डिसेंबर 2018 - Sufi


जुनं वर्ष नवं होतंय... 
जून्यात नवं टाकायचंय ...
नव्याला टिकायचयं जुन्याला टिकवायचंय !

दिवस आजचा खास होत होता.. कारण ... ?
कारण नाही, कारणे होती... अनेक अनेक अनेक कारणे... 
त्या प्रत्येकाची कथा होती. एक वेगवेगळी कथा... 
मनुष्याच्या जीवनाची हीच मजा असते... माणूस कितीही बोअरिंग असला तरी त्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोजचं सरप्राइज असतं...
ते सरप्राइज माणसाचा विचार न करता येतं, आणि नवं काहीतरी देऊन जातं... पण त्यालाच आज सरप्राइज करत वर्षाचं जुनंपण आज सेलिब्रेटच करायचं ठरलं.
बात कुछ यू थी... 
त्या एका ठिकाणी जावं, जिथे आवडेल मनाला... 
वर्षाच्या शेवटी जावंच की...
तिथेच एक पेयं यावं... 
ए दारू नसावी ती, पण तरी नशा कुछ झिंग चढेल एवढी ... 
मागे ' तुझसे नाराज़ नहीं जिंदगी ' इंस्ट्रुमेंटल संगीत ... 
ती धून ओळखत ओळखत पार कितीतरी कधीतरी कुठेतरी ऐकलेल्या मनाच्या कॅसेट प्लेअरमधून ते गाणं धडपडून शोधता शोधता हिय्या... हे तर तुझस्से नाराज नहीं... 
आणि या तेवढ्या कष्टातून मुजिक शंपून दुसरं लगेच, ' जिना यहां मरना यहां ' ... मुड ऑफ होता होता राहून हे गाणं गुणगुणत चालू द्यावा विचारांचा प्रतिवाद... 
              
         विचार आपले केवढे मोठे सोबती असतात... कधीतरी आपली साथ सोडतात ते...? किती गैरफायदा घेता ते आपला !
सतत स्वतःला बरंच अटेंशन मिळवून घेत राहतात...
आणि आपण मनुष्यप्राणी असतोच मुळी खूप निःस्वार्थी... किती साथ देतो ना त्यांची...?
मग काय आपण ऐकतो विचारांचं... आणि घडत जातं आयुष्य...
त्यामुळे या वर्षात निर्णय घेणं किती धाडसाचं असतं शिकले... निर्णय घेण्यात सरप्राइजेस असतात ... ज्या क्षणी निर्णय घेऊ, दुसऱ्या सेकंदावर सरप्राइजचा डब्बा पडलेला असतो...
त्यामुळे तो आपलाच डब्बा घेऊन चालावं लागतं, नवा निर्णय आपल्या वाट्याला येईपर्यंत...
ए तुम्हाला जाणवतं कधी? 
काही वेळा ना, नाही बऱ्याचदा आजूबाजूच्या अनोळखी जगात सुद्धा एक गोष्ट ही आपल्याशी निगडित होतच असते... 
तसं नसतं तर या गाण्यांचा माझा काय घरातला संबंध कधीच नव्हता... ना जिथे मी बसले होते ती जागा माझी होती, पण किती जादू होती त्या गाण्यांच्या अस्तित्वात, अनोळखी होऊन मला त्यांचं करण्याची जादू... 
आयुष्यात म्हणे मी निःस्वार्थी जगतो ... 
श्या खोटं असतं सगळं, स्वतःसाठी जे काही चाललेलं असतं एवढच एकमेवाद्वितीय सत्य!
बाकी सगळे स्वतःचे चोचले! 
या वर्षात अनेक पुरवले... 
पण एक गोष्ट आहे, या वर्षात स्वतःवर भरभरून प्रेम करू लागलेय... कारण ...
कारण नाही कारणे आहेत इथेसुध्दा...
पण महत्त्वाचं कारण म्हणजे, माझ्या अवती अशीच लोकं मी निवडले ज्यांच्या आयुष्यात माझ्या अस्तित्वाचा सकारात्मक दरवळ होता...
त्यामुळे या ३६४ दिवसात करीयरच्या वर्तुळात मी आले, मी जगत गेले, वाढत गेले, प्रगल्भ झाले, वृद्धिंगत झाले, आणि स्वतःवर बरेच मोठाले संस्कार केले रे!
हे शक्य नसतं गड्या... 
म्हणजे या वर्षात मला एक कौतुकाची मोठी थाप काय मिळते आणि स्वतःचे मार्ग सुचत जातात...
एक नितळ स्वप्न मला या वर्षात मिळालं की, पहिल्या वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून लढत राहायचं, लढत राहायचं, शेवटच्या घोटापर्यंत... आणि वर्षाच्या शेवटी जो आजचा दिवस असतो त्या दिवशी ठरवायचं स्वतःशी... भेटायचं स्वतःल ... मनातल्या आपल्या विचारांच्या सोबत्याबरोबर एक ठिकाण निवडायचं आणि छानसा स्वतःच्याच आयुष्यातल्या एका वर्षाचा फ्लॅशबॅक चित्रपट बनवायचा ...  हसत, रडत, हुंदडत, कडकडा राग आणत, खुन्नस आणत, आयेहाये प्रेमात पडत, त्याच्याकडे बघत, त्याच्यात विरघळत जात, कलाकाराने त्याच्या कलेत विरघळत दीर्घ होत जात, लांब उड्डाण घेत मस्त डोळ्यांच्या पडद्यावर बिना तिकीट पाहून घ्यावा हा चित्रपट ! पण तो करायचा पण पैसा वसूल मंगता हां... !वर्षपलभर मेहनत करून स्वतःचा मज्जाक नाही उडवून घ्यायचा हां! 
आणि माझा शो तर पैसा वसूल करण्याच्या नादात बराच पुढे आणला की मी म्हणत घ्यायची स्वतःलाच शाबासकी देत.. 
तेवढ्यात कॉफी आली... 
काय गंमत असते... एक पेयं असतं आणि ताबा करतं ते आपल्या आयुष्यातल्या क्षणावर ... इतकी प्रचंड ताकद ना भो! 
पण हे खरंय, या सगळ्याचं महत्त्वाचं श्रेय मला स्वतः ला जातच पण ते जातं, त्या प्रत्येक क्षणाला... जे मला अशक्य वाटत होते... 

याच ३६४ दिवसांत तीन वर्षापूर्वी आयुष्यात आलेला 'तो' एका दिवसात निघून गेला... 
तो गेला, दुःख केलं, रडले बोंबलले पण थांबले नाही. उलट राग खुन्नस आणि ईगोवर येऊन उठले ... 
कारण एका दिवसात निघून गेला, पुढचे ३६४  दिवस माझे झाले... आयुष्याचा भागीदार गेला... 
और उसके बाद जो हुआ वो 'मंजूर-ए -खुद' हुआ, खुदा नहीं। 
कारण जो त्याचा वेळ होता तो अनेकांना देऊ लागले. आणि जास्त करून तर स्वतःला....
आयला...
'मेरी उमर के नौ जवानो' ... 
मी म्हटलं ना, या विचारांचा सोबती बरोबर हे गाने असतात... धून गात गात म्युझिकचे लिरिकस आठवत, स्वतः शीच गुणगुणत, पुन्हा स्वतःचा चित्रपट सुरू होतो... 
बरं झालं का मी सोडलं त्याला... ? 
कितीही समजावलं तरी प्रेमासारखी हट्टी भावना नसते माणसाच्या आयुष्यात... 
खंत असते एकत्र नसल्याची पण 
प्रेम छान असतं राव, खरंच! म्हणून मग प्रेम सगळीकडे आहे, डोळ्यांना दिसू लागलं... 
बाहेरचे लोक पण काही वाईट नसतात राव... हे त्याला सोडल्यानंतर कळलं. 
याच ३६४ दिवसात माणसं भरमसाठ आली, गेली आणि काही राहिली... 
जी राहिली ती माझी बनली... 
याच ३६४ दिवसात जवानी आली.... जवानी तीच... रिकाम्या रस्त्यावर एकट्याच्या स्वातंत्र्यात फिरणं, मारण्याचा जोश, तिचा किंवा त्याचा हात त्याच एकट्या रात्री हातात घेणं , पहिलं चुंबन , पाहिली मिठी , पाहिलं तडपणं , करीयर निवडण असतं, निर्णय घेणं , पहिला अबोला , पहिलंच शब्द समजुन घेऊन ऐकलेल गाणं असतं... आणि याच जवानीत पुढच्या आयुष्याची किल्ली असते... सुंदर असते जवानी... तिचं मोहरणं जपावं लागतं, उधळून द्यावं असं रूप असतं तिचं पण स्वतःला ओळखून शोधून आणि सापडून घेऊन जगावी ही जवानी... 
याच ३६४ दिवसात, काही तुटलं, फुटलं, निसटलही ... पण जगाच्या आणि जीवनाच्या तत्वज्ञानातून मी 'स्व' ला शोधलं.
प्रत्येक वर्षागणिक एक पान छान घडवायचं स्वतःच्या आयुष्याच, एवढं काबिल बनवायचं स्वतःला... एवढं या वर्षाकडून घेतलं... 
कटिंगमधून निघून स्पेशल करायचं स्वतः ला... !

तेवढीच काय ती ताकद, स्वतःच्या असण्याची!

या वर्षात एक खजिना मिळाला, स्वतःत जे आहे ते सापडलं...

ते शोधलं, ते सापडून अजून दीर्घ होत जाणार हाच नवीन वर्षी संकल्प मनाशी केला... 
त्यामुळे जुनं सोडून नवं घेण्यापेक्षा जुन्यात नव्याची घडण करून त्यातून चमकणं ही ताकद असते, स्वतःची, स्वतःच्या विचारांची.... 
त्यामुळे विचारांच्या  सोबत्याला नीट संस्कार करून घडवा... आयुष्य अपूनकाही हैं| उसे अपुन काही रहना मांगता। इसलिए,
आयुष्य जपा।


एक वर्ष, पैसा वसूल !

by on डिसेंबर ३१, २०१८
जुनं वर्ष नवं होतंय...  जून्यात नवं टाकायचंय ... नव्याला टिकायचयं जुन्याला टिकवायचंय ! दिवस आजचा खास होत होता.. कारण ... ? का...

"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं,
ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| "

काही क्षण कित्ती कित्ती बक्कळ सुंदर असतात म्हणजे सहज गॅलरीमध्ये जाऊन बसावं...
थंड वाऱ्याचं येणं असावं...
बॅकग्राऊंडला दोस्ताला कट्ट्यावर आणेल असं गाणं लागावं...
हातात मोबाईल असावा...
एखादा मित्र आपल्या टाईपचा असावा...
असतात खरंतर ...
टाईपचे फक्त प्रियकरच नसतात, मित्रही असतात...
माझ्या आयुष्यात तो होता, बिलकुल माझ्या टाईपचा...
त्याच्याबरोबर आयुष्याचा सगळा हरिपाठ, रडगाणं, पारायण शेअर करावं ...त्यानं त्याचं सांगावं ... दोघांनी इक्वल बोर करावं.
त्यात एकाने निगेटिव्ह बोललं की दुसऱ्याने त्याला आपटू न देता उचकवत आव्हान देत पॉजिटिव्ह करत वरती आणावं....
त्यात मग आजचा विषय माझ्या 'ब्रेकअपच्या फिलिंगचा' असावा..
मग त्याने विचारावं, "भेंडी दरवेळी तुला सारखसारखं विचारायचंच का,
काय झालंय .... भडाभडा बोलून मोकळं होत जा .... पुन्हां त्याच्याशी वाजलं ?  "
त्याच्या या वाक्यानंतरचा माझा सन्नाटा त्याने समजून घ्यावा.. 
मी बोलायला जावं, "हो .... आज शेवटचं... " मी ठामपणे म्हणावं.
"ओ मोहतरमा.... हे गेल्या ४-५ महिन्यापासून हाच टेप ऐकतोय ... चल तेरे अंदाज में सुना आखिर ऐसा अलग आज हुआ क्या ?...." त्याने उचकवत पण, माझं ऐकून घेण्याच्या आग्रहात म्हणावं.
आणि मग मी सुरु करावं,
"हो ! तोंडावर पडूनही आज त्याच्या स्पर्शात शेवटचं एकदा जिव्हाळा शोधत होते मी ...
हात धरावा, चंद्र दाखवावा, आकाशातला सुकून दाखवावा ... 'आयुष्यभरासाठी माझी होशील का ?' ही कुठूनतरी पाठ केलेली ओळ चिकटवावी आणि अचानक त्याने एक दिवस सोडून जावं ...?
सोप्प असतं ना हे तुम्हा मुलांना?
हे सोडून जावंच लागतं का ? हा बावळट प्रश्न मला पडावा....
मग नंतर...?
मग नंतर सुरु व्हावा माझा असा 'एकटा' प्रवास ...
संपूर्ण काळोख, निगरगट्ट आठवणी आणि एक कणही 'आम्ही पुन्हा एकत्र न येण्याची उमेद नसलेली' आयुष्याची वाट ..."
मित्राने यावर शांत राहावं... 
विषय सेक्स किंवा रोमांसचा आलाच तर बाहेरचा कितीही जवळचा असेल त्याने शांतच बसावं. कारण त्या पलंगावर नेमकं काय घडलंय हे त्या दोन बावळटांशिवाय कोणालाच कळलेलं नसतं... फार फार तर त्याबद्दल गौसिप करावं पण त्या दोघांच्या संभोगाविषयी तुम्ही आत्मविश्वासाने छाती ठोकू नाही...
