनीच्या ठिकाणी टोचतात, परंतु याशिवाय गत्यंतर नाही हे कळल्यानंतर तेथील स्त्रिया याचा स्वीकार करून हळूहळू याची सवय करून घेतात.

एकूणच आदिवासी राहानिमाणावरून निरीक्षणाअंती लक्षात येते कि, हे लोक गहू, ज्वारी खात नाही. त्यामुळे पोषक आहार त्यांना मिळत नाही ज्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहेच. परंतु महिल्यांच्या बाबतीत सकस आहार नसल्यामुळे मासिक पाळीच्यावेळी ब्लीडींगचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते आणि अंगावरून पांढर जाणे हे तीन मुख्य तोटे समोर येतात. पण त्याचबरोबर आदिवासी स्त्रिया काटक असल्यामुळे त्यांना त्रास होतो पण त्रास जाणवत नाही.

आदिवासी अंधश्रद्धा:

आदिवासी क्षेत्रात प्रत्येक भागात अंधश्रद्धा आहे. याचे उदाहरण समोर ठेऊन गडचिरोलीसारख्या आदिवासी भागाचा अभ्यास केल्यानंतर समोर येते कि, आदिवासी भागांत मासिक पाळीतील या आठ दिवसांसाठी स्त्रियांकरिता विशिष्ट घर असते त्याला 'कूर्माघर' संबोधले जाते. या घरात पाळी आलेल्या स्त्रियांना ७ दिवस ठेवले जाते, ते वैयक्तिकही असते आणि सार्वजनिकही असते. कूर्माघर म्हणजे एक सहा बाय सहाची खोली असते, ज्यात जेमतेम महिला झोपू शकतील एवढी जागा असते. त्यातच त्यांनी खायचं, प्यायचं, बादलीभर पाणी साठून ठेवायचं, त्यातच आठ दिवस पाळीतील कापडही धुवायची आणि या घराचा मूळ हेतू म्हणजे या दिवसांत तिने बाहेर यायचेच नाही, तिची सावलीही पडू द्यायची नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर या काळात स्त्रियांना विश्रांतीची गरज असते म्हणून हि कल्पना योग्य जरी समजली तरी घटितांनुसार तेथील सगळी घरे हि बांबूची असतात. त्यामुळे तिथे राहणे सोयीस्कर नसते. जागा छोटी असल्यामुळे योग्य ती स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे मानसिक शारीरिक त्रास होत असतो. याचे उदाहरण म्हणजे गडचिरोलीत जयंतीचा अधिक रक्तदाबाने झालेला मृत्यू, ते झाल्यांनतर सात दिवसांनी कळलं.

पश्चिम महाराष्ट्रात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तीन चार माणसांच्या कुटुंबात एकाच स्त्री असते, अशा भागात ती महिला स्वतःउन येऊन गर्भाशयाची पिशवी काढून टाकते. कारण पाळी आल्यामुळे स्वयंपाक कोण करणार यामुळे ते काढली जाते. आणि याबाबात डोक्टर काही सांगत नाही कारण त्यांचा व्यवसाय त्यावर चालतो.

दिव्यांगांची मासिक पाळी

मी, तुम्ही, सरकार आणि फारफारतर स्वयंसेवी संस्था या मासिक पाळी म्हटल्यानंतर कुठपर्यंतचा विचार करतील तर, ग्रामीण, शहरी आणि त्यातच थोडा वेगळेपणा म्हणून आदिवासी स्त्रियांचा. त्यात वेगवेगळे प्रयोगही करतील किंबहुना आजही होत आहेत. पण मग या वर्गवारीत सगळ्याच स्त्रिया समाविष्ट होतात का ? दिव्यांग मुली या स्त्रिया नाहीत का ? त्यांना मासिक पाळी चुकली आहे का?

याचा विचार करून जेव्हा अशा मुलांची शारीरिक मानसिक स्थिती पडताळून, जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळा गोंधळच उडाला कारण सर्वसाधारण धडधाकट मुलीलाही पाळी आल्यानंतर गोंधळून जातात. दिव्यांग मुली तर मानसिकरीत्या स्वतःतच हरवलेल्या असतात. मग अशावेळी अभ्यासातून असे लक्षात आले कि, सर्वधारणपणे या मुलींचेही पोट, पाठदुखी सुरु होते. परंतु त्यांच्या त्यांच्यातील दिव्यांगांनुसार पाळीतील रक्तप्रवाहाचे प्रमाण निश्चित होते.

पहिली गोष्ट दिव्यांगांची मासिक पाळी वेगळी नसते. परंतु दिव्यांग स्त्रियांची पाळी हि पालकांची जबाबदारी ठरते.

दिव्यांगांचेही पोट दुखते, पायाला गोळे येतात, चिडचिड होते. यात सगळ्यात आव्हानात्मक म्हणजे मतिमंद मुलींना आलेली मासिक पाळी. कारण त्यांची इंद्रिये योग्य तो प्रतिसाद देत नसल्यामुळे नेमके रक्त का वाहते हे समजत नाही.

पहिली मासिक पाळी येते तेव्हा मानसिक आणि शारीरिक रित्या असा अनुभव असतो की, ते त्यांच्या जेवणावर, पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवतात. कारण त्यामुळे शौचास जाणे, लघवीला जाणे टाळले जावे. कारण दिव्यांगाचे त्यांच्या शरीरावर नियंत्रण नसते. त्यामुळे जेव्हा अशा मुलींना पहिली पाळी येते तेव्हा त्यांना कळत नाही. घरच्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तरीही सुरुवातीला त्यांचेही रक्त येते. सुरुवातीला काही प्रमाणात रक्ताच्या गाठी पडतात.

परंतु पालक किंवा संस्था अशा मतिमंद मुलींची गर्भाशयाची पिशवी काढण्यास प्राधान्य देतात. जेणेकरून संस्थेकडून शारीरिक शोषण होऊ नये आणि पुढे जाऊन तिला गर्भधारणा करावी लागू नये म्हणून, ही पिशवी काढणे योग्य ठरते.

सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर दिव्यांगांसाठी फायद्याचा ठरतो कारण सॅनिटरी नॅपकिन्स हे एकाजागी चीटकते. त्यामुळे त्यांच्या हालचाली करताना अडचणी येत नाही.

दिव्यांगासाठी जनजागृतीचा भाग म्हणजे, दिव्यांगांसाठी त्यांच्या त्यांच्या शारीरिक आकारानुरुप कस्टम पॅड बनविले जावे. यात प्रसार माध्यमे ही मागे आहेच परंतु समाज माध्यमांनी या लोकांना दिलासा दिला आहे कारण या व्यासपीठावरून कमी प्रमाणात का होईना पण लिहिले जात आहे.

(क्रमश: ) 

समाजात अडकलेली मासिक पाळी!

by on मे २६, २०१९
भाग: २  सर्वेक्षणातून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा केला. खरे तर वास्तव किती वेगळे आहे ते जाणवले. कारण पौगंडावस्...
 भाग- १ 
"या दिवसात बाहेर नको पडू... तुला आलीये...? मग आता पाण्यात कशी येणार...?, मंदिरापर्यंत सोबत ये, पण आत येऊ नको बरे...? हो, गोमूत्र शिंपडून घे. तू लोणच्याला हात कसा लावला...? तुला तुझी तारीख लक्षात राहत नाही का...?, आता स्वयंपाक घरात येऊ नको बरं...! आणि ए, काकांसमोर कशाला सांगतेस, ती काय मोठ्याने सांगायची गोष्ट आहे का...?"

एव्हाना या “त्या” दिवसांची गुपितं स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांना मनोमनी तोंडपाठ झाली. तरीही विकासाच्या वाटेवरील या एकविसाव्या शतकात आजही त्याला 'टॅबू' नावाच्या पाश्चात्य बंधनात अडकवून भारतात यावर बोलण्यास अप्रत्यक्ष बंदी आहे. 
लहानपणापासून आपल्या निरीक्षणास येते कि, कायदेशीर नियम कुणी इतक्या काटेकोरपणे पाळणार नाही, पण मासिक पाळीच्या चार दिवसात आपल्या कुटुंबातील स्त्रिया मात्र पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांचे पालन इतक्या काटेकोरपणे करून स्वतःला एक 'आदर्श व्यवस्था' म्हणून सिद्ध करण्यात कसलीच कसर ठेवणार नाही.

त्यातही ‘ग्रामीण, शहरी, आदिवासी आणि दिव्यांगातील स्त्री’ हि तिच्या तिच्या चौकटीत कशी वेगवेगळ्या नियमांना आणि त्यातील पुरुषसत्ताक रूढींना अधिक बळकट करून बाईपण सांभाळतात, हे वाखाणण्याजोगे आहे. कारण ‘बाईचं बाईपण बाळगण्याचा बाईलाच अभिमान नाही, तर इतर लोकही तिला कमीच हिनवणार’ हे विधान लहानपणीपासूनच्या या निरीक्षणातून मासिक पाळीला वर्णण्यास चपखल बसते.

परंतु अलीकडच्या काळात आधुनिक मानसिकतेमुळे या विषयातील बंधने आणि मासिक पाळीवरील गुप्ततेचे मळभ दूर करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

अनेक दशकापासून आपण बघत आलो मासिक पाळी आली म्हणजे ‘कावळा शिवला म्हणून तू दूर राहा’ या अशा गैरसमजुतीच्या वेढ्यात अडकली आहे. परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून, मासिक पाळी हि प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील जैविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे असूनही सगळीकडेच या विषयाबाबत बोलताना हळूच बोलले जात होते.

या विषयाकडे माध्यमांचा सकारात्मकरित्या कल वाढला आहे त्यामुळे नवनवीन माध्यमे नवनवीन आणि आकर्षक आशय निर्माण करीत आहे. त्यावर प्रतिसाद देता येणे शक्य झाल्यामुळे लोक हळूहळू का होईना मनातील कुजबुजलेला आवाज समाज माध्यमांवर मुक्तपणे बाहेर काढत आहे.

कधी कधी वाटते, मी नव्या तंत्रज्ञानाच्या आणि सामाजिक माध्यमांच्या संपर्कात आल्यामुळे मला मासिक पाळी या विषयातील हा बदल जाणवत असेल. त्यामुळे याचा सखोल अभ्यास मूलभूत घटकापासून सुरु केला. 

तेव्हा एक सर्वमान्य प्रश्न पडला कि, जर मासिक पाळी हि नैसर्गिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे, तर त्यात समाजाच्या दृष्टिकोनाला इतके महत्व का दिले जाते? आणि हा सामाजिक दृष्टिकोन तोपर्यंत नियंत्रणात असतो, जोपर्यंत तो कोणाला हानी पोहोचवत नाही. परंतु निरीक्षणातून लक्षात येते कि, समाजातील या विषयाला निषिद्ध मानण्यामुळे स्त्रियांवर मानसिकरीत्या परिणाम होतोच पण समाजातील या सवयींमुळे स्त्रियांच्या स्वच्छतेच्या सवयींवरदेखील परिणाम होत आहे.
टॅबू

टॅबू म्हणजे निषिद्ध!

स्त्रियांच्या आरोग्याची गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्यातील अनेक समस्या या अव्यक्त राहिल्यामुळे होतात. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीतील टॅबू!

शारीरिक निर्बंध तर आहेतच पण त्याचबरोबर, त्यांच्या शास्त्रीय प्रक्रियेबद्दल बोलणेही टाळले जाते. पण शास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर, मासिक पाळीचे चक्र हे निरोगी शरीराचे आणि प्रजननक्षम स्त्रीचे प्रतिनिधीत्व करते. तरीही सामान्यतः हा विषय गुपचूप आणि पुरुष सदस्यासमोर कधीच बोलला जात नाही.

पाउलो फ्रीरने जगभरातील गरीब देशांच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात 'द पेडॅगोगी ऑफ द ओप्रेस्ड' (2005) या पुस्तकात 'शांततेमागील संस्कृती' या संकल्पनेचा उपयोग केला. फ्रीरने असे म्हटले की, ‘शांततेमागील संस्कृती हि इतरांना त्यांच्या सत्तेत ठेवण्यासाठी अस्तित्वात आली.’

या सिद्धांतानुसार, प्रत्येक मुलीसाठी मासिक पाळी जवळ आली कि, तिला शांत राहण्यास शिकवले जाते आणि या घटनेबद्दल गुप्तपणे बोलावे असे सांगितले जाते.

प्रत्येक किशोरवयीन मुलीसमोर मासिक पाळी कशी हाताळावी, ही जोखीम असते. बर्याच निषिद्ध, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्बंधामुळे किशोरवयापासून मासिक पाळी हि मनात भीती निर्माण करणारी ठरते. म्हणूनच, किशोरवयीन मुली मासिक पाळी स्वीकारण्यास लाजतात आणि गुप्तता कायम ठेवतात.

ज्याप्रमाणे वधू पक्षाकडून अप्रत्यक्ष हुंडा घ्यावा तसे आपण सगळेच घरात आधुनिकतेच्या नावाखाली अप्रत्यक्षरीत्या छुप्या पद्धतीने अनेक अंधश्रद्धा घरातल्या घरात पाळतो.. ज्यामुळे येणाऱ्या पिढीवर तसेच किशोरवयीन मुलींवर विशेषतः त्यांच्या मासिक पाळीच्या विश्वासावर आणि शास्त्रीय दृष्टिकोनावर पूर्वापार चालत आलेला नकारात्मकतेचा पडदा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


थोडक्यात,
मानवाची निर्मिती करणारी हि ‘मासिक पाळी’ आजही लपवली जाते. पण ज्याप्रमाणे जगाचा पोशिंदा करणाऱ्या शेतकऱ्यावर बोलले जाते त्याप्रमाणे समस्त माणूस जातीची निर्मिती करणारी हि ‘स्त्री’ वर्गातील ‘मासिक पाळी’ मुक्तपणाने बोलली जाऊन साजरी करावी, असे वाटते.


(या विषयाचा अभ्यास करून त्यावरून आलेले निष्कर्ष नोंदविण्याचा हा प्रयत्न...
क्रमश: ) 

'तिचं' माझ्याशी बोलणं झालं आज.
ती आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत सोशल साइट्सवर तिला शोधून केली होती. माणूस एखाद्याकडे खेचला गेला की त्याची संपूर्ण छाननी करूनच बाहेर पडतो. मीही सुरुवातीला तिला वरवर ओळखलं होतं. पण मध्ये खूप काळ लोटला होता. मी विसरूनही गेले होते.
पण आज अचानक दिवसाच्या ओघात ती मला दिसली.
रवीने तिच्याबरोबर असलेला एक सुंदर फोटो आणि तिच्या कर्तुत्वाची कहाणी टाकली होती. रवी आमचा म्युच्युअल फ्रेंड होता.
मला ती आठवली. ती सर्वसाधारण नव्हती पण खुपही प्रसिद्ध नव्हती.
पण ती  माझ्यासाठी प्रसिद्ध होती.
तिची दृष्टी माझ्यापर्यंत पोहोचली होती, ती माझ्या मनात तितकी प्रसिद्ध झाली होती.
मी स्वत:च्या विश्वात तिला रुमझुम‌ म्हणू लागले होते.
रुमझुम दिसायला इतरांसारखीच होती. तसे सगळेच एकमेकांसारखे असतात. पण झूम केलं की मग खरं वेगळंपण दिसू लागतं.
शरीरयष्टी जाड, नाक बसक, भुवयांना विरळ केसांचे सौंदर्य होते, केसांची कुरुळी एक बट त्या गरगरीत मुखड्यावर ओघळत आलेली. पण तिची त्वचा वेगळी होती, चमचमीत होती. मी त्या फोटोला न्याहाळत होते, एक सेकंदपरतून मी पुन्हा त्या चमचमीत त्वचेला पाहू लागले. एक सुरकुती नाही ना कुठलाच फुटकळ स्कार... एक आयुष्य इतकं साफसूथरं? कदाचित ते वरतून दिसणारं असावं.?
पण म्हणजे एखाद्या गोल गरगरीत कोऱ्या कागदावर, उशीर आहे डोळे, कान, नाक आणि त्या भुवया ठेवण्याचा.? 
माझ्या मनात तिचं व्यक्तिमत्व आधीच उच्च स्थानावर होतं, आता तिच्या बाह्यांगाला मी पाहत होते. तिचा साचा मला पहायचा होता. म्हणजे मी जजमेंटल न बनता तिला बघणार होते, जणू एक संपूर्ण यशस्वी अन् वेगळं व्यक्तिमत्व कसं असू शकतं याच कुतूहल मनात होतं, मी तिला पहात गेले. 
ती एक कॅमेराबरोबर खेळणारी अन् त्यातून जादू निर्माण करणारी निर्माती होती. तिला तिच्या आयुष्याच्या मर्यादा नव्हत्या. कुठल्याच नाही! 
हे माझ्या जमण्याच्या बाहेर होतं कारण मी माझ्यातून एखादा उडण्याचा, नि चौकटी बाहेरचा निर्णय घेऊन बाहेर पडणारच असते, पण बाहेर लगेच माझे घरचे उभे असतात. त्यामुळे कुठल्यातरी आचारसंहितेने आखलेल्या आयुष्यात , कलेच्या आझादीला मर्यादा येतात. त्यामुळे बहुतेकदा माझी कला घुस्मटत, गटांगळ्या खात असते.  
तिला मोकळं उडायचं असतं ते हवं तेव्हा. ! त्यावेळी माणसांच्या आयुष्यातल्या सामाजिक बंधनाचा तिला राग असतो. माझंही तेच होऊ लागलं होतं. 
पण मी रुमझुमला बघायचे. ती मुक्तछंदी होती. स्वतःच्या स्वप्नांना अलगद जपणारी. तिच्या स्वप्नांना स्वतः आधी आदर देणारी!
अशावेळी ते असतं ना, आपलं स्वप्न दुसरं कुणी जगत असलं की आपण त्याला दृष्ट लावत नाही, त्याच्या स्वप्नात आपलं स्वप्न पूर्ण व्हायची ओढ बघत असतो. मी यातच वाढत होते. 
      हळूहळू रुमझुम आणि माझं वरवरचं बोलणं होऊ लागलं होतं. 
रुमझुमला माझी कला, माझं व्यक्त होणं आवडत होतं. ती मला कौतुकाची थाप देत असे. मी भारावून जात असे. तिच्या आयुष्याशी माझा संबंध होता की नव्हता मला आजही माहीत नव्हतं. पण ती बोलली की मला छान वाटायचं. हुरूप यायचा काहीतरी लार्जर दॅन लाईफ करण्याची प्रेरणा यायची. तिचा आधार वाटू लागला होता. एका मित्राचा वाटतो तसाच तिचा आधार !
याच काळात, काल माझा दिवस एका मित्राच्या विश्वासघातामुळे वाईट गेला, त्यामुळे एकांतात खुप चिडचिड करून शेवटी एक दुखी स्टेटस टाकून मी झोपी गेले. 
सकाळी पाहते तर रुमझुमचा मेसेज.... :O आणि तोही असा कोणता फॉर्मल मेसेज नव्हता. 
मी ना आधी डोळे चोळत चोळत लगेच त्या मेसेजला टॅप करून वाचू लागले. 
"हे नाजनी ( ब्युटिफुल), काय झालं ?
एवढं नाही मनावर घ्यायचं, आयुष्य आहे क्षण उडून जायलाच असतात... क्षण उडतात, दुःख का कवटाळून ठेवायचं?
आता उगाच फॉर्मलिटीमध्ये अडकणार नाही. दुःख करून घे एक दिवस दोन दिवस यापलिकडे नाही. त्याला अर्थ नसतो कारण अशी माणसे येत राहतात, जात राहतात. आयुष्याला वाऱ्यासारख मोकळं सोड.!"
     मला म्ह्णजे काय बोलावं, काय लिहावं, काय मांडावं सुचेना. जे जे लिहीत होते कीबोर्ड हातातून सुटत होता. पण मला शब्द आणि रचना आणि तिच्यासाठीचां पहिला मेसेज खास लिहायचा होता. कसलीच माझ्या व्याकरणानुसार चूक नसलेला संदेश,
"उम्मम... सॉरी रुमझुमा,
हे सॉरी माझ्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीसाठी ज्यामुळे माझा वेळ वाया गेला. पण त्याच व्यक्तीला शुक्रियाही म्हणेल ज्यामुळे आज तुझा संदेश या इनबॉक्सपर्यंत स्वतःहून आला. तोही साधा संदेश नाहीच, तुझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा 
आणि काही व्यक्ती असतात ना शिंपल्यांसारखे. अपेक्षेने आपले केलेले शिंपले, सुटत नाही सहज. 
पण आता लाटा बनून समुद्रात ढकलून देईल हा शिंपल्यांचा कडवटपणा. तू म्हणतेय नं, खरंय वारा आहे हे आयुष्य! 
तूच ...! "
आमच्या दोघींच्या आयुष्यातला हा एकमेकींना पाठवलेला साजेसा सुंदर सुबकतेने पाठवलेला पहिला मेसेज... त्यानंतर आम्ही सुरू जे झालो... ते कधी इतक्या शाब्दिक अन् स्वच्छ भाषेत बोललोच नाही. 
अनोळखीतून मैत्री झाली,
मैत्रीतून चेहरा बघणारी भेट झाली. भेटीत दोन नवे विचार, नवे चेहरे आणि नवे आयुष्य अन् त्या आयुष्यातली कथा भेटल्याचा आनंद होता. 

