ती रात्र 'माझी' ठरली ..... - Sufi

ती रात्र 'माझी' ठरली .....

कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा