जुलै 2018 - Sufi

आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ...प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा... त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि त्याच्या मित्रांनी मला बघितलं. इथेच माझे कॉलेजचे दिवस सुरू झाले. मग मला कुछ कुछ होता है पण आवडला, नि राजा हिंदुस्थानीही आवडला.
कॉलेजमध्ये आपली पण एखादी लव्हस्टोरी असावी म्हणून ते प्रेम होत बहुदा... ! घरचे म्हणता म्हणून लग्नासाठी पोरगा बघावा तसं त्याचे मित्र आम्हाला चिडवता म्हणून आमची पण लव्हस्टोरी असावी. एवढा साधा आयुष्याचा मोटो होता. म्हणून एकच ध्येय, की त्याच्याबरोबर निदान पुढच्या इयत्तेत जाण्याएवढा अभ्यास करावा. मग त्यात कोणत्याही सरांची बोलणी खावी, अगदी गोड वाटायचं सगळं...
         खरं सांगायचं तर, त्यावेळी ना फेमची भूक, ना रीचनेसची बाडबिस्तर, नाही शाइनिंगची दुकान ... त्याने फक्त आहे तसं स्वीकाराव नि त्याच्या मित्रांनी असच जोडीनं चिडवत राहावं इतकंच काय ते वाटायचे. एकवेळेला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण एकवार त्याने ते गोंडस हसून पहाव इतकंच. वेड होतं ते पुरतं. आजच्या रिचनेसमध्ये मी त्याच्या रिचस्माइलवर मरत होते. आजही ते सगळं आठवून स्वतःला निरागस बावळट म्हणण्याचा चान्स मी सोडत नाही.
          हॅहॅहॅ.... तो गॅदरिंगचा दिवस कसा विसरू!  ....कधी नाही ते साडी घालायचं मनावर घेतल. का ते सांगू नाही शकत. इश्श लाज वगैरे वाटते जरा. अशातच तो भरमसाठ झगा गावभर घेऊन कॉलेजपर्यंत जायचं, 'वैसे उसके लिए ना सही, लेकिन उसके एक झलक के लिये इतना तो बनता था यार' ...मी छान तयार होऊन गेले. मी सांगते, वायफळ तयार होणं होत ते.... टोटल वायफळ ! आयुष्यातला व्यर्थ दिवस.
          आमच्या एकतर्फ्या प्रेमाची चर्चा गावभर नसली तरी ग्रूपभर होती. त्यामुळे त्यांना आयता बकरा मिळाला होता....त्यांच्या चिडवण्याचा मला काडीमात्र फरक पडत नव्हता. फक्त तो का दिसत नाही?, एवढ एकच एक मनात घोळत होतं. कॉलेजमध्ये घुसल्यापासून डोळ्यात फक्त त्याची झलक होती. पण तो दिसायला तयार नव्हता. तसं कॉलेजच्या दिवसांत 'आपणही सुंदर दिसु शकतो हे ध्यानीमनीही नव्हतं'. त्याच काळात ती गारव्या हिरव्या रंगाची साडी, ओठांना लाल रंग, चेहऱ्याच्या कातडीला फाउंडेशन वगैरेचा झोलच नव्हता, आपली पौंड्स पावडरच ते तेज जे खुलवायची ते लाजवाब असायचं आपल्या नैसर्गिक त्वचेला कसला धक्का लागायचा नाही. नि ब्लश ? ब्लश हे गालांना लावलं जातं हे आत्ता कळण्याचे दिवस. त्या काळात हा ब्लश आनंदाने सजवायचा तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातून. विकत न मिळणारा हा ब्लश भलता मौल्यवान वाटायचा.