भावना व्यक्त करून, खाऊन, पिऊन घरी गेल्यानंतर मेसेजिंग वाढलं, घट्ट झाले धागे. सगळं असं कोणत्यातरी नव्या जगातलं वाटू लागलं. दोघींना लाल रंग आवडायचा नाही, काळाच्या प्रेमात पडलो. पाणीपुरी नाही, दालचा आम्ही वेड्यासारखा खाल्ला. झेड ब्रिजवर नाही रिकाम्या रस्त्यांवर मध्यरात्री  बेफिकीरीने फिरलो. तिच्या कमरेला माझ्या हाताच्या वळणाने आपलंस करण्यात मला तिचा रस्ता होण्याचं सुख मिळू लागलं. दोघींच्या भावना, प्रतिसाद, हसणं बदलू लागलं. हसणं आता लाजणं होऊ लागलं होतं, चिडणं आता मनवण्यासोबतच आलं होतं.
मैत्री की मितवा यात अडकत कसं गेलो कळलच नाही आम्हाला.
पण मुलगी मुलगी? प्रेम? 
श्या.! 
ए काहीही! हे असं नसणारे. हो नं ? 
आम्ही दोघी एकमेकींना समजावत राहिलो. चार दिवस नीट बोलून त्यातला एखादा दिवस अचानक ती बोलणं बंद करायची, आणि तसच अचानक एखादा दिवस मी बोलणं बंद करू लागले. 
'सवयींचे आजोळ महागात पडणार' म्हणून आम्ही हे अंतर एकमेकींत आणत होतो. पण तरीही एकदा प्रेमाचं स्फुलिंग चेतलं की, त्यातून मग काहीच दाबलं जात नाही. त्यातून केवळ ते प्रेम उफाळुन येणं असतं. त्यामुळे हे निष्फळ प्रयत्न एकमेकींना समजत होते. तरीही एकीचीही हिंमत होत नव्हती. माझा ता दूरवर विषयच नव्हता.
मी पुढाकार घेणार नव्हतेच कारण हे 'आयुष्य' माझ्या वाट्याला आलं होतं, ते कुठल्याही वळणावर मला 'पोरकं' करेल या भीतीने मी त्याबाबत बोलणं टाळू लागले...
आता हा संवाद मला बंद करणं भाग होतं कारण जर तसं केलं नसतं आणि तिच्या मनात तसं काहीच नसतं तर मी आयुष्यभर तिच्या प्रेमात तशीच विचार करत, आलेल्या नव्या आयुष्याला झुरत ठेवलं असतं.
त्यामुळे तिच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मी तिच्याशी बोलणं बंद केलं.
तिला सुरुवातीला समजलं नाही. ती रोजच्या दिवसांसारखे दिवस ढकलू लागली.
कारण याआधी आम्ही असं चार दिवसातून एकदा न बोलण्याचे खेळ खेळायचो. म्हणून सुरुवातीचे चार दिवस तिने नेहमीसारखे प्रयत्न केले. पण यावेळी चार दिवसांच्या वर जाऊनही मी तिला मेसेज, कॉल केले नाही. आता मात्र मला आतून एका मनाला वाटायचं, तिचा कॉल येईल, ती मला जाब विचारेलच.
नाहीतर किमान मेसेज तरी? मी स्वतःच्या मनाला समजुतीने वेड्यात काढत बसायचे, जर आता मम्मी मला ओरडली नाही तर तिचा कॉल येणार नाही, पण जर मम्मी ओरडली तर कॉल येईल आणि हे असे आणि अनेक प्रकार करून पाहायचे. पण माझे प्रयत्न फसत होते.
पाचवा दिवस फेल गेला.
तिचा कॉल मेसेज आलाच नाही. 
तुला काय वाटतं? 
काय करेल ती? 
तिचं प्रेम आहे?
जर आज पेपर टाकताना पेपरवाल्याचा चेहरा दिसला तर तिचं प्रेम आहे. पण नाही दिसला तर? 
ते जाऊदे पण तिचा कॉल येईल. 
येईल ना?... 
मी अशी एका प्रेमाच्या समुद्रात दोन दगडावर पाय देऊन उभी असल्यासारखी भासत होते, एका दगडावर प्रेम आहे एकावर नाही.
माझा तोल जात होता, पण मोबाईल हातातून सुटत नव्हता. कारण तो क्षण मला वार्यावर उडू द्यायचा नव्हता, जिथे तिची माझ्या आयुष्यात येण्याची चाहूल असेल, एक पहिला हक्काचा श्वास असेल माझ्यात येण्याचा तिचा. तो मी असाच सोडणार नव्हते. 
सातवा दिवस असाच प्रतीक्षेत गेला. 
आता दिवसाबरोबर आशा पण मावळत चालली होती. मनातल्या मनात सारखं, 'संपलं स्सगळ!' म्हणत मी आशा सोडत होते. तरीही आमचं नातं माझ्या उमेदीचा हात धरून मला धीर देत होती. 
आता हळूहळू दिवस ढकलायला मी माझे मन कामात गुंतून ठेऊ लागले. तरीही माझ्या चित्रकलेत तिच्या अन् माझ्या अस्तित्वाच्या अप्रत्यक्ष खुणा दिसू लागल्या होत्या. चित्र 'कपल'चे असेल त्यात मला आम्ही दोघी दिसू लागलो होतो, चित्र ऍबस्ट्रॅक्ट असेल तर त्यातही मला कुठल्याही आकाराने ब्रश फिरताना तुटलेल्या अवस्थेत मी, नाहीतर जोडलेल्या हातांनी आमचे दोघींचे एकमेकींच्या आयुष्यात गुंफलेले हात दिसायचे. 
मनाचे हेच खेळ सतत चालू होते. दिवस जात नव्हता, रात्रीला आमच्या आठवणी पुरायच्या.
शेवटी आज मी ब्रश हातात धरला. खूप धीराने स्वतःला सामोरं जायचं ठरवलं, तिला विसरून आज ग्राहकाला हवं तसं पेंटिंग देऊ, व्यावसायिक पेंटिंग, त्यात प्रेमाचा अंश नसेल असं पेंटिंग. शक्य होतं? ... मी इतक्या मोठ्या विचारांच्या अडचणीत होते, तोच टिडींग... फोनचा मेसेज बॉक्स वाजला. 
"भेटूया! ... उडणाऱ्या वाऱ्यात काही पाखरं एकच झाडावर येऊन बसतात, त्यातलं एक पाखरु ते झाड सोडत नाही.सुटत नाहीच ते झाड त्याच्याकडून. 
आपल्या ठिकाणी ये.! जमल्यास माफ कर. " 

माझा चेहरा, माझा हातातला ब्रश त्या चित्रावर कोरडा राहिलेला, तो मेसेज एका हातात ब्रश ठेऊन वाचला. मेसेजचां पूर्णविराम वाचतानाच तो ब्रश नकळत त्या काळ्या रंगाच्या डब्यात जाऊन त्याचं टोक एबस्ट्रॅक टाकत त्या छटेला त्या कोऱ्या कागदावर मोकळं करताना पाहताना जो प्रेमाचा रंग नी श्वास त्या कागदावर उमटला त्याने उमेदीची परमोच्च पातळी गाठली.
शेवटी दोघींनी भेटायचं ठरवलं.
ती भेट प्रतिक्षेच्या क्षणाची शेवटची आशा होती. 
मी खूप स्वत:ला मानसिकरीत्या जागेवर ठेवून जात होते.
तिचा नावडता ड्रेस आणि रंग मी घातला. केसांना कुठलेच वळण ना चेहऱ्याला लिपस्टिकचा रंग ओढला. मनात ओघळत असलेले एका ब्रशाचे आनंद, सुख, उकळ्या, प्रेम हे ओघळ होते, पण दुसऱ्या धारेत लगेच तो ओशाळलेला, नाराज अन् तुटलेपणाचा राखाडी रंग होता. त्या कागदाला तो रंग नको होता. 
आम्ही भेटलो, ती खूप सुंदर, नाही सुंदर नाही ती त्या क्षणी माझ्या आयुष्यातल्या दुष्काळातील, 'निसर्ग' होती. तिने येणं हेच माझ्यासाठी सुख होतं यापुढे तिने शब्दही न बोलावा. तिचे अस्तित्वच मला उमेद द्यायला पुरेस असायचे. 
"सोडून गेली तर आशा कुठून शोधावी? " मनातल्या मनात स्फुटत असलेलं वाक्य ओठांनी अचानक बाहेर 
ढकलल.
"हाहाहा sssss...." 
ती हसली. 
ती हसली की माझं टेंशन जायचं वगैरे मान्य होतं. पण ती वेळ माझ्या महत्त्वाच्या वळणाची होती. मला कुठलेच भाव तिथे नको होते. तिने आल्या क्षणी तिचे मन, तिची भावना, मला कुठल्याच एक्स्प्रेशन फॉर्मलिटी शिवाय सांगावे अशी माझी इच्छा होती. पण तिचं मन काय विचार करते, ते समजणं गरजेचं होतं. 
'का हसलीस?' मी शांत होत विचारलं. 
ती - तू वेडी आहेस. 
मी - बरं
मग? 
ती - कशी आहे ग? आधी मी आले की सुरुवात काहीतरी सुंदर्षा कॉम्प्लिमेंटने करायचीस, आज विसरली? 
तुझं मुलांसारखेच असणारे, तसच होणारे. 
मी - जाऊदे ना एवढ्या दूरचा तुला काय फरक पडतो.? 
ती - फरक ? होना कसा पडेल ? काय पण ना... मैत्रीत कसा बर फरक पडेल.? 
मी - म्हणजे मैत्री आहे...? आपल्यात.? 
मी शंकेच्या प्रश्नचिन्हाने तिचं मत जाणून घ्यायचा चुकीचा प्रयत्न करत होते. पण ती शातिर होती. कुठलीच जागा माझ्या गोलात देत नव्हती. 
"काय ते सांगून मोकळी हो. 
फक्त एवढं सांग हो की नाही.?
हो असेल तर, तेवढी हिंमत कर आणि सगळ्यांसमोर एक लॉंssssन्ग किस कर आणि नसेल तस काहीतर इथून तत्काळ उठून जा."
हे बोलून माझं मन मोठ्या शंकेच्या डोहात बुडाले.‌ 
मी मोठ्ठा श्वास घेतला, मनाची तयारी केलीच.
प्रेम माणसाला सगळ्या भावनांचा आदर करायला शिकवते. 
तोच ती उठली.
माझा एक श्वास माझ्या पोटात गोळा आला. भूवयांवर टेंशनचं सावट. डोळे झाकूनच गेले घट्ट... 
तिच्या वावरण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न माझं नाक करत होतं, अंधारात चाचपडावं तसं स्वतःच्या प्रश्नात उत्तर शोधण्याचा किती टोकाचा प्रयत्न मी करत असले माझं मलाच माहीत होतं. स्वतःची एवढी परीक्षा मी कधी पाहिली नव्हती,
आणि चाचपडतानाच अचानक तिच्या ब्रेसलेटचा धागा माझ्या मानेला लागला, डोळे उघडणारच पण ती चूक होणार होती म्हणून मी आतल्या आतच सगळ्या श्वासांचे प्रेमात मिश्रण करून उमेदीची खिडकी उघडली, नि क्काय? तिने दोन्ही हातांनी मानेला घट्ट पकडून माझ्या ओठांवर ओठ घट्टपणे ठेऊन टांगत्या श्वासांना मुक्त केलं.

पोटातला गोळा मुक्त झाला होता, श्वासांत आझादी आली होती
नि वार्याबरोबर उडणार्या पाखरांसारखे काही पाखरं असतात, शिकवलं तिनेच... 
निशब्द यापुढे आम्ही दोघीही त्या किसमध्ये अतोनात प्रेमाची उसंत टाकून तो सर्वांगात अनुभवून खुउउउउउप शांत झालो...



माझ्या विळख्यातली 'ती'

by on मे १६, २०१९
'तिचं' माझ्याशी बोलणं झालं आज. ती आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत...


'आई...'
आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही.

नेहमीचे असंख्य विचार असणारं मन अशावेळी काय आठवून देतं माहिते?
"तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा... "
दणकट होती ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी!
आज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या गुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.
एक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि त्याची निर्मिती करून त्याला शिल्पकार जसा घडवतो तशी छाननी करीत घडवायचं हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लाऊन अगदी सहज, अलवार करून जाते.
आई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.
आईसाठीचं काही आठवत असेल तर, 'माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.'
परीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.
आमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात "माझा पहिला नंबर आला तर...? " हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.
मोबाईल फोन गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण 'आई जवळची आहे, ती कळायची.'
'तिचं' कसं असायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत जे लहानपणीच सुख असतं ते अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.
त्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.
"आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये." या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही .
पण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो  दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅
मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या बाई अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागतं नव्हते. 
मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. 
माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पाहू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.
मी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ? ते कौतुक होतं का? मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.
आई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.
ती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय सांगितलं तुम्हाला? ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने?.
आता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, " शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा." आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. 
मी लिहिलं होतं, "माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय! " 
तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. 
पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते.? तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.
"गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. "
परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.
आईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख!
त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो. 
वास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे! हे शिकवून अन् घडवून जाते ती ! 
अशा माऊलीला "मौल्यवान मातृदिनाच्या मातृमय शुभेच्छा !"

वास्तवातली कविता !

by on मे १२, २०१९
'आई...' आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. नेहमी...

आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... "
'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं...
रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही डी मार्ट वरून परतत होतो ...
मला रात्र आवडते कारण ती जिवंत असते. तिच्या सानिध्यात श्वास मुक्तपणे घ्यावेसे वाटतात, श्र्वासांच अस्तित्व जाणवत. मी सहसा रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाही त्यामुळे कधीतरी बाहेर पडल्यानंतर " माझ्यासाठी रात्र म्हणजे वेगळी नशा असते."
त्या नशेत मी धुंद होते. बसमध्ये गर्दी नव्हती. पण अनेक चेहरे थकलेले होते. बस ' खानापूर ' असल्यामुळे त्यातून प्रवास करणारे चेहरे हे दिवसभर कष्ट करून थकलेले, कष्टाचे बोलके चेहरे, हातावर पोट असलेले...
त्यामुळे या बसमध्ये शीण होता... पण बस मिळाली, रिक्षाचे जादाचे पैसे वाचले, याचा सुस्कारा त्या प्रत्येकाच्या मनात होता... बस सुरू झाली... साधारण एक किलोमीटर गेल्यानंतर बस एका स्टॉप नसलेल्या ठिकाणी थांबली.
अचानकच...
विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत सगळ्यांनी "नेमकं काय झालं.?" म्हणून बाहेर पाहिलं, मीही डोकावले.
तर बसच्या कंडक्टरला त्याच्या नशेची तलफ आली होती...
तो त्याच्या नशेशी इतका प्रामाणिक की, त्याने दुनियेला विसरून स्वतःची इच्छा पूर्ण केली...
ते मला इतकं सुंदर वाटलं की, कसं एखादा माणूस परिस्थितीला विसरून स्वतःच्या आयुष्यात 'राजा ' म्हणून जगू शकतो, त्याच्या त्या 'असण्याला ' मनात बसवून गाडी पुढे जाणार होतीच. पण क्षणाचा वेळ न गमवता मी हातातल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करून तो क्षण माझ्याकडे घेतला... त्याचं वास्तव काहीही असो तो माझ्यासाठी या दुनियेत, 'आयुष्याला जिंकलेला माणूस होता. '



मी क्लिक केला आणि माझ्या जवळच बसलेल्या (इतक्या वेळात माहीत नसलेल्या) मावशीने माझ्या त्या क्रियेला दाद देत खुदकन हसल्या...
मला स्वतःच मी प्रॉम्प्ट वाटले. आवडले. पण पुढे त्यांना बोलायचं होतं...
" ए हे कित्ती लग्गेच झालं... मस्त केलं फोटो काढला..." दैनंदिन आयुष्यातील संवादापेक्षा हे वाक्य वेगळं होतं.
प्रत्युत्तर देण्यापेक्षा मी त्यावेळी फक्त एक ओळखीची स्माईल दिली.
"कुठे उतरणार... ? "
त्यांच्या नजरेशी नजर मिळाली, त्यामुळे मी वेगळच काहीतरी निरखत राहिले,
आणि त्यामुळे मला लगेच उत्तर सुचलं नाही.
पण पुढे " उममम.... हां xyz इथे."
मग 'थोड सेकंदभर बोलू का यांच्याशी?'असा सहज विचार मनात आला,
म्हटलं, "तुम्हाला?"
त्या लगेच म्हणाल्या, "वडगाव..."
मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले... त्यांनी कन्टिन्यू केलं.
" बाई काय करू मग, ही बस आतपर्यंत जात नाही
... पण बस लवकर येत नाही. त्यामुळे आता बाहेरच उतरून चालत जावं लागेल घरापर्यंत."
"होना तेच म्हटलं बस खानापूर मग वडगाव कसं? "
पण बरं झालं याच बसमध्ये चढल्या. तशी बसची संख्या कमीये. त्यात रात्रीचं वाट पहावत नाही. घरी जावं वाटतं आपल्यापल्या. " मी त्यांच्या कलाने बोलले.
"आपलं कोण सांगून ऐकतं? त्यात इथून रोज दहाला घरी पोहोचायच. त्यांनतर पुढे स्वयंपाक... असं वाटतं ना कुणीतरी म्हणावं गेल्या गेल्या की झोपून घे. मी खुशाल झोपेल." त्या सलग बोलू लागल्या...
" मुलगी नसते का घरी?" मी सहज स्वाभाविक प्रश्न विचारला.
" लग्न झाली त्यांची. घरी सासू, नवरा आणि मुलगा असतो."
मी म्हटलं, " मुलगा काय शिकतो? "
त्यांना माझ्याशी बोलून आधार वाटत होता, अनोळखी पण आवडता संवाद होता तो.
" त्याचं शिक्षण झाले, तो आता मुलांना स्विमिंग शिकवतो, काय म्हणतात त्याला?
म्हटलं, " स्विमिंग ट्रेनर." हे समजल्यानंतर मला विचारावं वाटलेलं की, 'तो लवकर येतो मग तो स्वयंपाक करून नाही ठेवत का?' पण म्हटलं आई आहे ती. आणि तेही ' मुलाची आई' म्हणून माझं वास्तविकतेने बोलणं मी टाळलं.
"हां तेच... " त्या म्हटल्या. मी माझ्या विचारातून बाहेर पडले.
"त्यात मालकीण इतकी राबवून घेते. कसंही वागवायच कामाला म्हणून?. त्यात कळतही नाही इतक्या लांब जायचं, तरी कधी लवकर सोडत नाही" त्या सांगत होत्या.
" कुठे कामाला जातात तुम्ही.? " त्यांच्या आयुष्याचा भाग होत मी विचारलं.
" डेक्कनला ... "
मग मी डोक्यात गणित करून त्यांना विचारले, " म्हणजे तुम्हाला दोन बस बदलून यावं लागलं असणार. "
" दोन नाही तीन. तिथून डायरेक्ट बसही नाही. देवही कसा कोणाला देतो तर भरभरून आणि काहींच्या नशिबी फक्त कष्टच..... मोठ्ठा पौज घेऊन त्या सलग बोलू लागल्या. " पण जे चाललं ते छान आहे. "
पुढे म्हटल्या, "तू हॉस्टेलवर की घरी राहते. " माझ्याबद्दल सांगितल्यानंतर स्वाभाविक प्रश्न विचारला, " भाऊ नाही तुला? "
मी खुश होत म्हटलं, " नाही."
आजवरचा युनिव्हर्सल डायलॉग त्याही बोलल्या पुढे, "त्याला काय, आजकाल मुलीही काय कमी नाहीये."
मला आता सवयीचं झालं त्यामुळे मी पुढे म्हटलं , "मुलगा मुलगी काय फरक नसतो मावशी. शिक्षण असेल तर मुलगा मुलगी फरक पडत नाही."
"होना... " माझ्या मताशी सहमत होत्या पुढे म्हणाल्या, " हो बाई, शिक्षणावर खर्च करावा. आपलं लाईफ मस्त करावं, लग्न करावं पण ' चांगला पार्टनर ' पाहून. पार्टनर चांगलाच बघ, कितीही वेळ लागू.
त्यांच्या त्या दोन इंग्लिश शब्दांनी मला आतूनच खूप सही वाटलं, मी ऐकू लागले, " एक चांगला पार्टनर खूप महत्त्वाचाय . मी माझ्या मुलींची लवकर दिली लग्न लाऊन. पण आता बघते, पश्र्चाताप होतो. घर सांभाळून नोकरी करतात, पण गुलामीसारखं ."
मला धीर मिळाला त्यांच्या पुढारलेल्या विचारांनी मी म्हटलं, " हो बरोबरे. म्हणूनच भर शिक्षणावर आहे. कारण उद्या लग्न झाले, पार्टनर चांगला नसला तरी आपण स्वतंत्रपणे सक्षम असायला हवे. "
हो बाळा, शिक मोठी हो...
माझं स्टॉप आला.
निघताना म्हटले, "काळजी घ्या..."
मी सहजच आपल्या माणसांना म्हणते तसं आपोआप तोंडातून निघून गेलेलं... त्या मावशींना ते इतकं इतक्क हृदयाला भारी वाटलं, "हसतच म्हटल्या घेते बाई काळजी..." आणि हे सगळं त्या पुन्हा त्यांच्या बरोबरच्या मैत्रिणीला खूप आपुलकीने सांगू लागल्या, आपोआप त्या बसभर पसरलेला तो हास्याचा सुखद गारवा दोघींच्या मनास सुखावून गेला, भेट संपली, संवाद संपला पण त्या घटनेने, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि शीण याने एका कष्टाशी ओळख झाली. एका प्रवासाच सार्थक झालं...

"एका अनोळखीबरोबर इतक्या वैयक्तिक, चार भिंती आडच्या गप्पा होऊ शकतात? ..." हा प्रश्न स्वतःला विचारून आयुष्याचं दुःख हलकं होऊन जातंय...
मध्येच प्रश्न पडतात, आधुनिक विचारसरणी गरिबातल्या गरिबापर्यंत पोहोचली, आजकाल मोबाईल आले सगळ्यांकडे मग तरीही आज त्या माऊलीला गृहिणी म्हणून जगता येत नाही. का तो मुलगा तिला म्हणू शकला नाही की, 'खूप झाले कष्ट घरी बस आता.' आज अशा गृहिणी आहे ज्यांना गृहिणी बनून कमीपणा वाटतो, पण या अशा स्त्रिया असतात ज्यांना जन्मल्यापासून आजपर्यंत कष्टाचाच दिवस घालवावा लागतो. ज्यांच्या आयुष्याला 'सुंदर आयुष्याचा एक तुकडाही नसतो, त्यामुळे अशांचा कैवारी म्हणत देव त्यांना आधार वाटत असतो, त्यावेळी मला देव जवळचा वाटतो. आयुष्याचा काहीसा भाग देवाच्या नावे देत तरी जगतात या माऊली..."

