Sufi
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस...
तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम.
पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्वासू आहे हे प्रथम!

सौंदर्यापलीकडे 'जे छान आहे ते तुझं करून घे !' 
तू अडकत जाते तुझ्या परिस्थितींमध्ये.
भीतीला तू जरा नाकारायला शिक !
जुन्या रस्त्यांचा पाया ठेव, पण वाट त्याला तुझी जोड!
तडजोड ही वाईट गोष्टींबाबत ठेऊ नकोसच बजावतेय समज.!
कारण 'छान'ची जागा जेव्हा तडजोड घेईल, सवय तुला होत जाईल.
त्यामुळे तू घसरत जाशील या गाळात.
त्यामुळे ठामपणे स्वच्छ प्रवाहाचा तू भाग बन !

छोटी रहा, सीमित रहा, मर्यादित रहा,
पण स्वयंप्रकाशित स्वच्छ रहा !

ताकद तुझ्या पायांत आहे, पैंजणात आहे, डोळ्यात भरल्या त्या घट्ट काळजात आहे,

एक कटाक्ष टाकण्याचा उशीर आहे.
गळ्यात सेक्शुअल ऑब्जेक्ट झाकणाऱ्या तुझ्या ओढणीत आहे,
ती समोरच्याच्या गळ्यात अडकण्याचा उशीर आहे.
तशी ती मनगटाच्या जोडीला तुझ्या बांगड्यांत आहे,
ते मनगट एखाद्याच्या मानगुटीवर आवळण्याचा उशीर आहे.!
हो ती वेणीला माळणाऱ्या गजर्याच्या दोऱ्यातही आहे,
त्या दोऱ्याने त्याच्या नरडीच्या तिथे कुस्करून मागे खेचायचा उशीर आहे!
तीच ताकद कानातल्या डुल्याच्या टोकदार दावणीत आहे,
त्या तारीने ओरडबडायचा किंवा त्याच्या उघड्या भागाला,
नाहीतर सरळ त्याच्या लिंगाला ओरडबडायचा उशीर आहे ...
त्यासाठी स्वतःची ताकद ओळख.!

सौंदर्यात मढवून ताकद तुझी बांधून ठेवली म्हणे...
आता या सगळ्या सौंदर्याच्या तारांनीच तू सजही नि त्याचा वापरही कर!
वापर कर चांगल्यासाठी, तुझं वाईट होताना ते चांगलं करण्यासाठी !
या सगळ्याची ताकद तुझ्या कणाकणात आहे.

तू स्वतःला सतत सांगत रहा, तुला नेमकं हवं काय आहे.
जाण याची तू स्वतःला करून दे !
तुझ्या कम्फर्टझोन मधून बाहेर पड, आव्हानं आहे पण वैयक्तिक आहेस या लढाईत याचा आनंद तुला असेल.
जन्म घेताना झगडून, नंतरही कसनुसं जगून मरायचं असेल तर, जगू नकोस स्पष्ट आहे. 
या पायांना हे असं जखडून ठेवण्यापेक्षा, पूर्वापारच्या बेड्यांना तू जिद्दीने तोडून टाक,
नि हे जखडलेले परंपरेच्या रक्तात माखलेल्या पायांतच ताकद आण, हवं तसं आयुष्य जगण्यासाठी !
रक्तबंबाळ तावदानांतून तू तुझ्या स्वप्नांना त्यांचं आकाश दे, आणि मुक्त हो ! 
स्वतःसाठी निदान... ?




कम्फर्टझोनमधून बाहेर पड...!

by on मार्च ०७, २०१९
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस... तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम. पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्व...

१३२ वर्षांपूर्वीचा हा प्रवास. 

एका व्यक्तीच्या आयुष्याचा फक्त २२ वर्षांचा हा प्रवास. 
एक प्रवास आणि एकच ध्येय ! 
आताच्या काळात नाही जमत हे. 
"अनेक ध्येय ठेवले कि मग एक पूर्ण होतं," या भ्रमिष्ठ समजुतीला आपला अभिमान मानत आपल्यासारखे स्वप्न पाहायला सुरुवात करतात. 
आनंदीबाई वेगळ्या होत्या आणि त्यांच्याबरोबर गोपाळरावही! 
'अस्स काहीतरी व्हावंच लागतं, ज्यामुळे आपलं स्वप्न आपल्याला मिळतं.'

"आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या."पण या केवळ वाक्यावर त्यांचं कर्तृत्व मापलं तर चुकीचं ठरेल, त्याकरिता हा चित्रपट!  
हि कथा जरी आनंदीबाई जोशींची असली तरी ती केवळ त्यांची नाही. 
ती कथा मला जास्त करून गोपाळराव जोशींची वाटली. ब्राह्मण कुळात जन्मलेले भयंकर टोकाचे आडमुठे गृहस्थ! 
आडमुठेपणा हा गोपाळरावांचा स्थायीभाव मानून चालले तरी तो चांगल्या विचारधारेला आणि योग्य दिशा देणारा स्थायीभाव होता. 