हाच ब्लश चेहऱ्यावर येत नव्हता कारण तो अजूनही कॉलेजमध्ये आला नव्हता. की मग आला होता पण मला दिसत नव्हता ? माझी हुरहूर संताप वाढत होता.  शेवटी बळीचा बकरा बनले मी ! माझं गृपमध्ये लक्ष नाही हे बघून मित्रांनी  मला तो येईपर्यंत 'अलका याग्निकच्या आवाजातल घूंगट की आड से' कंटिन्यू एकामागे एक प्रोपोगंडा राबवावा तसं ऐकायला लावलं .... न ऐकण्याच्या आविर्भावात असलेली मी मित्रांनी त्याची शपथ दिल्यावर विरघळले होते.  आणि त्या रणरणत्या तापत्या उन्हात मी एका परफेक्ट सोलमेटसारखं ते गाणं कानातून रक्त येईपर्यंत ऐकत होते, ऐकत होते, ऐकतच होते! पण मी गाण्याचा एक शब्दही ऐकला नव्हता कारण माझी नजर, कान, डोळे हे फक्त आतुर होते त्याच्यासाठी.  तरी तो दिसला नाही.  ते सहा मिनटाचं गाणं तो दिसेपर्यंत कमीतकमी सहा-सात वेळा मी ऐकलं असेल, तेव्हा कळलं किती दुख त्या चित्रपटातल्या नटीला झालं असेल जेव्हा तिच्य शृंगारानंतर तिच्या प्रियकराने तिला पाहिलं नसेल ...पण मी मुलगी असुन मी लवकर आवरून आले याला का इतका वेळ लागतोय?. माझी स्वतःवर आणि त्या झग्यावर प्रचंड चीडचिड होत होती. आणि गेस व्हॉट फायनली तो दिसला नि यांनी 'जब तक ना पडे आशिक़ की नजर' म्हणून इशारा केला.. आणि चक्क या कॉलेजच्या एका वर्षाच्या नजरानजरमध्ये पहिल्यांदा तो हसला, मला विश्वास बसेना तो हसला होता. आयेहाय....! ते हसणं, त्याचे ते ओठ जे मला बघून हसले होते, आणि ते डोळे मला बघून दुजोरा देत होते की 'तु हे माझ्यासाठी केलं आहेस आणि मला ते कतल-ए- नजर' आवडलं आहे....  वूओवssssss माझा आनंदच कमी होत नव्हता.  काय गुदगुल्या होत होत्या म्हणून सांगू, गालावरचा तो ब्लश तर ओसंडून वाहत होता. बिकाउ ब्लश असता तर या ब्लशपुढे उडून गेला असता. हा मौल्यवान होता! 
          गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती, तो हसलाही आणि थोड्यावेळाने मित्रांबरोबर त्याने पुढे जाऊन पुन्हा एकवार वळून मागे बघितले होते त्याने . मला त्याला ओरडावंस वाटत होतं की ' वेडाये का तू ? ऐसे देखकरही मार डालोगे तुम'.अहाहाsss अलका याग्निक मानवली होती. माझं सर्वांग त्याच्या त्या 'फिरसे मुडकर देखना तुम्हारा रास आ रहा हैं हमें, युं ऐसेही देखा करो ना हमें' म्हणत त्याचं स्वागत करत होती. .... मी खूsssssप खूप खुश होते.