ते मित्राला माहित होतं, त्याला आमच्या सेक्स लाईफमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याला फक्त मी महत्वाची होते.
मलाही त्याचं ते  शांत राहणं आवडावं, म्हणून माझे रडगाणं उरकून मी त्या माझ्या टाईपच्या मित्राला शुक्रिया अदा करावा...
त्यावर त्याने खदखदा माझ्यावर हसावं...
आणि यावेळी मी त्याला म्हणावं,"चल मेरेही अंदाज में सुनाती हूं... "
आणि मग मी सुरु व्हावं,
"या ब्रेकअपनंतर मी माझी उठायला जाणार होते...
मेलेला आत्मविश्वास आधाशासारखा शोधत होते आणि बर्रोबर इथे-च थोडं उचकवणारा, थोडा चॅलेंज देणारा, आणि जास्त माझ्या भावनांशी घेणंदेणं नसलेला पण माझा गमावलेला आत्मविश्वास मला परत करणारा कुणीतरी हवा होता आणि इथ्थे मला तू भेटलास... बिलकुल मला हवा तिथे आणि तसा! 
अर्थात मला ब्रेकअप नंतर मी पूर्ण एकटी हवी होती. मला शब्दाश: एकांत हवा होता.... 
पण तू आला आणि वचवच सुरु केली. आयुष्य शांत, ओसाड भकास होण्याऐवजी चॅलेंजिंग वाटायला लागलं. 
स्वतःच स्वतःच्या भावनांना कसं कंट्रोल करून जपायचं, हे आव्हान मी त्या काळात पेललं. मी जिंकले, मी आतून खुश राहू लागले...
आणि त्याच थोडबाहोत क्रेडिट हे या हरामी तुला...." त्याच्याकडे बघून हळूच डोळा मारत मी त्याच्याकडे पाहिलं.  
आज कें दिन मेरेही अंदाज में थॅंक्यू म्हणायचं आहे तुला... 
"कारण ब्रेकअपनंतर माझी ज्योत मी तेवत ठेवायचा अतोनात प्रयत्न करतच होते, तिथे दोन्ही हातांनी ती वात विझू नये म्हणून आधार देणारे हात तुझे होते.
ते हात मला ओरबडणारे नव्हते ... मला जिवंत ठेवणारे होते ..."
म्हणून ही गुलाबी रात्र तेरे नाम ...
मैत्री प्रेमपेक्षा कैक पुढे आहे...............


तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस!!!" आणि मी बोलायचं थांबले...
"आणि अशाप्रकारे तुमचा निबंध संपला आहे... टाळ्याssss" त्याने एका झटक्यात सगळा शुक्रिया आहे तसा माझ्या तोंडावर मारला आणि मग तो बोलू लागला,
... 
" प्रेम आणि मैत्री याच्या कैक पुढे आहे आपलं नातं म्हणूनच आपल्या नात्याला मर्यादा नाही .. ते कायम रिक्त असत ...म्हणूनच आपल्या नात्याला नाव नाही... 
आणि तू कोण गं शुक्रीया करणारी .. तुला नाही अधिकार तो.. मला नको तुझं शुक्रीया... घाल चुलीत ते शुक्रिया आणि तुझ्या त्या हरामी प्रियकराला.... 
आणि लक्षात ठेव, मी तुला काहीच नाही दिलं, कधीच नाही... ते देऊही नाही शकत.. तुझ्यात आहे ते सगळं.... तुझ्यात जे दिसलं ते फक्त शब्दात दिल मी तुला.... 
लय बेक्कार.. वाईट .. 
इतकं सिरियस कुणी होत का? चल स्माइल दे ती खदाखदा आणि संपव हे ... हि सिरीयस लोक कशी बोलत असतील यार एवढा वेळ... " 
आणि आम्ही दोघे एकमेकांच्या खदखदणाऱ्या हसण्याकडे पाहून विनाकारण हसू लागलो...
असेच काही क्षण खर्रच खूप सुंदर असतात ... उगाच अशा नात्याचा हेवा वाटून जातो ...
स्साला मित्र असतातच खास, हरामी, कमीने, पण सगळ्यात जास्त जीव लावणारे ! 
म्हणून गुणगुणणे माझं सार्थकी लागतं,
मी गर्वाने गुणगुणू लागते, 
"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं,
ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| "


दोस्ती आझादी हैं |

by on डिसेंबर २८, २०१८
"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं, ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| " काही क्षण कित्ती कित्ती बक्कळ सुंदर असतात म्हण...

ज जेव्हा 'जावळी' बघायला जाऊयाच.' म्हणत मित्राने आग्रह केला तेव्हा "जावळी म्हणजे नेमकं काय असतं.? हे मला ठाऊक नव्हतं, ना वेळच्या अभावी जाणून घेण्याचं कुतूहल चावळलं."
पण वेगळ्या कार्यक्रमाला जाणार म्हणून मी वेगळ्याच उत्साहात होते.
"साहित्य, कलाक्षेत्रातील कुठलाच कार्यक्रम आपल्याला काहीच देणार नाही, असं होणार नसतं, त्यामुळे अपेक्षेची निराशा इथे होत नसते, यात मला आनंद असतो."
म्हणून 'जावळी'ला जाणं स्वीकारलं आणि त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. ठराविक वेळ दवडता काही वेळातच समोर स्टेजवर या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते समोर येऊन 'जावळी'चा परिचय सांगू लागले.  मुळात त्यांच्या कंपनीने या नवख्या प्रयोगाचे आव्हान स्वीकारले ही कौतुकाची बाब, त्यापलीकडे जाऊन त्यांनी जी 'जावळी'ची ओळख करून दिली, त्यातून 'यशोदा'ला बघण्याचं आणि हे नेमकं आहे तरी काय? हे कुतूहल मनाच्या गडबडीत खूप उफाळून आलं.
जावळीचा थोडक्यात परिचय त्यांनी दिला तो असा;
देवदासी स्त्रियांनी सुरु केलेली हि नृत्यापरंपरा... जावळी...
जावळी म्हणजे केरळ किंबहुना दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक नृत्यांपैकी एक. तेथील प्रादेशिक भाषेतून त्या काळातील संस्कृती, समाज, प्रेम आणि शृंगार रसाची भावना अर्पण करणारी ही रचना. मुरुगा किंवा कृष्णासारख्या देवतांना आणि कधीकधी संरक्षणासाठीदेखील हे नृत्य समर्पित केले जात असे. देवदासींनी सुरु केलेली हि नृत्यपरंपरा म्हणजे नृत्यांचा पाया होती. परंतु कालांतराने ब्रिटिशांनी  देवदासींना 'वेश्यांचा' दर्जा दिल्यामुळे ही कलाही लोकांनी तुच्छ समजण्यास सुरुवात केली. त्यामुळे 'या अशा नृत्यप्रकाराला मी येणं, का त्याचा आस्वाद घेणं हे मला आता आवडू लागलं.'
आता मनात अनेक प्रश्न उभे राहिले, म्हणजे प्रत्यक्षात जावळी म्हणजे तमाशासारखं काही असणार का? मग हा प्रकार तिथल्या लोकांचा आपल्याला काय उमजणार तो,? मग यात शास्त्रीय नृत्यप्रकाराचा टच असेल का ? असे अनेक प्रश्न समोर आले.
आणि त्यातच समोर 'यशोदा' आली.
स्टेजवरच्या त्या एका लाईटीच्या प्रकाशात तिचा शृंगार आणि त्यात नटलेली ती सुंदर फ्रेमिंग होती. तिच्या शरीरयष्टीत 'मला इथे बसलेल्या प्रत्येकाला जावळी समजवायची आहे, त्यांच्यापर्यत पोहोचवायची आहे.' हे ठासून दिसत होतं.

जावळी बघताना, या नृत्यप्रकारात एक सामर्थ्य जाणवते कि,  'एक भावना त्या मनाच्या डोहातील प्रत्येक काठाने अनुभवावी आणि ती कशी व्यक्त करावी, ती व्यक्त करण्याची ताकद जावळीत आहे.  त्याचबरोबर, डोळ्यांतील हालचाली, त्यातली चुळबुळ आणि सगळ्याच ठिकाणी प्रियकराला बघण्याची कंठी आलेली आस....' या प्रेमयातना, प्रेमकंठी भावना हे सगळं अगदीच तंतोतंत त्या नजरेच्या बाहुल्यांतून प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांनाही स्वप्रेमाच्या भावनेत सामावून घेणं हे मुख्य असतं. किती सुंदर संकल्पना आहे कि, माझ्या प्रेमाचा इजहार, माझं प्रेम मी उघडउघडपणे आलेल्या प्रत्येकाला सांगून ते साजरं करू शकते. जावळी ही मुळातच कमी लोकांसाठी सादर केली जात असे. आजही ५०-६० (त्या मानाने बरेच प्रेक्षक) लोकांच्या प्रतिसादात जावळी सादर झाली. त्यामुळे याला 'मेजवानी' असेही संबोधतात. मेजवानी या शब्दाचा उगम हा 'मेजवाण' या शब्दापासून झाला. मेजवान म्हणजे यजमान (किंवा त्या काळातील जमीनदार). या नृत्यप्रकारात जमीनदार घरी जेवणासाठी आलेल्या पाहुण्यांना देवदासी स्त्रियांकडून 'जावळी'ची मेजवानी देत असे.   
हा नृत्याचा प्रकार असला तरी या नृत्यप्रकारातून नृत्यांगना बहुअंशी अभिनयाला जोडली जाते.
यात मुख्यत्वे जावळी, पदम आणि वर्णम असे प्रकार असतात.
हे सगळं वर्णन आणि माहिती केवळ एका कुचिपुडी आणि देवदासी नृत्यांगना 'यशोदा राव ठाकूर' हिला बघून सुचत जाते.
कारण मुळात हा नृत्यप्रकार इतका कमी आणि काळाच्या गतीत दुर्मिळ होत गेल्यामुळे हे नृत्य युट्युबसारख्या ठिकाणी दुर्मिळ एखाददोन चित्रफितींतून रंगवलेलं त्यामुळे 'जावळीसारखे' प्रयोग बघणे डोळ्याला, डोक्याला आणि मनाला एक चवदार खुराक असतो.
सादर नृत्यकलेतील जावळीची थीम प्रामुख्याने 'श्रृंगारावर आणि प्रेमावर' आधारित होती. त्यामुळे माझ्या मनाला अजूनच ताजेतवाने करण्याची क्षमता मला त्यात जाणवत होती.
मला समजलेल्या या नृत्यात यशोदा ठाकोर यांनी प्रेमातील अनेक अवस्थांचे प्रत्येक वेगळ्या लकबीने सादरीकरण केले आहे.
त्यातील स्वीय-  या पहिल्या प्रकारात यशोदा तिच्या हातवारे आणि नजरेतून सांगते कि, एक विवाहित स्त्री आहे, जिच्याकरिता तिचा चंद्रही आणि तिचं आकाशही तिचा पतीच आहे. तिचा स्वर्ग तोच आहे. ती पूर्णपणे त्याला कमिटेड आहे.  - अशी स्त्री जी पतीशिवाय कुणाचाच विचार करत नाही... कारण तिची धारणा आहे कि, "तू एकटा आहेस, जो मला या जगातील सगळं देणारं आहेस..." अशा भावनेने नटलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहणारी ती स्त्री आहे.
परकीय या दुसऱ्या प्रकारात ती सांगते, हि स्त्री एक विवाहित स्त्री आहे, परंतु तिचे परपुरुषाबरोबर भावनिक संबंध आहेत. याचे वर्णन हातांच्या मुद्रांनी वर्णाताना ती सांगते कि काल हि स्त्री त्या परपुरुषाला भेटण्यास जात नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा परपुरुष तिला विचारतो कि, "काल तू मला भेटली का नाहीस? "
त्यावेळी ती म्हणते, "काल मला माझ्या लग्नाच्या पतीच्या डोळ्यात प्रेम दिसले. मग थांबले"
काहीसा असुरक्षित होत तो विचारतो " मग आज का आलीस?"
ती म्हणते, "आज त्याच मनाने आणि डोळ्यांनी तहानलेपणाने तुला एकदा बघण्याची इच्छा व्यक्त केली. मग आले"