चार दिवस शिवायचं नाही, पारावरचे सगळेच शहाणे कसे असतात, आपल्या स्वतःच्याच बायकोचा हात धरून मिरवण्यातही लोक नावे ठेवत, त्यावेळी गोपाळराव जसे आनंदीबाईंच्या हातात हात घालून दिमाखात लोकांना दाखवत चालतात, धर्मांतर करण्याचा विचार का करावा लागतो, लग्न करताना मुलाची प्रमुख अट कोणती होती ?, एकमेकांना सोडून न जाण्यासाठी बांधून ठेवलेली ती बाह्यतः बालिश वाटणारी खूणगाठ कित्ती मोठी साथ आणि विश्वास देते मनाला,   
हे सीन, हि दृश्ये खूप सुंदर सहज पण नेमके मांडले, हाताळले. असे चित्रपट साकारताना कुठल्या धर्माला ठेच पोहोचू नये हे भान जपणे आवश्यक असते. 

सुंदर आहे तो क्षण, ज्यावेळी समुद्र किनारी तो निळा सदरा, डोक्यावर सफेद पगडी , आणि ते उपरण आणि शेजारी ती लाल तांबूस रंगाचे जरीचं लुगडं घातलेली, जरीच्या काठाची चोळी, कानात नाकात जुन्या घडणावळीतील मोत्याचे कानातले नि केसांच्या आंबाड्यात तो मोगऱ्याचा गजरा ' तिच्या ' हक्काचा गजरा. !
अजुन किती वाचायचं? म्हणत जेव्हा कंटाळवाण्या शब्दात आनंदीबाई बोलतात, तेव्हा त्या दोघांमधील संवाद सुरेख वाटतो.
ते म्हणतात,
'ज्ञान हे या समुद्रासारखे असते, अथांग पसरलेल, जगभर...'
 रुढींच तुटणे याचं सुंदर दृश्यातून दाखवले ... जेव्हा गजरा घेऊन गोपाळराव आनंदीबाईंच्या केसांत तिथेच गाजरवाल्याच्या समोरच माळतात, हे माळून लाजणं हे आजही चारचौघात लज्जेचा विषय वाटतो. पण त्या काळात हे स्वतंत्र विचार गोपाळ रावांनी केले. 
सदर चित्रपटात दाखविलेला पूर्वीचा आणि आधुनिक समाज यात मला विशेष अंतर आजही जाणवले नाही. त्या काळी समाज चुकीचं तर चुकीचं पण तोंडावर मान्य करणारा होता. आधुनिक काळात, समाजात आपण अग्रेसर विचारसरणीचे दिसणार नाहीत म्हणून या चुकीच्या गोष्टी मनात ठेवल्या जाऊ लागल्या नि वेळोवेळी याची जागा ढोंगी लोक घेऊ लागले आहेत. 
-----
कास्टिंगबद्दल बोलताना, 
मुख्य भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद म्हणजेच आनंदी गोपाळ. भाग्यश्रीची ओळख बालक-पालक चित्रपटाच्यावेळेची. तिच्या अभिनयाची लकब लवचिक आहे. भारी फिट झाली ती त्या भूमिकेसाठी. 
भाग्यश्रीबद्दल जास्त बोलणे टाळते कारण जास्त आव्हानात्मक भूमिका हि गोपाळरावांची होती. अनेक भावनांचं अनेक रसायन त्या एका चेहऱ्यातील हावभावांतून दाखवायचे होते. भाग्यश्री (आनंदीबाई) हिला मात्र तिचा अल्लडपणा आणि मधील एका मोठ्या घटनेमुळे कणखरपणा या हावभावांचा अधिक वापर होता. त्यामुळे भाग्यश्री हिने सुरेख केलेच. 
माझ्या दृष्टीने गोपाळ जोशी हे आव्हानात्मक वाटले. त्यांच्यासाठी हा प्रवास एक लढाई होती. आणि ती लढाई तितक्या ताकदीने स्क्रीनवर आणणे गरजेचे होते.  
आणि अशावेळी मुख्य भूमिकेत ललित प्रभाकरला बघणे म्हणजे थोडासा किंतु मनात होता. कारण तो तरुण वयातील आणि तरुणीसाठीच्या भूमिका केलेला कलाकार होता. त्याचा दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलमधील रोलही तसा खूप भाव खाऊन गेला. मुलींचा क्रश म्हणून गॉड गोंडस हँडसम असलेला ललित गोपाळराव कसा साकारणार, याबाबत साशंक असणे स्वाभाविक होते. परंतु, त्याने अचूकपणे हे पात्र साकारत आणि खुलवत नेले. 
त्याची भूमिका, त्याचा तिरसटपणा तर अंगावर तेव्हा येतो जेव्हा हा आडमुठे स्थायीभाव जेव्हा आनंदीबाई गरोदर असताना त्यांच्यावर ओरडले जाते नि मारले जाते. त्यावेळी त्याची चीड येते, राग येतो, कणव येते, तळमळ वाटते पण या सगळ्यात मोठ्ठ म्हणजे कडाडून राग येतो. आपली तळमळ खरी म्हणूनती चुकीच्यावेळी एखाद्यावर लादणे, चुकीचे हेही न्याय्य दर्शविले. 

--------
चित्रपट पाहताना,
जुन्या ढाच्याची, नव्वदीच्या आधीच्या कथांना घेऊन बनवलेली बायोपिक पाहण्यात कुतूहल वाटते. कारण त्या काळात मनोरंजनाची सुरुवात आणि त्याची गरज व महत्व हे त्याकाळी लोकां लेखी शून्य होते.  
परंतु आधुनिक काळात अशा जुन्या व्यक्तींची व्यक्तिमत्वे आणि त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या काम करून साजरे केलेले हे सिनेमे, सुंदर वाटतात दृष्टीला. त्यासाठी त्या काळाचा फील आणण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीची पूर्ण कल्पना नसली तरीहि अशा चित्रपटांत वापरलेली प्रकाशयोजना, फ्रेम, एडिटिंग, आधुनिकतेचा कणही दिसू नये याची घेतलेली काळजी हे तीन तासांत जज करून मोकळे होतो आपण, पण हेही आव्हान तंत्रज्ञानामुळे सुकर होऊ लागले. विशेष म्हणजे मला या अशा बायोपिकमध्ये चित्रपट चित्रीकरणासाठी वापरलेल्या जागा, तिथे वावरणाऱ्या लोकांचा पेहराव, त्या काळातील आपला भारत म्हणून जपलेली भौतिक वस्तूंची ठेवण हे पाहायला विशेष सुखदायक वाटतं. 
भले, लेखकाला, दिग्दर्शकाला माहिती आहे कि, त्याचं हे लिखाण किंवा स्क्रीनवर दिसणारी चलचित्रेही त्या त्या काळात ज्या व्यक्तीची ती कथा आहे तिच्यासाठी इतकी सुखकर नव्हती. पण जुन्यातील गंमत नि प्रेक्षकांपर्यंत त्याच्या आतील संदेश पोहोचविण्याचा हा छान प्रयत्न ठरतो. 
 -----------------------
या कथेत वाटत जाते कि, जेव्हा अशा स्त्रिया मोठे नाव कमावतात, आपल्या पितृसत्ताक पुरुषाने जर अनाठायी ठरवूनच टाकले तर त्याच्यात केवढा पुरुषार्थ केवढी मर्दानगी आहे कि एक 'आनंदी' तो घडवू शकेल. 
त्यांच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न, स्वप्न का बनतं हे जेव्हा संवेदना जाग्या ठेऊन बघितलं जात तेव्हा चित्रपटाची तळतळ नि आनंदीबाईंनि त्यावेळी ठरवलेलं ते स्वप्न आजच्यासाठी किती महत्वाचं होतं हे कळत जातं. 
चित्रपटांमधील गाणी हि त्या त्या परिस्थितीला अगदीच पूरक असतात. परंतु गीतांमध्ये सगळ्यात सुंदर गीत आणि त्याचं संगीत जे आवडलं ते म्हणजे 
"'मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे ! वाटा वाटा वाटा गं !
आणि ठेका येतो, 
दर्या दर्या ग, उरात शंभर लाटा ग! "
लहानपणी नवऱ्याने लावलेली अभ्यासाची कडाडून शिस्त...हीच लहानपणीची सवय हळूहळू आनंदीबाईंना स्वतःच अस्तित्व शोधून देते. त्या दोघांचा हा प्रवास ! 
संस्कृती, परंपरा, रीती रिवाज, धर्म थोतांड, पक्षपाती शासन आणि शिक्षण व्यवस्था याना धरून अनेक चित्रपट बनविले जातात, हा चित्रपटही त्यातलाच. पण वेगळा दृष्टीकोन देतात या जिद्दी कथा ! 
------ 
कथेबद्दल बोलू तर,
असामान्य जिद्दीची हि कहाणी आणि त्याला समांतरच गूढ प्रेमकथा!
गोपाळराव हट्टी आडमुठेचं असावे! 
आणि आनंदीबाई या परिस्थितीनुरूप बदल स्वीकारून जिद्दीने पुढे जाणाऱ्या. 
आपल्या 'पत्नीचं स्वप्न' हा गोपाळरावांसाठी अलंकार होता, केवढं सुंदर होतं हे. 
एका जिद्दी स्वप्नाची कथा आहे ही. स्वप्नांच्या जगात संधी मिळतात, त्या बघाव्या त्यातील निवडावी नि पुन्हा त्या स्वप्नाला घेऊन एक सतत चालत राहावं! 
गोपाळ नसते तर आनंदी नसती. किंवा डॉ. आनंदीबाई जोशी झाल्याही असत्या त्या. कारण म्हणतात नं, स्वप्न तुमच्या जन्माबरोबर जन्म घेतात, ते तुमच्याच नावी असतात. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. 
कुटुंब व्यवस्था, पारतंत्र्य, स्त्री असणं, धर्म मोठा या गुंत्यांपेक्षा शिक्षण हे आदर वाढवते नि जर हा आदर दोघांनी मिळून मिळवायचा ठरवला तर होते सगळे छान, तो खरा संसार असतो! 
हा गुंता सुटला तर एकमेकांची स्वप्न पुरी केली तर होतो संसार ! 
सुंदर समीकरण वाटले, दोघांची स्वप्न एकत्र सूत बांधतात, हा खरा संसार!
----------------

अंतास, 
तो क्षण सुखाचा,
जेव्हा हे स्वप्न साकार होतं. आनंदीबाईंच्या हातात डॉक्टरकीची डिग्री येते. आणि गोपाळराव तिथे येतात, तो क्षण मौल्यवान, अगणित!
कडाडून भरून आलं, आवडलं, भावलं आणि याहूनही अधिक कदाचित!
एका स्वप्नामागे लागून त्या दोघांची धडपड, तो प्रवास, तो पाठलाग त्यातील पडणझडण आणि ते सगळं पूर्ण झाल्यांनंतर त्याने आनंदीबाईंना मिठीत घेणं जणू त्या स्वप्नाला कवेत घेणं होतं.
शेवट करताना तोच समुद्र, तोच पेहराव, त्याच लाटा आणि शेवटी एकमेकांची सोबत साथ, सुखकर ! 
-----------------

फक्त चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने दाखवलेल्या सगळ्या यशस्वी महिला त्यांची नावे आणि त्यांचं कर्तृत्व हे इंग्रजी भाषेत टाकण्याऐवजी मराठीत टाकायला हवी होती. ती संकल्पना सुंदर आहे, पण प्रेक्षक हा बहुतकरून मराठी भाषिक असल्यामुळे त्यांना ते कळायला हवे, म्हणून वाटून गेले. 
फक्त मलाच जाणवले असेल, पण आनंदीबाई या कमी जाणवल्या, गोपाळरावांपेक्षा. हे कदाचित त्यावेळी तसेच घडलेही असेल. सत्य परिस्थिती, लेखकाचा या विषयातील व्यासंग आणि मुखतः या विषयाला हाताळतानाचा दृष्टिकोन.
पण तरीही वाटते, गोपाळरावांची बाजू उजवी दाखवली जास्त? असो, इतिहासातील संग्रहित सगळेच खोटे असते, नाहीतर सगळेच खरे ! 
पत्र संवाद जसा काळाच्या मागे गेला...
सराईत शापितासारखे 'शब्दही' दगडासारखे बेसुमार दिसू लागले... 

मज भीती आज ही इतकीच वाटली,
पत्रव्यवहाराच्या त्या काळात मज आभासी लेखिका म्हणवलं तरी गेलं असतं ?

डिजिटल हे जग झाले,
शब्द सुमार वाढतच गेले...
शब्द स्वस्त झाली,
त्यास किंमत न उरता,
त्याचीच किंमत केली ...

वो भी दिन थे,
लोग गुलजार पढ़ने के लिए छह माह इंतजार करते थे।
आज तिस किमया म्हणवत,
एका श्वासात गुगल भाऊ गुलजारांना न वाचता समोर आणून ठेवतो.

म्हणूनच
ना पत्र , ना तार, ना शब्दांस वजन राहिले...

वाहून गेल्या लाखोल्या शब्दांच्या ,
कमेंट लाईक शेअरच्या दिखाऊ आभासात...

आजही ते दिवस किती ओले वाटतात...
एssक सुंsssदरंस खुराडे, वर वाळक्या झाडांचं छप्पर, बाहेर गोठ्यात नवं कुटुंब नि त्या गोठ्यातील सुवासाचा घरभर सुवास ... नि या सगळ्याला बांधून ठेवणारं एक काssटेरी कुंपण.
काटे सजावटीला वापरावे असे ते साधे दिवस होते. 
एक अशीच सायंकाळ यावी, पाखरांच्या थव्यासवे जोडीला तार पत्राची धाडावी.

पत्राची गुंडाळी ती सोडत वरूनच त्या ' पत्रास कारण की...' चे हजारो अर्थ चाळावे.

अंधार हा दाटून यावा, अंधारास विझवत तोरण ते कंदिलांच यावं... त्या उजेडास तव साक्षी मानत, डोळ्यांत अंदाजाचा कस लावत एखादा अंदाज निपाजत जावा नि पत्र लिहिण्यास कारण की... क्षण सुटत न्यावा....

पेटल्या चुलीतील विस्तवाची ती खरी परीक्षा व्हायची...

'पत्रास कारण...' आनंदाचे निघाले तव विस्तवासही दिवे लागायचे. एका कागदाची किमया ती ही अशीच बहरत कित्येक मनी सौख्य भरायची...

पण,
पण....

जर कारणास पत्र ठरले, तर तोच विस्तव राख नि धगधगता निखारा दिसायचा.

' पत्रास कारण की... ' तेवढाच एक क्षण हा दूर गावाच्या पल्याडहून मिळालेलं एक सरप्राइज ठरायचा.

ज्याच्या 'अचानक' एका सेकंदात आयुष्याचा मायना बदललेला असायचा.

आज वाटते, एका कागदाची किंमत त्या म्हाताऱ्याला विचारावी,
प्रेमाची किंमत त्या गावठी संसारी गृहिणीला विचारावी
नि

एका 'शब्दाची' किंमत या अशा लेखकासच विचारावी.
- पूजा

अचानकच....

by on फेब्रुवारी ०६, २०१९
पत्र संवाद जसा काळाच्या मागे गेला... सराईत शापितासारखे 'शब्दही' दगडासारखे बेसुमार दिसू लागले...  मज भीती आज ही इतकीच वाटली, प...
भाई…. 

नाव आणि लहानपण यामुळे गाजलेला कुणीतरी व्यक्ती पडद्यावर दिसणार म्हणून उत्सुकतेने आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेने चित्रपट बघायला जावं. पण बदल्यात  ? 
चित्रपट आहे छान. पण हा पूर्वार्ध होता, कदाचित पुढे मांजरेकर पूर्वर्धाचं समीक्षण पाहून उर्वरित पु.ल अजून खोलात जाऊन विनोदी साकारतील… ही अपेक्षा!
मनापासून चित्रपटात काहीतरी कमी जाणवतच राहिली. कारण पुलं देशपांडे यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर मधूनच म्युझिक आणि मोजक्या संवादामुळे पुलं बघायचाच असे ठरले. कारण लहानपणीपासून जसं चार्ली चॅप्लिन तसे महाराष्ट्रात पुलं. असं होतं म्हणून उत्सुकता टोकाची होती. 
मांजरेकर यांनी प्रयत्न हा केला की, जनसमुदायाला खऱ्या अर्थाने पुल कळावे. पण ते कळावे म्हणून तो बायोपिक गांभीर्याने करावा हे बंधन नव्हतं. दुर्दैवाने तसं घडलं.
आपण कोणती जबाबदारी घेतोय, त्याचा पडद्यावर साकारल्यानंतर होणारा परिणाम हे अत्यंत जोखमीचे काम असते. मी मुळीच हे म्हणणार नाही की, दिग्दर्शनास मेहनत घेतली नाही. मांजरेकर हे मुळात चित्रपट क्षेत्रात मुरलेले. त्या व्यक्तीने चित्रपट क्षेत्रात अभिनयापासून, प्रोडक्शन, लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे त्याच्या कार्यावर आक्षेप किंवा टीका हा मुळात विनोद ठरेल. पण मी केवळ एक प्रेक्षक म्हणून मला पुलं किती भावले आणि का नाही भावला हे सांगण्याचा हा प्रयत्न केला…
मुळात “ज्या माणसाचा यूएसपीच/ वैशिष्ट्यच हशा पिकवणं आहे. त्याच्या चित्रपटाला चित्रपट गृहात सगळे गंभीर. ?   हा भलताच विरोधाभास घडून आला म्हणायचं.” हातावर मोजण्या इतके विनोद सोडले तर उर्वरित चित्रपट मांजरेकर टाईप्स आहे.
तरीही एकंदरीत जुळवाजूळव छान आहे.
चित्रपटाचा प्रवाह हा एक वेगळा प्रयोग वाटला. कारण , ” मृत्यूच्या वेळी आपल्या जवळ किती व्यक्ती असतात त्यावरून त्याची श्रीमंती दिसते. ” आणि सादर चित्रफितीत पुल देशपांडे या अवलियाची श्रीमंती त्या हॉस्पिटलच्या आवारात घोंगावत , फिरत प्रत्येकाच्या मनातले पुल दर्शवताना  दिसते. हा प्रयोग आणि बायोपिक सादर करण्याची पद्धत आवडली. वेगळी वाटली. पण जर चित्रपट हा बायोपिक बनवला, तेव्हाच एक प्रमुख गोष्ट त्यात असायलाच हवी, “ज्या व्यक्तीचा बायोपिक बनतोय ती व्यक्ती” ती व्यक्ती केवळ असून चालत नाही, तीच व्यक्ती ठासून असायला हवी, एवढी ताकद त्या व्यक्तिरेखेत हवीच. आणि व्यक्तिरेखेत असेल तर ती दिग्दर्शनातही उतरायलाच हवी.
संपूर्ण चित्रपट पुलंबरोबर फिरत असला तरी भाई खूप कमी दिसले, किंवा दिसलेही तरी त्यांच्या आजूबाजूचे पात्र जास्त उठून दिसले. सुनीता हे माझं या पूर्वार्धात सगळ्यात आवडत आणि न्याय्य पात्र. भूमिका ज्या भरभक्कम जबाबदारीने इरावती हर्षे ( सुनीता) यांनी साकारली. तेवढी एकमेव भूमिका ही अतीव सुंदर आणि खरी वाटली. मुळात ती भूमिका अभिनय नाही, जवळची वाटला. त्याप्रमाणेच भाई साकारलेला सागर देशमुख हेही भूमिकेस साजेसे होते खरे पण दिग्दर्शन करताना पुलंचा लहेजा आणि दिसणं काठोकाठ जुलवलं असलं तरी त्यांचा विनोदी किंवा कॉमिक टाईमिंग जे म्हणतात, ते जमायला आणि तितकी मजबूत डायलॉग डिलीव्हरी नाही जमली, जाणवलं. ज्या व्यक्तीची दहावीला बटाट्याची चाळ वाचली,  केवळ पुस्तकातून लोकांच्या मनावर राज्य करून त्यांना हसवण्याचं शस्त्र पेलवलं होतं, पोट धरून धरून हसण्याचं द्योतक असलेला हा अवलिया, दहावीला मराठीच्या कुमारभारती मुळे आपलासा झाला होता. ती जादू दहावीला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकाची होती की पुलंची ? हा प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर पडतो. कारण हेच पुलं आज तर दृकश्राव्य माध्यमातून समोर आले. म्हणतात ना छापील पेक्षा दृकश्राव्य ची ताकद जास्त मग तरीही चित्रपटाची ताकद कमजोर का पडली. तरीही जसं म्हणते की कुठलाही चित्रपट काही. ना काही छान देऊन जातो. तसं या  चित्रपटातील घरगुती ड्रामा हा सुंदर वाटतो, थोडा नेहमीचा आहे पण ओरिजनल आहे. तसेच आवडता सिन म्हणजे सुनीता आणि पुलंची भेट… अतिशय आकर्षक आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कोण्या एका सौंदर्यवती स्त्रीला पाहून वाटेल तशा स्वरूपाची ही भेट. तेवढ्या ठिकाणी मात्र किंचितसे पुलं दिसले. वाटतं तो संवाद तर ट्रेलरमध्येही पूर्ण झाला, मग अजून कशाला चित्रपट.? पण आहे, त्याशिवाय ही चित्रपट उरतो. पुलं न संपणार पुस्तक आहे. 
सुनीता म्हणजे पुलंची दुसरी बायको. कट्टर स्त्रीवादी. त्यामुळे कणखर, खमकी आणि स्वतंत्रही. पण लग्न झाल्यानंतर आयुष्याचा भार वाटून घ्यायला लागतेच सोबत्याची साथ. आणि तेव्हा जर पुलंसारखा व्यक्ती असेल, जो लेखक आहे, गाण्यांना देणारा आहे, पेेेटी वादनाची आवड, शिवाय नाटकाचीही आवड, असे लोकं कलेत जास्त रमतात. त्यांना बाहेर वास्तवात घडणारं सगळं केवळ ढोंगीपणा वाटतो.  तेव्हा सहाजिकपणे संसारात दुर्लक्ष होऊन साथ न मिळाल्याने सूनिताने गर्भवती असल्याची बातमी समजताच दुसऱ्या दिवशीच गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हा संदेश खूप कमी लोकांना पटेल की अशा वेळी पुलं न चिडता आईला म्हणतात, “योग्यच केलं तिने. तू दुखावली असणार पण आजी म्हणून तू बाळाला जपशील, वाढवशील पण त्या बाळाची सुरुवात आणि शेवट हा तिच्याच जवळ होणार आहे. त्यामुळे तेवढं स्वातंत्र्य तर नक्कीच तिला आहे.” हे संवाद लेखन आणि प्रस्तुती मनाला भावली. या आजच्या जगात ती स्वीकारलीच जावी असे वाटत राहते.
याशिवाय चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे, पंडित भीमसेन जोशी यांचं अस्तित्व सुरेख वर्णिले. परंतु तरीही जी सर यायला हवी ती जमली नाही, वाटलेले की नाही काही तर शेवटी वसंता, पंडित भीमसेन आणि पुलंची मैफिल भाव खाऊन वाह वां मिळवेल परंतु साफ हरले तिथे. पण हो चित्रपटाचं संगीत रुचकर आहे, संपूर्ण चित्रपटाला भक्कम आधार वाटला संगीताचा. 