काय बोलू.?
एवढंच की,
वाईट वाटलं, आनंद झाला, सुख मिळालं एका अनोळखी, अनम्मोल, एका सच्च्या भेटीचं.

एक कष्ट बोलके...!

by on एप्रिल ३०, २०१९
आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... " 'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं... रात्रीचे नऊ...


ळूहळू सगळच बदलू लागले...
मीही बदलत चालले.
मी मोठी होते, मला अनुभव येऊ लागले.
बरे वाईट म्हणत म्हणत खूप लोक भेटू लागली. खूप भेटली म्हणून काही मागे सुटत गेली.

भावनिक पातळीवर कसं सावराव यात अडकत गेले. वयाच्या अशा परिस्थितीत आले की जूनून की भावनिक होणं?
दोघांपैकी एक निवड.
सुरुवात म्हणून मी दोन्ही निवडून रस्त्याला लागते.
पहिली शिडी उत्तम चढते, स्वतःच्या गर्वाचाही हेवा वाटायचा इतका आनंद वाटू लागला, मग दुसरी शिडी ... धत्त!
रस्ता दुभागत जातो. दोघांपैकी एकच निवडण अनिवार्य होते.
परिस्थितीला अनुकूल अस मी भावनिक होणं निवडते, लोकांशी बोलू लागते, घरच्या समस्यांना प्राधान्य देऊ लागते. 
सगळं ठीक चालू असतं. पण त्याकाळात जूनून मागे पडलेला असतो. त्यावेळी मध्ये एकच शिडी म्हणत म्हणत काळ बराच गेलेला असतो. स्वतः लाच मागे वळून पाहण्यात मी स्वतःलाच मागे सोडून येते. 
आता पुन्हा जूनून शोधू पाहते, काहीतरी राहतं म्हणत मी पुन्हा लोकांत जाते. 
त्याच लोकांमध्ये कुणीतरी मला टोकतं. 
तेव्हा मला कळतं, लोकांमध्ये गेले की मी स्वतःलाच कणाकणाने खाऊ लागते. 
कारण आजकाल मी स्वतःचीच उरतं नाही आणि शेवटी जूनून इज ऑल अबाऊट यू!

जेव्हा मीच नसणार तर जिंदगी काय उरणार?
डेड सोल !
मेलेला आत्मा!
का असं?
तर वाटतं,
जेव्हा जिवंत होते तेव्हाच स्वच्छंदी आत्मा बनले असते. त्या 'स्व' मधील छंदच सोडून गेला तर बाकी उरणार तरी काय? ...
भावनिक होण? लोकांसाठी?

कितपत जगवेल मला?
किमान माझा छंद मला जगवेल तितकं तरी.?
विश्वास कुछ अलगही कह रहा है,
मेरा जूनून मुझमे दबी हर खुशी को नीचोड लेगा |
मरी आत्मा अगर कुछ खौंफ हैं ना तो मैं तबाही मचा दुंगा।

- पूजा
Image source: pintrest

डेड सोल !

by on एप्रिल २२, २०१९
ह ळूहळू सगळच बदलू लागले... मीही बदलत चालले. मी मोठी होते, मला अनुभव येऊ लागले. बरे वाईट म्हणत म्हणत खूप लोक भेटू लागली. खूप भेटली म्हणू...


न्योतैमोरी 

हे नाव वेगळचं होतं. असं काहीतरी जे कुठल्यातरी भाषेतील कशाच तरी नाव असेल.
माणसाचं सगळ्यात जिवंत गुण म्हणजे त्याला उत्सुकता असते, कसलीही...
काल एका मित्राने विचारले की, न्योतैमोरीबद्दल ऐकलंय.?
आमच्या ग्रुपने एकमेकांकडे पाहिलं नि टाळ्या देत, याचं काहीतरी भलतच म्हणत, "म्हटलं नाही, काय संबंध, काय आहे ते?
आणि त्याच काय ? "
"तुम्ही ना ... या जगात फक्त खायला नि जायलाच आलाय." तो एकदम ऐतिहासिक काहीतरी शिकून आल्यासारखं बोलू लागला.
"बरं सांगून टाक काय ते, उगाच जुलाब व्हायचे नाहीतर" त्याला प्रोत्साहन देत त्याला विचारलं.
तोही आपलं सगळेजण ऐकताय या आनंदाने सांगू लागला...
"काल रात्री सहज वुट लावलं अन् त्यावर एका वेबासिरिजचा उल्लेख होता 'फुह से फैंटेसी'
आज जाऊन सर्च कर... कळेल मग."

फैंटेसी... म्हणजे विलक्षण कल्पना.
या शब्दात अडकलेली आमची पिढी नेहमीच एक्साईटेड असते कारण डार्क फैंटेसी म्हणजे गडद कल्पना. हे म्हणजे भलतच शारीरिक क्रियेशी संलग्न असतं.

यात अनेक प्रकारच्या शारीरिक अवयवांचे आकर्षण व्यक्तींना असते. त्यांना कधी एखाद्याच्या हातांचे आकर्षण असते, कधी ओठांचे, कधी ओठांवरील गुलाबी रंगाचे, कधी कुणाच्या कुरळ्या केसांचा आकर्षण तर कधी कुणाला स्तनांच्या आकारांचे आकर्षण तर एखाद्याला एखाद्याच्या पायांचे आकर्षण असते. हे फैंटेसी प्रकरण इतर प्रेमांपेक्षा भारी वेगळं असतं. त्यात प्रेम शरीरावर असतं तेही संपूर्ण शरीर असेलच असे नाही, ते प्रेम एका विशिष्ट भागावर असते खरे !
त्यामुळे या फैंटेसी नावामुळेच आम्ही सगळे घरी येऊन गुपचूप हे सर्च करणार हे ठरलं होतच.
मी घरी आले. डोक्यात 'फैंटेसी' चक्र फिरत होतेच.
अन् रात्री निवांत झाल्यावर मम्मी शेजारी असताना सर्च केलं.
अबब ... लगेच क्लोज !
अशावेळी मोबाईल पण शट डाऊन करता येतो, कळतं... डोक्यात तेच तिने पाहिलं तर नसेल ते चित्र ... शिट!
मग शेवटी ती झोपल्यानंतर मी पुन्हा सर्च केलं.
'न्योतैमोरी'.... हे नाव टाकताच, त्याच्या समोरच न्योतैमोरी मॉडेल्स म्हणून रेकमेंडेशन आले...
एक नग्न शरीर. आणि त्या शरीरावर नुसत्याच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या पसरवलेल्या.

आणि ती मॉडेल म्हणजे काय मॉडेल असते. एकदम चुणचुणीत शरीराची, ते शरीर म्हणजे कुठूनही कुठलच अधिकच मांस बाहेर न आलेलं, त्या शरीरावरील प्रत्येक अवयव हे सुयोग्य पद्धतीने साचेबंद अन् इतकी सुंदर की भारतीय आई असती तर तिने रोज दृष्ट काढली असती अशी.
पण हा प्रकार मनाची उत्सुकता शिगेला नेत होता. वयही तसं होतच.
मग त्या नग्न शरीरावर पसरलेल्या खाद्यांनाचं गूढ शोधण्याच्या भागडीत पडले मी.
का कुणी त्याचा शोध न घ्यावा...? म्हणजे कल्पना करा आणि फक्त डोळ्यासमोर आणा, एका नग्न स्त्रीच्या शरीरावर गळ्यापासून स्तनांपासून, योनिपासून पायापर्यंत भाज्याच भाज्या. त्यास सुशी म्हणत.
मी "असं का? नेमकं ही पद्धत तरी काय आहे ? आणि अशा मॉडेल्स का असतात?" याची उत्तरे शोधू लागले.
उत्तर गूगल केलं पण थेअरी आली. ते नको होतं. मग मित्राने जिक्र केलं त्यावरून वेबसिरिज सर्च केली.
बघायला सुरुवात केली. हे काहीतरी भन्नाट होतं. म्हणजे वेबसिरिजमध्ये कथा नेमकी अशी सुरू होते की, भारतात न्योतिमोरी या कार्यक्रमाचे प्रयोग असतात आणि अशा कार्यक्रमाला भारतीयांचा प्रतिसाद उदंड असतो. तेव्हा कंपनीत नोकरी करणारे ३-४ भारतीय पुरुष जेव्हा न्योतैमोरी जेवणासाठी जातात तेव्हा त्यांची तारांबळ कशी उडते ते इतकं कट टू कट दाखवलं आहे की, म्हणजे भारतात स्त्रीचं उघड शरीर किती आकर्षणाचा आणि बाऊ केल्याचा विषय आहे, ते वास्तविकतेला धरून अचूक दाखविले आहे.
वेबसिरिजचा विषय खरेतर खूप वेगळा होता. नव्या गोष्टी शिकाव्याशा आणि महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्याव्याशा वाटतात.
पण तरीही वेबसीरिजची सुरुवात झाली आणि त्या मॉडेलला बघून माझ्या मनात असंख्य भावना येऊ लागल्या.
या मॉडेल्सना सुशी मॉडेल्स म्हणतात.
माझं मन स्तब्ध झालं होतं. जेव्हा त्या एका चार फूट उंच मेजवानी टेबलवर केंद्रस्थानी ती शांत स्त्री आकृती अशीच निर्जीवासारखी पडलेली. जशी जन्मास आली तशीच अगदी.
म्हणजे अशी आकृती समोर आहे आपल्या आणि तिच्याकडे बघत डोळे झाकून अंतरंगात पहावं इतकी शांतता त्या चेहर्यावर की चुकूननंतर निरिक्षिताना नजर खालच्या अंगांकडे कुठेतरी जावी.
मग कळले की ही पद्धत मूळची जपानची. ते त्यांचं जेवण हे एका नग्न स्त्रीच्या शरीरावर पसरवून खातात. त्या शरीरावरून ते अन्न ( अन्नाला सुशी म्हणून संबोधतात) आपल्या ताटात घ्यायचं.
सुशी हे जर नग्न स्त्रीच्या शरीरावर असेल तर त्यास न्योतैमोरी म्हणतात.
पण जर सुशी पुरुष मॉडेल्सच्या अंगावर पसरलेले असेल तर त्यास नंतैमोरी म्हटले जाते.

हा प्रकार सामुराई कालखंडात घडत असे. राजे महाराजांच्या काळात अनेक यशस्वी लढायानंतर उत्सव म्हणून गैशा घरामध्ये 'न्योतैमोरी' होत असे.