           माझं साडीप्रकरण गाजलं होतं.  ते आजही मन शाहळून जातं ... त्याचा तेवढाच एक फोटो मेमरीमध्ये कॅप्चर झाला जो आजही कुठली अलमारी उघडून बघावा नाही लागत. आठवण आली की समोर माझ्या तो फोटो येउन ठाकतो.
 त्यानंतर बारावी झाली, कॉलेज संपलं, ती निरागसता ते प्रेम नावाचं व्यसनही सुटलं. या मोठ्या गोष्टींच्या गर्तेत ते ऊनही विसरले नि अलका याग्निकलासुद्धा. आठवणीत होतं फक्त त्याचं गोंडस हसणं  ..बस्स ती पहिली नि शेवटची स्टेप स्वतःच्या प्रेमासाठी आणि प्रेमाच्या तसल्लीसाठी. !
अशावेळी वर्तमानात डोकावून पाहिलं की वाटतं, कुठलं प्रेम करतात आजकालची ही सात-आठवीची मुलं ...?
          मला आठवतंय, ना त्याचा हात हातात घेतला ना हिमतीनं त्याच्या डोळ्यात कधी पाहिलं. उलट त्याला पाहून ब्लश करणं नि लाजणं हाच प्रेमातला नाजूकपणा होता, जीवंतपणा होता!
          ऊप्स ती केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स लॅब.. ते  विसरले तर कॉलेज आणि तो पूर्ण होईलच कसा  ? याची तर मज्जाच वेगळी असायची. त्याने मला वर नजर करुन पहावं म्हणून निमित्त करत आम्ही रोज उशीरा पोहोचायचो नि कितीतरी वेळ सरांची तीच ती बोलनीही खायचो. सर तिकडे बोलत बसायचे मी इकडे डोळ्यांचे चोचले पुरवायचे... कित्ती गोड चिडायचे ते सर .... आणि तेवढं करुनही सरांच मन भरायचं नाही ते आमच्या बॅच वेगवेगळ्या करायला जायचे. ये जुदाई मै भला होणे देती. मी बंड करून उठायचे नि म्हणायचे ' त्या लॅबमध्ये बर्नर, माचीसपेटी नाहीये सर, मॅडमने इकडेच पाठवलंय' आणि एवढ्या धाडसाने त्याच्याच बॅचमधे प्रॅक्टिकलला बसायचे. प्यार धाडस देता हैं कुछ भी करने का ... आणि हेच धाडस करत नजर मैत्रीणीशी भिडवत त्याच्याकडे हात करत बर्नरसाठी माचीस त्याच्याकडेच मागायची. नजरेला गुस्ताखी करण्याची संधीच द्यायची नाही. त्यामुळे सगळं बोलायचो पण बोलायचोच नाही.  अजब असायचं सगळं काही ....
             हाहाहा तो मराठीचा पेपर .... आज आठवतानासुद्धा कस ताजं वाटतय सगळं, जसं आत्ताच घडलं असावं नि मी चित्रपटात पाहत असावी.  त्याच्याकडे पेपर लिहायला परीक्षा पेपर नव्हता. मित्रांकडे मागितल्यानंतर मलाही मागितली. त्याने पहिल्यांदा काहितरी मागवलं आणि मी त्याला नकार द्यावा हे मला पटत नव्हतं म्हणून मी ' आहे  ना... पण बाथरुमला जाऊन येते मग देते.' म्हणून जी त्या कॉलेज स्टेशनरीत धूम ठोकली ती  माझ्याकडे नाही म्हणून परीक्षा सुरु व्हायचा शेवटच्या