आणि सामान्य या तिसऱ्या प्रकारात यशोदा सांगते, "एक स्त्री आहे. जी विवाहितही नाही आणि तिला प्रियकरहि नाही. ती मादक आहे, तिच्या शरीराकडे पाहून कामुक अवस्था उचंबळून येते. तिला तिच्या शरीर संपत्तीचा आणि शृंगाराचा गर्व आहे आणि त्यामुळे ती त्याच थाटात तिच्या कट्ट्यावर बसलेली असते. तिच्या त्या एका ग्राहकाची वाट पाहत. कारण ती वेश्या असते. तिचा आवडता ग्राहक आलेला नसल्यामुळे तिच्याजवळ आलेल्या दुसऱ्या ग्राहकाशी ती जो संवाद साधते तो मजेशीर आणि 'ग्राहकांतही आवडता ग्राहक असणं' हे नवखेपण देणारा आहे. ती सेक्स वर्कर....तिला तिच्या सौंदर्याचा मोरपिशी अहंकार आहे. ती तिच्या कोठीवर आलेल्या पुरुषाला म्हणते की, "तू स्वतःला माझ्या लायक समजतोस?..." यावर त्यांच्यात वाद होऊन ती त्याला काढून देते आणि तिच्या त्या एका ग्राहकाच्या प्रतीक्षेत तळमळत राहते.

चौथ्या प्रकारात यशोदा समाजवते, एक अविवाहित मुलगी आहे जिला तिच्या प्रियकराने फसवले आहे. आणि त्यामुळे ती मुलगी तिच्या प्रियकराला या नृत्यातून प्रश्न करते की,  'का?'
केवळ 'का?' या प्रश्नाचे स्वरूप ती या नृत्याचा आधार घेऊन व्यक्त करते.
तोयाचक्षी म्हणजेच पाचव्या प्रकारात ती सांगते कि, १६ वर्षाची मुलगी प्रेमात पडते. तिला प्रेम या भावनेची ओळख नसते. ती तिचं प्रेम उघडेपणाने व्यक्त करते आणि या न कळत्या वयात ती तिच्या मैत्रिणीला तिच्या प्रियकराला बोलावून आणायला सांगते.
ती म्हणते, " माझी नजर शांत होणार नाही तो समोर आल्याशिवाय... त्यामुळे तू जा आणि त्याला घेऊनच ये!"
( नृत्यांगना यशोदा ४६ वर्षाच्या आणि त्यांनी साकारलेली मुलगी हि १६ वर्षाची. त्या मुलीच्या भावना, तिचं प्रेम आणि तिचा भोळेपणा हे त्यांनी डोळ्यांनी आणि पायांतील त्या झपझप पडणाऱ्या हालचालींनी आणि पैंजनाने व्यक्त करताना समजते,
"कलेला वय कळत नसतं, तिच्यासाठी समर्पण महत्वाचं.! "

सहाव्या प्रकारात म्हणजेच जावळीच्या शेवटी गप्तुवर्स येते... यात नृत्याची रचना म्हणजेच कोरियोग्राफी ठरवलेली नसते. मनात चाललेला कल्लोळ प्रेक्षकांसमोर नृत्यकलेतून मुक्तपणे सादर करणे हा त्यातला शेवटचा प्रकार. यात लाऊड संगीत असते. ज्यात तळमळ असते. अति दुःख असते, अति प्रेम असतं,  किंवा अति हुरहुरही असते. हा प्रकार प्रामुख्याने भावना अनावर झाल्यावर त्या व्यक्त करण्यासाठी केला जातो. या प्रकारात यशोदाने तरुणवयीन मुलीची भूमिका साकारून नृत्य केले आहे, ती यातून सांगते कि, त्या रात्री त्या मुलीत आणि तिच्या प्रियकरात प्रणयक्रीडेचे काही क्षण रंगले होते. त्यात त्याने तिचे चुंबन घेऊन तिला स्पर्श केला आहे आणि तो निघून जो निघून गेला आहे तो परतलाच नाही पुन्हा... त्याची वाट बघत ती बेचैन आणि रुखरुखीत झाल्यामुळे ती पुन्हा तिच्या सखीला घडलेला प्रकार सांगते आणि त्याला बोलवायला पाठवते आहे.
असे हे जावळीचे अनेक प्रकार सादर करताना यशोदा ठाकोर कमालीच्या भिन्न व्यक्ती भासत होत्या. कारण प्रत्येक अवस्थेतील परिस्थिती हि वेगळी असल्यामुळे ते सादर करणे तेवढेच जिकिरीचे कार्य होते. परंतु त्यांचे स्वतःच्या आवडीसाठी आणि कलेसाठी असलेले समर्पण हि एवढीच गोष्ट त्यांना कळली होती. आणि ती अंगातील प्रत्येक नसेल भिनवून त्यांनी हे सादरीकरण केले होते आणि सभागृहातील प्रत्येकाला स्वतःकडे खेचून घेऊन थांबण्यास भाग पडले होते.