बघितलं तर हा एका खुबसुरत कलेचा तुकडा आहे, असे  तिथल्या मॉडेल्सना आतून वाटते. किंबहुना त्यांना तसं ट्रेन केलं जात.
त्यांच्याकरीता किती आव्हानात्मक असेल की, त्या एका पोजिशनमध्ये एक तासाहून अधिक वेळ तसचं निर्जीव झोपून राहायचं. जणू एखादा चित्रकार चित्र
रंगवीत असेल त्यास ती बोलकी फ्रेम स्तब्ध लागते, तशीच या मॉडेल्सची ट्रेनिंग करून घेतली जाते.

परंतु मॉडेल्स सांगतात, जेव्हा अशा ठिकाणी राजे जेवण करत असायचे, तेव्हा ताटात हे सगळं घेतल्यानंतर ते जेवण, त्यातला एक एक घास चावताना ते आजूबाजूला बघत असायचे परंतु काही राजे लोक दारूचा घोट घेत घेत त्या स्त्रीच्या शरीरावरील कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट अवयवाला एकच एकटक न्याहाळत बसायचे.

भारतातून या दृश्यास बघितले तर त्यास या अशा रिवाजांचा निषेध म्हणून नाकारले तर जाईल पण 'चवीनं' बघितलं जाईल आणि नजरेनं ' खाल्लही' जाईल. भारतात याची स्वीकृती सहज होणे नाही, पण मॉडेल्सच्या डेडीकेशनला सलाम!

(या पद्धतीचे ब्लॉग लिखाण हा केवळ आवडीचा अट्टाहास त्यामुळे, लिखाणातील काही दुव्यांमध्ये काही चुका आढळल्यास जरूर कळवावे)

कला सफर ; न्योतैमोरी

by on एप्रिल २१, २०१९
न्योतैमोरी   हे नाव वेगळचं होतं. असं काहीतरी जे कुठल्यातरी भाषेतील कशाच तरी नाव असेल. माणसाचं सगळ्यात जिवंत गुण म्हणजे त्याला उत्सु...


"काही गोष्टी सुटत नाहीत यार... 

सोडाव्या लागतात..."



साला तुमच्या डोक्यात दारूच येणार ना...

शेवटचा दिवस ए कॉलेजचा....

यार आपली बॅच, आपली सगळ्यांची दोस्ती... आणि या टिम्बटिम्बापुढे भरणाऱ्या कित्ती आठवणी दोन वर्ष देऊन जातात.
कॉलेजच्या दिवसांत सगळेजण एकमेकांचे नसून एकमेकांचे होतो...


मी- ते कोणतं ठिकाण रे?मला आठवेचना...ते बघ ना फुल्ल जंगल ए. मग त्यातून मध्ये जाऊन ते आत धबधबा... नावच आठवेना...
शी बाबा... माझी मेमरी ना.. असला राग येतो ना कधी कधी म्हणजे ना... पत्रकारितेत येऊन नावच लक्षात राहत नाही काय ***पणा हा?
तो - देवकुंड ... 😂😂 आणि तो माझ्या स्वभावाला वाकिफ होऊन फिदीफिदी हसायला लागला...
मी - हां... तेच तेच ...हसतो काय हरामखोरा तू काय झंडे गाडले का एवढ्या वर्षांत...
तो - यंदा पण जायचंय कुत्रे. समझी क्या?मी - जाऊ की!पण ... मन मायूस झालं होतं...
यंदा सगळं किती बदलेल ना रे .?
कॉलेज नसेल, ऑफिस असेल.
मग सुट्ट्या घ्यायच्या. तेही आपल्याच आनंदासाठी तिर्हाईताकडून परवानगी... माणूस किती उधार होत जातो ना.? किती वेगळं.तो - उलट भारी की... आपण आझाद होऊन जाऊ. आणि घ्यायची मग सुट्टी.

तुला
काय, कष्टाने एक सुट्टी घ्यायची... वेळेत यायचं, पाऊस असेल तर आजारी पडेल या भीतीनं भिजताना पण विचार करायचा, उन्हात भाजायचं असेल ते पण ऑफिसात टॅन पडलेलं अंग कसं दिसेल याचा विचार. उद्या पुन्हा ऑफिसला जायचं याची टिकटिक. कारण रोज रोज सुट्टी द्यायला आपला बाप तर नाही, ना आपले मास्तर.

त्यात घाणेरडं फीलींगच हे होतं कि कॉलेज सुटणार...

हातातले सगळेच उनाड क्षण, उनाड दिवस, अवखळ फिरणं, बागडण, चुका करणं, चौकटीतल्या आयुष्याला लावारिस करून , सगळं सोडून दूर कुठेतरी कॉलेज बंक करून निसर्गाच्या सानिध्यात जायचं, ते बंकींगचं खोटं कोणालाही विकणं हे कॉलेजमध्ये शक्य पण ऑफिस सुरू केलं की हे खोटं स्वतःलाच विकायचं.

सगळच अंगावर घ्यायचं. जगायचं तेही सहज नाही प्लॅन करून....
आज बाहेर कडाक्याच्या उन्हात पाऊस पडताना पाहिलं... हेच तर कॉलेजचे दिवस असतात. सगळं आयुष्य भकास कोरड असतं, त्यातला सावन म्हणजे हे कॉलेज डेज असतात.

या दिवसांचा भूतकाळ होणार, हि कल्पना मनाचा थरकाप उडवत होती....

मनात सगळंच येत होतं, कॉलेजच्या पहिल्या दिवसाची अनोळखी नजर, ते अपघातानेच कितीतरी चेहऱ्याना भेटून, तेच कमीने एका आठवड्यात हक्काचे सोबत बनायचे, रोज टकल्या पकवणार म्हणत म्हणत कॉलेज मास्तरांची खेचायची, आणि एकाच त्या हातावर कित्येक टाळ्या पडायच्या... स्साला टेलिपॅथी हि फक्त कॉलेजच्या मित्रांमध्येच असते जेव्हा समोरचा टीचर 'आयुष्यात कधी सिरीयस होणार, हि दुनियादारी आता नाही कळायची... तुम्ही तिघे बाहेर उभे र्हा म्हणायचे' त्यांच्या या अशा सिरीयस लेक्चरला आज शेवटच्या दिवशी सिरीयस व्हावं वाटत....

स्साला हे कॉलेज कुठेच सुरु होऊन कुठेच संपत नाही... 



यात मैत्री येड्यासारखी निस्वार्थी भिनभिनत नसानसात भिनत असते... असाइनमेंट, पहिला नंबर वरून स्वार्थीपणा, आपला ग्रुप, कूलनेस, मूवीला जायचं, त्यातच सगळ्या रस्त्याभर आपलाच आवाज आणि त्यात एखाद्याच्या सामानाची सेटिंग लावणं, बळच कुणाचंतरी नाव कुणाशीही जोडून त्यांना फुल्ल सिरीयस करायचं, कशावर विनोद होत नसला तरी हसायचं मात्र पार बेंबीच्या देठापासून.... मग गर्लफ्रेंड नावाचा भरती भक्कम खांब यायचा, तिला सामान, टप्पा, पत्रा, थवा, पाखरू म्हणून चिडवायचं.
त्या आनंदाला लेबल द्यायची गरज नसायची....
#daywellspent #withfriends या हॅशटॅगचा सपोर्ट नसायचा... कारण मित्रांच्या सोबतीची खुशनशीबी हीच कि एकत्र आल्यावर मोबाईल फोन्स नावाचा दुश्मन आम्हा मित्रांपासून बाहेर पडायचा. स्साला बालपणीचा फील हे दिवस कायम ठेवता... आणि या बालिशपणाला उभारी देता ते हे कमीने मित्र....
स्साला कोण कोणाचं नसतं पण नात्याला दृष्ट लागावी असले हरामी असता....

आज सेंड ऑफ सारख्या दिवशी 'ए गपेय, मी नाही रडणार' म्हणत म्हणत त्याच हरामी चेहऱ्यांवर खूप मौल्यवान आयुष्य हातातून जातंय कि काय याची लकेर डोळ्यांतून पडत होती...

आज आक्ख कॉलेज लाईफ आठवताना एका पॉईंटला मला 'आईएम रिअली गौना मिस माय कॉलेज डेज' मधील ओळी आठवून एकटं वाटतं होतं,

"आईएम रिअली गौना मिस माय कॉलेज डेज....

मिलके लिखना वो जर्नल्स, और सब्मिशन लास्ट मिनिटपर।।।

एक्जाम्स की वो तैयारी, वो लिखना वो तीन घंटे।

और बहार आके वो कहना, स्सालाsss क्या बेक्कार पेपर सेट किया था यार "

यापेक्षा वेगळी फिलिंग नाहीये...

फेरवेलचा दिवस येतो, सगळ्या आठवणी समोर येतात... अश्रू अनावर असतात. रडावसं वाटत नाही, एकमेकांना खोट्या सांत्वनाची झालर लावून आतल्या आत सगळेच रडत असतात. इतकं कसं हे नातं तेवढ्या दिवसांत आयुष्यभराचं वाटू लागत?

'मला वाटतं इतका का बाऊ करतेय ...' मित्र म्हणतो तसं, 'मी ओव्हर रिअॅक्ट करतेय...'
बरं होत असेल ओव्हररिऍक्ट. पण का होऊ नको?
सांग ना, म्हणजे जन्माच्या चौथ्या अजाणत्या वर्षांपासून मी शिक्षणाच्या शाळेच्या पायऱ्या चढले, त्यानंतर कॉलेजच्या.
त्यात कुठलाही गॅप नव्हता. आणि आज हे अचानकच, अचानक नाहीये पण तरीही सगळं असं थांबणार ...


'जबाबदार' हा शब्द वाटणीला येणार... 

इतरांसारखे मीही ते गोडच मानून घेणार पण तरीही मला झेपवेल ते? 

कॉलेजमध्ये जे आजपोहतर खूप फिरायच, कॅमेरा घेऊन रॉयल एनफिल्डला किक मारून मौसम मस्ताना म्हणत 'हम जो चलने लगे' गात, बेफाम जगाची फिकीर नसल्यासारखं फिरणं हि स्वप्न त्या कॉलेजच्या हवेत बेफिक्रे उधळून ठेवलेलं आता खरंच जमेल? ... 


सर- चला आत चला दोघे ...
मी - ए चल जाऊ उगाच सरांनी बघितलं आहे, आता बंक मारणं इम्पॉसिबल...तो - आता सरांमुळे आपला प्लॅन कॅन्सल करायचा का...?गप्प तू चल... शपथ ए दोस्तीची....
अन दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथून पसार...
मित्राकडून पुढचा किस्सा कळणार...
सरांना आम्ही न दिसल्यामुळे सर मित्राला विचारता, त्यावर तो म्हणतो, तिला पाळी आली होती त्यामुळे ती गेली.
सर - आणि त्याला ? कधीपासून? 

साला सगळं मिळेल, हे कुठून मिळणार?
याला मोल नाही... मोती आहे हे असे दोस्त आयुष्यासाठी...