मिनिटापर्यंत बाहेर थांबून ती घेतलीच नि ती घेऊनच वरती आले. पण्ण माझं दुर्दैव हे की त्याआधीच त्याला परिक्षा पेपर मिळाल होता पण सुदैव हेच की परिक्षा निरिक्षकाने  पेपरला बसू दिलं. डर नापास व्हायचं नव्हतं रे कधी... दुसऱ्या वर्गात जाऊन बघायला कष्ट लागले असते ना जरा आणि स्वतःच्या वर्गातून त्याला बघण्याची मजाच काही और असायची. म्हणून ही उठाठेव !
          काय एक एक खूळ असायचं त्यावेळी मैत्रीणींच्या सांगण्यावरून नवीन ड्रेस घातला, नवीन हेअरस्टाईल केली की वाटायचं आधी त्याने बघावं एवढी साधी इच्छा आणि आणि आनंद असायचा तेव्हा. नाहीच कधी बघितलं तर थोडस हार्टफेल व्हायचंच यार्र प्यार नहीं था लेकीन एकतर्फा तो था त्यामुळे....'प्रेमात खचून नाय जायच बॉस ' हा मंत्रा कॉलेजभर पुरला ... पुढल्या दिवशी पुन्हा नवीन प्रयोग नवीन प्रयत्न, ना अहंकार ना ऍटिट्यूड ... सगळ कसं एकदम निर्मळ नि हार्मलेस होतं...
           सगळ झालं. आज तीन वर्षे झाली. सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या असण्यापासून त्याची अटेंडेन्स लावण्यापर्यंत सगळंपण त्याला ना कधी कळलं, ना मला सांगावस वाटल ....
त्ते म्हणतात ना प्रश्न,भांडण,वाद आणि ब्रेकअप या गोष्टी प्रेम व्यक्त केल्यावर सुरू होतात म्हणून मी कधी बोललेच नाही.
 कारण त्याच्याबरोबर ब्रेकअपच दुख: नव्हत मला, फक्त माझ्या प्रेमाबरोबर मला ब्रेकअप नव्हतं करायच खरंच! जसं होतं तसं मस्त होतं, माझं होतं. यात मी खूश होते प्रचंड! ना अपेक्षा ना भीती. जो जवळच नाही, तो दूर जाण्याची भीती नसते आणि जो हृदयात आहे कित्येक वर्षापासून एकतर्फी प्रेमात, त्याने आपल्याला सोडावं हा लवलेश नसतो ....
"उसने कभी उस नजर से मुझे देखा नही बात अलग है,
लेकिन मे उसे उसी एकतर्फी-नजर से देखुंगी ये भी तेय है ||" या वाक्यातलं समाधान मला जपायचं होतं.
एकच समाधान असेल आयुष्यभर की, हे माझं हक्काच प्रेम ना लग्नानंतर मला आडवं येईल ना आत्ता ....
            फक्त ते दिवस असमंजस, खुळे निरागस आणि खऱ्या प्रेमाचे होते. ते परिकथेचे दिवस गेल्याचं थोडं दुख या समंजस आयुष्याचा ताण आला की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहे.  अन पहिला दिवस आठवल्यावर त्याचा चंपू तेल लावलेला चेहरा नि सेंड-ऑफच्या दिवशी स्पाईक्स केलेला चेहरा , दोन्ही बिफोर-आफ्टरसारखे आठवतील नि या बिफोर आफ्टरमधला एक अख्खा आठवणींचा जलाशय, त्याच्या हास्याने नि फक्त त्याच्या अस्तित्वाने तुडुंब भरलेला दिसेल ...