या सादरीकरणावरून जाणवते कि, जावळी गातांना संगीतकार लयीचे आणि वळणाचे स्वातंत्र्य अंगीकारून हि रचना करतात आणि नृत्यांगना या गीतातील शब्दांना अंतर्मनात घेऊन त्यांच्याशी आपापल्या भावनेशी एकरूप होऊन खेळतात.
यातील संगीत लाऊड म्हणजेच वरच्या पट्टीतील असते, त्यात प्रामुख्याने 'वायोलिन, मृदुंगा आणि नटुवङ्म('टाळ' सारखे एक वाद्य) या वाद्यांचा वापर केला जातो. हे संगीत आकर्षक असते त्यामुळेच यावर सादर होणारी नृत्य हि हलक्या शैलीची म्हणजेच नाजूक हातवार्यांचा वापर करून केली जातात. त्यामध्ये संगीताची भाषा हि स्थानिक लोकांची बोलीभाषा आणि वर्णन कामुक रचनेने केले जाते.

जावळीची खासियत ही असते कि, त्यात असंख्य मुद्रा असतात. पण या कलेचे वेगळेपण असे कि यातील अनेक मुद्रा ह्या नैसर्गिकरित्या त्या नृत्यांगनेच्या अंतर्मनातून येतात. उदाहरणार्थ नर्तिकेला लाजणं किंवा शृंगार करणं हे शिकावं लागत नाही...  
यशोदाने वर्णिलेली, समजवलेली आणि मला वैयक्तिकपणे आवडलेली तिची अदा म्हणजे, " नृत्यातून कामुक किंवा मादकपणा दाखवताना स्त्रियांनी लाऊड होऊन छाती बाहेर काढून त्या पद्धतीचे एक्स्प्रेशन दाखवण्यापेक्षा नजरेतून आणि शरीराच्या चालीतून लयीतून आतल्या आत मुद्रा करून तो मादकपणा दाखवावा. कारण प्रणयक्रीडा हा चारचौघांपेक्षा त्या दोघांतील संवाद आहे त्यामुळे त्याचे सादरीकरण उघड्यावर पण खाजगीत करावं कारण एखाद्या नृत्याचे सादरीकरण करताना कधीच आपण त्याचा एक भाग सादर नसतो, आपण ती परंपरा पुढे नेत असतो... त्यामुळे ती कला जबाबदारीने सादर करणं हि कलाकाराची जबाबदारी असते. " 
             आजच्या जावळीने माझ्या छंदाच्या, ज्ञानाच्या आणि प्रेमाच्या कक्षा अधिक वृंदावल्या. जावळी जितकी आवडली तितकीच समजली आणि आपलीशी वाटली. काय बघावं आणि काय स्वीकारावं यासाठी सगळंच पाहावं आणि सगळ्याच कलांचा आस्वाद घ्यावा. त्यानंतर आवडीनिवडीचा प्रश्न ठेवावा कारण आपल्या रोजच्या अनुभवण्यावर आपल्या विचारांची श्रीमंती वाढत जाते. त्यामुळे रोज काहीतरी नवं घ्यावं मनाच्या समाधानासाठी, जावळी त्यातलीच!

(जावळीची भाषा, उच्चार आणि अर्थ आणि या प्रकाराची आज समजली ती माहिती सोडून मला अतिरिक्त माहिती नसल्यामुळे या लिखाणात काही अंशी चुका असू शकतात. जाणकारांनी क्षमा करून त्या चुका दुरुस्त कराव्या, हि विनंती.)