एका वाक्यात सांगायचे तर, पुलं चित्रपटगृहात बघण्यापेक्षा ट्रेलरमध्ये जास्त उजळून दिसले… प्रसिद्धीमुळे चित्रपट उचलला गेला तरीही काहीतरी अपूर्णत्व जाणवत राहिले.
याव्यतिरिक्त चित्रपटाला स्क्रिनिंग मिळण्यावरून वाद चालू असणारच. पण बघावा चित्रपट, मराठी आहे म्हणून नाही पण महाराष्ट्रातल्या अशा हरहुन्नरी लोकांशी चित्रपटी ओळख तरी असायलाच हवी नं… 

हास्याचे 'पुलं' चित्रपटगृहात कोमेजले !

by on जानेवारी ०५, २०१९
भाई….  नाव आणि लहानपण यामुळे गाजलेला कुणीतरी व्यक्ती पडद्यावर दिसणार म्हणून उत्सुकतेने आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेने चित्रपट बघायल...


जुनं वर्ष नवं होतंय... 
जून्यात नवं टाकायचंय ...
नव्याला टिकायचयं जुन्याला टिकवायचंय !

दिवस आजचा खास होत होता.. कारण ... ?
कारण नाही, कारणे होती... अनेक अनेक अनेक कारणे... 
त्या प्रत्येकाची कथा होती. एक वेगवेगळी कथा... 
मनुष्याच्या जीवनाची हीच मजा असते... माणूस कितीही बोअरिंग असला तरी त्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोजचं सरप्राइज असतं...
ते सरप्राइज माणसाचा विचार न करता येतं, आणि नवं काहीतरी देऊन जातं... पण त्यालाच आज सरप्राइज करत वर्षाचं जुनंपण आज सेलिब्रेटच करायचं ठरलं.
बात कुछ यू थी... 
त्या एका ठिकाणी जावं, जिथे आवडेल मनाला... 
वर्षाच्या शेवटी जावंच की...
तिथेच एक पेयं यावं... 
ए दारू नसावी ती, पण तरी नशा कुछ झिंग चढेल एवढी ... 
मागे ' तुझसे नाराज़ नहीं जिंदगी ' इंस्ट्रुमेंटल संगीत ... 
ती धून ओळखत ओळखत पार कितीतरी कधीतरी कुठेतरी ऐकलेल्या मनाच्या कॅसेट प्लेअरमधून ते गाणं धडपडून शोधता शोधता हिय्या... हे तर तुझस्से नाराज नहीं... 
आणि या तेवढ्या कष्टातून मुजिक शंपून दुसरं लगेच, ' जिना यहां मरना यहां ' ... मुड ऑफ होता होता राहून हे गाणं गुणगुणत चालू द्यावा विचारांचा प्रतिवाद... 
              
         विचार आपले केवढे मोठे सोबती असतात... कधीतरी आपली साथ सोडतात ते...? किती गैरफायदा घेता ते आपला !
सतत स्वतःला बरंच अटेंशन मिळवून घेत राहतात...
आणि आपण मनुष्यप्राणी असतोच मुळी खूप निःस्वार्थी... किती साथ देतो ना त्यांची...?
मग काय आपण ऐकतो विचारांचं... आणि घडत जातं आयुष्य...
त्यामुळे या वर्षात निर्णय घेणं किती धाडसाचं असतं शिकले... निर्णय घेण्यात सरप्राइजेस असतात ... ज्या क्षणी निर्णय घेऊ, दुसऱ्या सेकंदावर सरप्राइजचा डब्बा पडलेला असतो...
त्यामुळे तो आपलाच डब्बा घेऊन चालावं लागतं, नवा निर्णय आपल्या वाट्याला येईपर्यंत...
ए तुम्हाला जाणवतं कधी? 
काही वेळा ना, नाही बऱ्याचदा आजूबाजूच्या अनोळखी जगात सुद्धा एक गोष्ट ही आपल्याशी निगडित होतच असते... 
तसं नसतं तर या गाण्यांचा माझा काय घरातला संबंध कधीच नव्हता... ना जिथे मी बसले होते ती जागा माझी होती, पण किती जादू होती त्या गाण्यांच्या अस्तित्वात, अनोळखी होऊन मला त्यांचं करण्याची जादू... 
आयुष्यात म्हणे मी निःस्वार्थी जगतो ... 
श्या खोटं असतं सगळं, स्वतःसाठी जे काही चाललेलं असतं एवढच एकमेवाद्वितीय सत्य!
बाकी सगळे स्वतःचे चोचले! 
या वर्षात अनेक पुरवले... 
पण एक गोष्ट आहे, या वर्षात स्वतःवर भरभरून प्रेम करू लागलेय... कारण ...
कारण नाही कारणे आहेत इथेसुध्दा...
पण महत्त्वाचं कारण म्हणजे, माझ्या अवती अशीच लोकं मी निवडले ज्यांच्या आयुष्यात माझ्या अस्तित्वाचा सकारात्मक दरवळ होता...
त्यामुळे या ३६४ दिवसात करीयरच्या वर्तुळात मी आले, मी जगत गेले, वाढत गेले, प्रगल्भ झाले, वृद्धिंगत झाले, आणि स्वतःवर बरेच मोठाले संस्कार केले रे!
हे शक्य नसतं गड्या... 
म्हणजे या वर्षात मला एक कौतुकाची मोठी थाप काय मिळते आणि स्वतःचे मार्ग सुचत जातात...
एक नितळ स्वप्न मला या वर्षात मिळालं की, पहिल्या वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून लढत राहायचं, लढत राहायचं, शेवटच्या घोटापर्यंत... आणि वर्षाच्या शेवटी जो आजचा दिवस असतो त्या दिवशी ठरवायचं स्वतःशी... भेटायचं स्वतःल ... मनातल्या आपल्या विचारांच्या सोबत्याबरोबर एक ठिकाण निवडायचं आणि छानसा स्वतःच्याच आयुष्यातल्या एका वर्षाचा फ्लॅशबॅक चित्रपट बनवायचा ...  हसत, रडत, हुंदडत, कडकडा राग आणत, खुन्नस आणत, आयेहाये प्रेमात पडत, त्याच्याकडे बघत, त्याच्यात विरघळत जात, कलाकाराने त्याच्या कलेत विरघळत दीर्घ होत जात, लांब उड्डाण घेत मस्त डोळ्यांच्या पडद्यावर बिना तिकीट पाहून घ्यावा हा चित्रपट ! पण तो करायचा पण पैसा वसूल मंगता हां... !वर्षपलभर मेहनत करून स्वतःचा मज्जाक नाही उडवून घ्यायचा हां! 
आणि माझा शो तर पैसा वसूल करण्याच्या नादात बराच पुढे आणला की मी म्हणत घ्यायची स्वतःलाच शाबासकी देत.. 
तेवढ्यात कॉफी आली... 
काय गंमत असते... एक पेयं असतं आणि ताबा करतं ते आपल्या आयुष्यातल्या क्षणावर ... इतकी प्रचंड ताकद ना भो! 
पण हे खरंय, या सगळ्याचं महत्त्वाचं श्रेय मला स्वतः ला जातच पण ते जातं, त्या प्रत्येक क्षणाला... जे मला अशक्य वाटत होते... 