#shades of Love


ये उन दिनों की मोहब्बत हैं|

by on जुलै २४, २०१८
आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ... प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा...  त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि...

पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं... या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दुनियेला, त्याच्या मोहमायेला झुगारून मी त्याच्याशी समरूप होते, सगळं दु:ख सांगुन मोकळी होते...!
त्या घट्ट आकाशाच्या काळपट रंगात डोळ्यात डोळे घालून मी म्हटलं, "अब याद नहीं आती उनकी... सच ही तो कह रही हूँ| "
तितक्यात मला आठवलं सोबत मित्रही आहे आणि त्याच्या एका संभाषणाला कंटिन्यू करत तो एकसकट एक वाक्य म्हणाला,
"जितकं लवकर एखादी भावना स्वीकारशील ना, तितकं तुला सोप्प जाईल त्यातून बाहेर येणं किंवा किमान त्यातून सर्वाइव्ह करणं सोप्प होईल. नाहीतर ती मनात दाबून टाकली कि तिचा विस्फोट होतो... उधाण आलं तरी चालेल, बोलून टाकायला हवं... "
खरं होतं ते?
नेम्मक्क तेव्हा अचानक एखाद्या आठवणीला डोकवायचंच असतं, निमित्ताच्या ती शोधात असते....
आणि यावेळी मित्र म्हटल्याप्रमाणे मी त्या आठवणीला स्विकारून येऊही दिलंच... मलाही निमित्त हवं होतं...
"काय होतंय जास्तीत जास्त...?" म्हणत मी स्वतःलाच प्रश्न केला ...
"त्याची कडाडून आठवण येतेय." उत्तर मिळालं. पण मी चहा ठेवायचा बहाणा करून ते टाळल्यासारखं केलं ..
बाटलीतलं पाणी घटाघटा चहासाठी टाकला. साखर त्याची नि माझी मिळून दोन चमचे टाकली .... त्यात रागारागात गवतीचहा टाकलाच आवर्जून.
रागारागात ज्याची आठवण आली त्याच्याशी संवाद साधल्यासारख करत ध्यैर्याने मी बोलत होते; तुझ्या आठवणी मला आवडत नाहीत. पण गवतीचहाने त्यांना उधाण येणार असतं आणि मला ते उधाण निर्लाज्जसारखं हवं असतं... 'का हवं असतं?' हा दुधखुळा प्रश्न तु मला न विचारलेलंच बरं. हक्क तोही नाही तुझा.!
पण तितक्यात तो उकळणारा गवतीचहा विक्षिप्तपणे त्याच्या येणाऱ्या बुडबुड्यांतून मला खॊचकपणे विचारूनच टाकतो, "कुठे, आहे कुठे तो?"
मी त्यालाही टाळल्यासारख करते...
समोर मित्र बसलेला आहे...
गवतीचहाच्या दोन पाती न गाळताच तो कप स्वतःला घेत, दुसरा 'आज माझ्या हातचा चहा पाजते तुला.' असं म्हटलेला चहा त्याच्याकडे सरकवते. त्या सरकवण्याबरोबर रिटर्नमध्ये आधीची आठवण बॅकग्राऊंडला सुरु होते.
मित्राची  बडबड चालू असते आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुझ्या भासांची असंख्य, अखंड बडबड सुरू असते...
"जिथे तु आणि मी असते फक्त."
जिथे तुझं अस्तित्व नसतं, मला ते नकोही असतं... कारण मला आत्ताचा तू नकोच आहेस... हवा आहे तो व्यक्ती, जो कधीकाळी माझा होता, ज्याच्यात मी होते... ज्याच्यात मी स्वतःला ठेवल्यावर मला कसलीच क्षणभरही काळजी नसायची.. कारण तूच म्हणायचास "मी तुझ्या सोबत नाही, तुझ्या आत आहे."
मी माझ्यातल्या तुला जोपर्यंत तू 'माझा' म्हणून होतास तोपर्यंतच्या आठवणीत जपलंय कारण त्या वेळचा तू दूषित नव्हतास. आणि मला या पावसात शुद्ध गोष्टी आवडतात... त्यामुळे आपल्यातले 'आपले' क्षण मी ठेवलेय कि... या सायंकाळच्या पावसातल्या चहासाठी नि बॅकग्राऊंडला असलेल्या तुझ्यासोबत कट्ट्यावर बसून तुझ्यात हरवून जाण्यासाठी. तू असाच तिथे राहा... कधीच जाऊही नको ना येऊही नकोस... 
मी आनंदाने स्वीकारतेय तुझं आठवणींमधलं असणं..
आणि माणसांमध्ये राहूनही स्वतःत जगणं ...

गवतीचहाचा बहाणा ...

by on जुलै २२, २०१८
पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं... या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दु...
कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

ती रात्र 'माझी' ठरली .....

by on जुलै ११, २०१८
कुटंबातल्या नात्यांत... धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो. एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ? असमान आसमंत अ...