कॉलेज म्हणजे दुसरं आयुष्यच असतं.... ज्यात सगळंच वास्तवाच्या पल्याड असतं. अन माझ्या या दुसऱ्या आयुष्याच्या संपूर्ण बेफिक्रे प्रवासात मला करण जोहरच्या फिल्ममध्ये असतं ते न अनुभवल्याचा पश्चाताप नसणारे...

भीती सगळ्यात जास्त होती ती, 'आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूच ना' या वाक्याची . कारण माझ्या बॅकग्राऊंडला " हम रहे या न रहे कल....sss" या गाण्याचा आवाज जास्त होता.. 
उद्या मला फेबूला स्टोरी अपलोड करून "कहाँ हो मेरे कमीने दोस्तो" म्हणावं नको लागायला भीती याची वाटते...
स्साला हि फिलिंग कितीही लिहावि, लिहून संपत नाही...
साला ... मेन मॅटरच हा होणार आहे, यापुढे मी चुका करणार त्याला माफी नसणार. त्या प्रत्येक चुकितून मला जाणतेपणी काहीतरी शिकावच लागणार...

आज पहिल्यांदा इतकी ओझ्याने भरली आहे मी. 
आजपर्यंत आनंद हा निस्वार्थ होता, त्यात आपलेपणाचा वास होता, मित्रांच्या सोबतीचा सहवास होता, एका बेस्टेस्ट फ्रेंडचा हक्क होता, मार्गदर्शकांचा आयुष्यात टॉप वर नेण्याचा प्रयत्न होता... एकटं झाल्यासारखं वाटतं. किती व्यापलं जात आयुष्य हे कॉलेजच्या दिवसांनी .... वाटतं एवढंच आयुष्य असावं.... पण जाणीव वास्तवाची करून घ्यावी लागते. या क्षणापासूनच समजवावं लागतं मनाला, 'व्हा रेडी मॅडम... आता दुनियादारीत उतरण्याशिवाय पर्याय नाही!'


यारी ये बेफिक्री ...।

by on एप्रिल १५, २०१९
"काही गोष्टी सुटत नाहीत यार...  सोडाव्या लागतात..." साला तुमच्या डोक्यात दारूच येणार ना... शेवटचा दिवस ए कॉलेजचा......



पुण्याची गरमी मागे टाकून आम्ही दिल्लीच्या दिशेने रवाना होत होतो. हळूहळू वेगवेगळ्या राज्यांची हवा अंगाला लागून जात होती...

माझ्या मनाची भावनाच कळत नव्हती. कारण चार भिंती ओलांडून आपल्याला दुसरं काही बघता येणार नाही, या घराच्या वातावरणामुळे पुढची अपेक्षा फारफार तर स्वतःचं काही झाल्यावर मग स्वखर्चाने बघू दुनिया, या तयारीत मन होतं. पण घरच्यांना अचानकच काय झालं नि मला हा आगळावेगळा अनुभव अपेक्षे आधीच वाट्याला आला. निर्धास्त आणि मुक्त झालं होतं मन...
प्रत्येक शहराची हवा, तिथलं निसर्ग नि वेगळा साचा हा नेहमीच माणसाला जिवंत ठेवायला मदत करतो. म्हणून, फार नाही पण एक स्वप्न माझं आयुष्यभरासाठी पुरेल ते 'भटकणं'.
कारणे कोणतीही असो, पण या फिरण्यात आपलंच पुण्यातलं आयुष्य नवीनच आपल्या समोर तयार होतं...
त्यामुळे फिरणं छंद होता मनाचा...
दिल्लीचा प्रवास सुरू झाला.
कालपर्यंत किमान सोशल मीडियामुळे जवळ वाटणारे चित्र आज माझ्यासमोर होते.


घराच्याभोवती खेळणारी पाऊलं आज राजधानीसारख्या भव्य शहरात पडणार होती. मन गांगरून गेलं होतं. अशावेळी माणसाला खरी थंडी ताप सर्दी खोकल्यासारखी हवा जाणवते. प्रत्येकवेळी तिची चाहूल ही नाविन्याची ओळख करून देणारी असते...

"राजस्थान गया लगता हैं । "
त्या प्रवाश्याचा तो आवाज... आहाहा ! पुण्याच्या पहाटेच्यावेळी हा आवाज कधीच आकर्षित करणारा नसतो, तो या प्रवासात येतो, जेव्हा पहाटेला आपल्या कॉटच्या खालचा नवा प्रवासी त्याच्या बायकोला कौतुकाने सांगतो, मी अर्धा लावलेला डोळा उघडत त्याच्या बायकोने चेहऱ्यावर घेतलेल्या पदराकडे बघत खिडकीच्या सळीतून झाडांमागून डोकावलेला सूर्य कौतुकाने बघते... मन ओढीने तिथल्या स्त्रिया, पुरुष आणि तिथली माती न्याहाळू लागतो... सोशल मीडियावर पाहिलेल्या फोटोत दिसतं तसं दृश्य डोळ्यात आणून मन राजस्थानला राजेरजवाड्यांत सजवलेलं पाहायला आतुर असतं पण दृश्य त्याहून खूप कोरडं आहे. तिथे दूरदूरवर निसर्गाचा नामोनिशाण आम्ही ज्या भागातून गेलो तिथे नव्हतंच. तरीही राजस्थानची उत्सुकता सुटत नाही कारण राजस्थानचा मूळ आत्मा मी पाहिलेला नसतो.
तो आत्मा पाहण्याची इच्छा, पुढच्या सहलीत रिजर्व्ह करीत मी ते सगळं त्या पहाटे न्याहाळू लागते.
सकाळची वेळ संपून दुपार होत जाते. तसं तसे आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन फावल्या वेळेतले खेळ खेळून एकमेकांचे अधिक घट्ट मैतर होऊ लागतो.
ट्रेनच्या डब्यात वातावरण नेहमीसारखेच वेगवेगळ्या लोकांनी आणि त्यांच्या सवयीनी भरलेले होतं. ट्रेनमधील तसा माझा हा दुसराच प्रवास.
हा प्रवास माझ्यासाठी पहील्या प्रवासापेक्षा वेगळा होता. कारण यावेळी मी एकटी जात नव्हते माझ्यासोबत मित्र कंपनीही होती. शिवाय, विशीच्या पुढे गेल्यानंतर मॅच्युर पण थोडे अवखळ होऊन अशा शैक्षणिक सहलींना जाण्यात खरं फिरणं असतं आणि आपल्या अवतीभोवती ओळखीच्या वाइब्ज असल्या की आपण मुक्त असतो. सांभाळायला कुणीतरी आहे या भावनेने व्यक्ती थोडा निष्काळजी होतो. मीही झाले.
मला तर राहून राहून आठवत होतं कि आपण दिल्लीच्या प्रवासात आहोत...
मनाला टवटवीत नि नवखं वाटावं म्हणून मी सतत स्वतःलाच धप्पा देऊन सांगत होते,
"यहिच तो ख्वाहिशें थी तेरी, देखा ताकद है तेरे सपनों में। दौड़े खींचे तेरेही पास आ गए। "
नकळत मन दिल्लीचा विचार करू लागतं...
दिल्ली जशी दिलवालोंकी म्हणून प्रसिद्ध तशीच ती असुरक्षित राज्य म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिथली निर्भया आजही अंगात वाघनख्या सारखी टोचते. पण तरीही येथूनच सगळा भारताचा गाडा हाकला जातो. एखाद्या देशाचा राज्यकारभार चालवायचा, म्हणजे ते ठिकाण जितकं देशातील लोकांसाठी महत्त्वाचं, तितकच ते विलायतांसाठीही महत्त्वाचं.! त्यामुळे जसे स्वदेशींसाठी दिल्लीत वावरणे म्हणजे देशाचा स्वाभिमान नजरेत घेऊन ते राज्य बघणे असते, त्याचाच विरोधाभास म्हणजे विदेशींसाठी या राज्याच्या प्रत्येक घटनेची खबरबात ठेवणे काम असते. त्यामुळे स्वाभिमान आणि असुरक्षितता या दोन्ही तटबंदीने युक्त अशी ही दिल्ली आहे.
दिल्लीत वावरणे हे कधी मी स्वप्नातही बघितले नव्हते.
तसं याबद्दल लिहीन असा विचारही नव्हता केला. पण आपल्या राज्याव्यातिरिक्त दुसरे राज्य आपण बघतोय ही भावना फक्त मनात ठेवलीच जात नाही. कारण एका छोट्याशा झोपडीत वावरणार बालपण आणि त्यानंतर त्या एका फ्लॅटमधून गूगल आणि इंटरनेटवर आणि फारफार तर पुस्तक आणि नकाशावर दिसणारे राज्य होते हे.

लोक म्हणतात, राजकारणी मंडळीचे आवडते राज्य आहे दिल्ली. पण मला तसा फारसा त्यातला रस नव्हता खरा. पण पण जेव्हा पत्रकारिता सुरू केली. मी हळूहळू कानावर पडतय म्हणून बातम्या वाचू लागले आणि त्यातील थोडेसे दुवे समजून घेऊ लागले. पण तालुक्याचे ही स्वप्न न पाहिलेली मी आज ट्रेन मधून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा अशी बरीच राज्य, स्टेशन्स बघत नजर आणि मन एकमेकांशी घुटमळवत होते.
सुरुवतीपासूनच सांगायचं तर आमचा प्रवास सुरु झाला तो दुपारी पुण्याहून रात्री मुंबईला. त्यानंतर मुंबईवरून बांद्रा टर्मिनस ते हजरत निजामुद्दीनपर्यंतचा प्रवास हा एकूण दोन दिवसांचा प्रवास ठरला. त्यात अंदाजे ९८हून अधिक स्टेशन्स होती.
हा आमचा निजामुद्दीन स्टेशनला जाण्याचा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या आलिशान प्रवासाला जाणे म्हणजे अविश्वसनीय होते. कारण घराच्या तटबंदीने घेरलेले आयुष्य या आठ दिवसाच्या दिल्ली प्रवासात वेगळ्या नजरेने दिसणारं होतं.
दिल्लीला जायचे ठरल्यापासून मी आतून खुश होते ते केवळ या कल्पनेनेच की, आजवरच्या आयुष्यात मी कधीच घराबाहेर एकटी थांबले नव्हते, तेही ८ दिवसांसाठी. त्यामुळे दिल्लीसारख्या ठिकाणी एकटं राहणं, खाणं पिणं, फिरणं, आणि तिथल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद एकटं राहून घ्यायचा ही एकमेव भावना आयुष्यात पहिल्यांदा होती. ती भलतीच खास होती!
भावना कल्लोळ शांत होत नव्हता.
पण तरीही सगळं आवडत होतं.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता हजरत निजामुद्दीन या ठिकाणी आम्ही उतरलो.
स्टेशनच्या नावाची ओढ लागली होती खरी, त्यानुसार हजरत निजामुद्दीन हे नाव निजामुद्दीन औलीया या सुफी संताच्या नावाने हे नाव पडले.
तिथेच निजामुद्दीनच्या स्टेशनवर लोकांना निरीक्षणायचं हे नकळत अंगवळणी पडलेले. पण त्या आधी दिल्ली भागातला चहा प्यायचा कारण त्याशिवाय सकाळी सहाची झोप उडणार नव्हती. आणि दिल्लीतील काहीच मिस करायचं नव्हतं. त्यामुळे आधी चहा. मग बाकी सगळं, असं करत तसेच दोन दिवस बिना आंघोळीचे काढून पारोसे चेहरे घेऊन आमची गॅंग त्या चहाच्या टपरीवर पोहोचले.