           लहान होते मी, तेव्हा माझ्यासारखाच छपरावरचा पाऊस पत्र्याच्या त्या छतावर  ताडताड उड्या मारायचा ... खेळायला, बागडायला, दंगा करायला त्याला ही पत्र्याच्या छपराचीच खोली बरी आवडायची...? प्रश्न नाही पडायचा मला. पण मग कधी इतकं इतकं नाचायचा की छप्पर तुटून त्यातून स्वतःला त्या खोलीत पाडायचा... पाऊस हातावर घ्यायचा हे मोठ्या लोकांचे चोचले !
          पावसा, तु पडताना पाहून आत कामात गुंतलेली ती स्त्री घाई करत तुला तिच्या टोपलीत झेलायची. तु पडणार अजून पडणार, बेदम जोरजोरात पडणार. एक दोन करत करत दहा बाय दहाच्या त्या खोलीत २५-३० छिद्र करणार. ती कुठल्याही तक्रारीविना, तीन थेंबाना मिळून एक भांड लावणार, त्या तुझ्या तसुभर पण मौल्यवान थेंबाला झेलायला. 
          तुझं त्या एवढुश्या छपराखाली हे असं रॉयल स्वागत व्हायचं नं मला तीची धावपळ बघवायची नाही. तुला इथेच का पडायचंय म्हणून राग यायचा तुझा. पाऊस सुखावतो, पिक मोठं करतो, शेतीसाठी पाऊस जीव असतो. हे मोठेपण मला कळायचं नाही, मला तो 'माझ्या छपरावरच का पडायचा?' हा प्रश्न 'बदला घ्यावा त्याचा' इतका जवळचा वाटायचा .
त्या खोलीतच मग एखादा चुकून न गळणारा कोपरा शोधून ती माउली मला अभ्यासाला बसवायची . माझे डोळे तिच्या तुझ्यासाठी चाललेल्या धडपडीने गरगर फिरायचे. तिची कळकळ समजायची "अभ्यास कर गं बाई माझी...!" आणि तितक्यात पुढे बघत पुस्तकाच्या त्या पानावर "पावसाच्या सरसर सरी हातावर घेऊ ..."  या कवितेच्या ओळी  ढोंगी वाटायच्या. ..
          आता दिवस बदलले,... पावसावर रोमॅन्टिक कविता कराव्या वाटल्या तरी वास्तवात तो तितकाच हिडीस, निर्दयी वाटतो कधीतरी. त्याचं हे रुप अशा या छपरांखाली भेटतं.
          "छप्पर असूनही ओसाड आकाश त्या छपरातून खाली पडलेलं असतं... "
            तरीही अशावेळी दूर कुठेतरी हातात कॉफीचा मग, रोजनिशी, पार्करची लेखणी, डोक्यावर सिमेंटचं मजबूत छप्पर, वर अजून मजबूत घरं आणि अशा ठिकाणी खिडकीच्या शेजारी खुर्ची टाकून या पावसाला पाहताना असे दोन चार सुखी शब्द सापडणारा माझ्यासारखा कुणीतरी सहज असतो . कारण त्या चार भिंतीत हा पाऊस त्याच्या डोळ्यांनी पाहता येतो, बाहेर डावा हात काढून, ते थेंब त्या हातावर झेलून उजव्या हाताने त्याला आहे तसं लिहिणं सहज सोप्प असतं कारण तो माझ्याकडे अंगावर येणारा नसतोच. भातलावणी करणारा शेतकरी फोटो काढायला फ्रेमिंग म्हणून छानच वाटतो. पण त्यापलीकडचे कष्ट, त्यामागचं स्ट्रगल खोल असतं, या सुरक्षित चार भिंतीत चार ओळी लिहिण्याइतपत त्याची खोलीही नसते.
          कला फक्त निसर्गात आहे... बाकी कलाकार आपल्याला कला येते हे ढोंग उत्तम करतात.
आज सुरक्षित ठिकाणी बसून,
"छपराखाली आसरा शोधणाऱ्यांना थोडं ज्ञान द्यावंस वाटतं,
छपराखालीही हा असा पाऊस पडतो सांगून टाकावंस वाटतं..."
#Unavoiding_reality



छपराखालचा पाऊस !!!

by on जुलै ०८, २०१८
           लहान होते मी, तेव्हा माझ्यासारखाच छपरावरचा पाऊस पत्र्याच्या त्या छतावर  ताडताड उड्या मारायचा ... खेळायला, बागडायला, दंगा कराय...