हर शौक इंसान का शौकीन होता। और बेशक चाय के नशे का हर इंसान का शौकीन हैं।
चहा पिऊन झाला... आता खरी ओढ लागली होती. दिल्ली फिरण्यासाठी खास बसची सोय होती..त्यामुळे तिथे उतरून आम्ही तडक इंटरनॅशनल युथ हॉस्टेल गाठले. सगळे अंघोळ करून स्वतःला बरं वाटेल म्हणून आपापल्या रुममध्ये पळाल्या. माझा हॉस्टेल प्रवास सुरू झाला...
क खोली, सात मुली आणि एक बाथरूम, एक टॉयलेट.
गेल्यागेल्या सगळ्यांनाच अंघोळ करायची. आणि त्यात दोन तासात तयार होऊन दिल्ली दर्शनास जायचं, हे अवघड झालं होतं. कारण त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनाने हे स्वीकारलं की, " मुलींना तयार होण्यापेक्षाही अंघोळीला जास्त वेळ लागतो." दोन तासात आमच्या खोलीतल्या फक्त तीन मुलींच्या अंघोळी झाल्या. शेवटच्या चार मुलींनी पाचपाच मिनिटात उरकलं, पर्याय नव्हता.
आणि अशाप्रकारे नाश्ता करून आम्ही २५ मार्चला दिल्लीतील सगळ्यात प्रशस्त आणि आवडत्या जागी पोहोचलो. कारण पत्रकारितेत खूप काही नाही पण अशा प्रशस्त जागांतील प्रशस्त वातावरणात जाऊन काहीतरी स्वतःच्या करियरच्या दिशेने महत्वाचं उचलायचंच हे कळलेल असतं.

आजची ओढ़ होती 'बीबीसी...'

तेच बीबीसी जे इंटरनेटवरून जगभरातल्या अनेकानेक ठिकाणी झळकते. पण आज ते दिल्लीतून इतक्या जवळून बघणं म्हणजे, मुळात मी दिल्लीत आहे हि भावनाच इतर सगळ्या भावनांना द्विगुणित करीत होती.
बीबीसीचे आकर्षण पत्रकारितेपासून अति जास्त वाढले होते. कारण तिथे जे आहे ते खूप कमी माध्यमांत आहे.
निःपक्षपाती बातमीदारी.
बीबीसी ही ब्रिटिश कंपनी असल्याने फारफार तर ती लंडनच्या बातम्या पक्षपातीपणे देईल. (तेही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही)
बीबीसी आजपर्यंत मी  अनुभवावरून तरी निःपक्षपाती वाटले. पण जेव्हा असे ब्रँड भारतात त्यांचे स्थान वसवतात, ते प्रगतीस उभारी देणारे ठरतात.
'काही वेळेला अशा कंपन्या या स्वदेशीवर घाला घालणाऱ्या असतात' असे म्हटले जात असले तरी, मला ते चूक वाटते कारण प्रत्येक देश हा परस्परावलंबी आहे. स्वावलंबी होऊन तो स्वतःच्याच परिघात अडकून राहतो. त्यामुळे बीबीसीचे यश हे मला खुपत नाही.
आज बीबीसीचे प्रसारण हे ४०हुन अधिक भाषांमध्ये आहे. हे सोपे काम नाही. दिल्लीत बीबीसीचे दोन फ्लोअरवर काम चालते. आम्ही दोन्हीही मजल्यावरील प्रत्येक विभागास भेट दिली. शिवाय लाईव्ह रेकॉर्डिंग.
प्रत्येक भाषेसाठी आवश्यक ते ४-५ विभाग आणि त्या विभागास कमीत कमी २-३ लोक (तेही कमी), असे ४० गुणिले १२ म्हणजे एका भाषेसाठी ३६० कर्मचारी आणि त्यातल्या त्यात बॉम्बिंग म्हणजे 'बीबीसी ही लंडनमधून सगळ्या भाषेत काम करत नाही' ही कंपनी अनेक देशांमध्ये कार्यरत आहे त्यामुळे त्या त्या देशांत कार्यरत मनुष्यसंख्या वेगळीच, हे निरीक्षण केल्यानंतर हे मनुष्यबळाचे गणित अधिक बळकट होत जाते.
बीबीसी होस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी, आंतरराष्ट्रीय बीबीसीचे ५ रेडिओ स्टेशन, न्यूज पोर्टल, लाईव्ह स्ट्रीमिंग वाहिनी, पॉडकास्ट अशाप्रकारचे विविध माध्यमांत बीबीसीचे स्वरूप आहे.
२ ऑक्टोबर २०१७ ला बीबीसीने गुजराती,पंजाबी, उर्दू, मराठी, तेलगू या भाषांमध्ये बीबिसीला उतरविले.
स्वाभाविकपणे बीबीसी हे मातृभाषेत आल्यानंतर मी त्याच्याकडे जास्त वळले.
माहितीनुसार, बीबीसी ही ब्रिटिश लोकांच्या फंडिंगवर म्हणजे टॅक्सवर चालते. त्यामुळे, बीबीसी वेबसाईट्स आणि संपूर्ण बीबीसी माध्यम हे जाहिरातींना कमी प्राधान्य देतात. बीबीसीचा मूळ उद्देश हाच आहे कि, स्थानिक माध्यमांवर लक्ष्य केंद्रित करून तळागाळांपर्यंत पोहोचणे आणि आंतरराष्ट्रीय बातम्या मराठीत आणणे.
बीबीसीचे आतील वातावरण अनुभवले जरी नसले तरी एका भेटीत बीबीसी हे सकारात्मक वाईब्जने भरलेले वाटले. कारण बीबीसी ही कुणालाच टाळत नाही. मुख्यत्वे त्यांच्या आखून दिलेल्या तत्वांवर ठाम असते म्हणून ती इतर माध्यमांतून उठून दिसते कारण बीबीसीची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी बीबीसीचे तत्व होते, "सुरुवातीच्या काळात खूप अपेक्षा ठेऊ नका. आणि आज जेव्हा कंपनीने यशाचा सन्मान मिळविला तेव्हाही बीबीसी या मतावर आहे कि, विश्वासार्हतेला पात्र ठरा." त्यामुळे सद्यपरिस्थिती जगभरातील माध्यमांसाठी बीबीसीची हि तत्वे आचरणात आणावी अशी ठरतात.
अशाप्रकारे, बीबीसी होस्ट कडून बीबीसीच्या ऑफिस बद्दल पुरेशी माहिती मिळाली. मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात अनामिकपणे वाटून गेलं, त्या परफेक्ट आत्मविश्वासू स्वाभिमानी मुलीच्या सोबत तिच्या शेजारच्या डेस्क वर त्या कंप्युटर मध्ये डोकं घालून काहीतरी बीबीसी साठी लिहिणारी उद्या मी तिथे असेल. हेच वातावरण हीच दिल्ली आणि हेच ते बीबीसी...

अशा नोटवर मी बीबीसी सारख्या पहिल्या वहिल्या आवडत्या ठिकाणाला मनाच्या अनोळखी स्वप्नात अॅड् केलं.
(या पद्धतीचे ब्लॉग लिखाण हा केवळ आवडीचा अट्टाहास त्यामुळे, लिखाणातील काही दुव्यांमध्ये काही चुका आढळल्यास जरूर कळवावे)
-------
क्रमशः

दिल्लीतून...

by on एप्रिल ११, २०१९
पुण्याची गरमी मागे टाकून आम्ही दिल्लीच्या दिशेने रवाना होत होतो. हळूहळू वेगवेगळ्या राज्यांची हवा अंगाला लागून जात होती... माझ्...


आनंद कुठे आहे ?... 
कुठल्याही रस्त्यावर?...
मन गांगरून, गोंधळून गेलेलं नि कुठल्याही निष्कर्षाला पोहोचत नव्हतं,
नजर फिरवली...
श्वास शांत केले, मन शांत करत सगळं डोक्यातील बाजूला ठेवत सगळीकडे एकवार पाहिलं. 
बाजारात कित्येक गृहिणी स्वतःतच रमत गमत उद्याच्या दिवसासाठी भाजीपाला खरेदी करीत होत्या...
 त्यांना माहितीही नव्हतं, त्यांच्या सौंदर्याचं नंदनवन याच बाजारात होतं. रोज असतं.
नंदनवन म्हणजे तोच तो... जो लाकडाची विणलेली पाटी गळयात अडकवून रोज कुठल्याच रोमँटिक भावनेविना तिथे उभा असतो ... 
मोगरा पारिजातकाचां सुवास पाटीत घेऊन त्या बाजारात उभा असतो, नियमित! 
 त्या गर्दीच्या ओढीत मीही त्या सुगंधाकडे खेचली जाते, गर्दीच्या रस्त्यावरून चालताना अलगद तो गहिरा सुवास चाफेकळी नाकाला स्पर्शून जातो, मनाच्या हरेक कानाकोपऱ्याला निस्वार्थ ताजं करून निखळ सुखवून तरीही तो पुरून उरतो नि पैसा क्या चीज विसरत माझा हात पाकिटात जातो नि मोगरेवाल्याकडून तो लाखमोलाचा सुवास विकत घेतला जातो ...
तो सुवास मी कोणाला देणार हे तेव्हा माझ्या मनालाही माहिती नसतं, तो आईलाही देऊ शकते नाहीतर प्रियकरालाही...
 पण कुणाकडून तरी शिकले होते, आपल्याकडचा मोगरा वाटता यायला हवा... !
तो कुणालाही देवो, पण मनाची उबदार भावना व्यक्त होईल त्या एका मोगऱ्याच्या नैसर्गिक अत्तराने! काही क्षण भन्नाट विकत मिळतात, मनाला त्याची पारख हवी. !मनाला मी आज ते अत्त्तर देण्यास समर्थ ठरले होते... 
 एक सुविचार निर्माण करण्यास मन आज तयार झाले होते,

झगमगत्या तरारी स्पर्धेच्या जगतात भिर्कावलेले मन एका अशा मदिरेजवळ विसावते, जिथे मनास ग्लानी मिळते एका न प्यायलेल्या मद्याची... हा सुवासाचा प्याला असा काही धुंदीत घेऊन जाऊन असेच कैक पॅक कित्येक मनांवर उधळून देतो, सुखवण्याची किमया साधतो!.... 
चिअर्स टू मोगर्याची कैफ !!! 💛


- पूजा ढेरिंगे

कैफ मोगर्याची .!

by on एप्रिल १०, २०१९
आनंद कुठे आहे ?...  कुठल्याही रस्त्यावर?... मन गांगरून, गोंधळून गेलेलं नि कुठल्याही निष्कर्षाला पोहोचत नव्हतं, नजर फिरवली... श्वास...