याच ३६४ दिवसांत तीन वर्षापूर्वी आयुष्यात आलेला 'तो' एका दिवसात निघून गेला... 
तो गेला, दुःख केलं, रडले बोंबलले पण थांबले नाही. उलट राग खुन्नस आणि ईगोवर येऊन उठले ... 
कारण एका दिवसात निघून गेला, पुढचे ३६४  दिवस माझे झाले... आयुष्याचा भागीदार गेला... 
और उसके बाद जो हुआ वो 'मंजूर-ए -खुद' हुआ, खुदा नहीं। 
कारण जो त्याचा वेळ होता तो अनेकांना देऊ लागले. आणि जास्त करून तर स्वतःला....
आयला...
'मेरी उमर के नौ जवानो' ... 
मी म्हटलं ना, या विचारांचा सोबती बरोबर हे गाने असतात... धून गात गात म्युझिकचे लिरिकस आठवत, स्वतः शीच गुणगुणत, पुन्हा स्वतःचा चित्रपट सुरू होतो... 
बरं झालं का मी सोडलं त्याला... ? 
कितीही समजावलं तरी प्रेमासारखी हट्टी भावना नसते माणसाच्या आयुष्यात... 
खंत असते एकत्र नसल्याची पण 
प्रेम छान असतं राव, खरंच! म्हणून मग प्रेम सगळीकडे आहे, डोळ्यांना दिसू लागलं... 
बाहेरचे लोक पण काही वाईट नसतात राव... हे त्याला सोडल्यानंतर कळलं. 
याच ३६४ दिवसात माणसं भरमसाठ आली, गेली आणि काही राहिली... 
जी राहिली ती माझी बनली... 
याच ३६४ दिवसात जवानी आली.... जवानी तीच... रिकाम्या रस्त्यावर एकट्याच्या स्वातंत्र्यात फिरणं, मारण्याचा जोश, तिचा किंवा त्याचा हात त्याच एकट्या रात्री हातात घेणं , पहिलं चुंबन , पाहिली मिठी , पाहिलं तडपणं , करीयर निवडण असतं, निर्णय घेणं , पहिला अबोला , पहिलंच शब्द समजुन घेऊन ऐकलेल गाणं असतं... आणि याच जवानीत पुढच्या आयुष्याची किल्ली असते... सुंदर असते जवानी... तिचं मोहरणं जपावं लागतं, उधळून द्यावं असं रूप असतं तिचं पण स्वतःला ओळखून शोधून आणि सापडून घेऊन जगावी ही जवानी... 
याच ३६४ दिवसात, काही तुटलं, फुटलं, निसटलही ... पण जगाच्या आणि जीवनाच्या तत्वज्ञानातून मी 'स्व' ला शोधलं.
प्रत्येक वर्षागणिक एक पान छान घडवायचं स्वतःच्या आयुष्याच, एवढं काबिल बनवायचं स्वतःला... एवढं या वर्षाकडून घेतलं... 
कटिंगमधून निघून स्पेशल करायचं स्वतः ला... !

तेवढीच काय ती ताकद, स्वतःच्या असण्याची!

या वर्षात एक खजिना मिळाला, स्वतःत जे आहे ते सापडलं...

ते शोधलं, ते सापडून अजून दीर्घ होत जाणार हाच नवीन वर्षी संकल्प मनाशी केला... 
त्यामुळे जुनं सोडून नवं घेण्यापेक्षा जुन्यात नव्याची घडण करून त्यातून चमकणं ही ताकद असते, स्वतःची, स्वतःच्या विचारांची.... 
त्यामुळे विचारांच्या  सोबत्याला नीट संस्कार करून घडवा... आयुष्य अपूनकाही हैं| उसे अपुन काही रहना मांगता। इसलिए,
आयुष्य जपा।


एक वर्ष, पैसा वसूल !

by on डिसेंबर ३१, २०१८
जुनं वर्ष नवं होतंय...  जून्यात नवं टाकायचंय ... नव्याला टिकायचयं जुन्याला टिकवायचंय ! दिवस आजचा खास होत होता.. कारण ... ? का...

"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं,
ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| "

काही क्षण कित्ती कित्ती बक्कळ सुंदर असतात म्हणजे सहज गॅलरीमध्ये जाऊन बसावं...
थंड वाऱ्याचं येणं असावं...
बॅकग्राऊंडला दोस्ताला कट्ट्यावर आणेल असं गाणं लागावं...
हातात मोबाईल असावा...
एखादा मित्र आपल्या टाईपचा असावा...
असतात खरंतर ...
टाईपचे फक्त प्रियकरच नसतात, मित्रही असतात...
माझ्या आयुष्यात तो होता, बिलकुल माझ्या टाईपचा...
त्याच्याबरोबर आयुष्याचा सगळा हरिपाठ, रडगाणं, पारायण शेअर करावं ...त्यानं त्याचं सांगावं ... दोघांनी इक्वल बोर करावं.
त्यात एकाने निगेटिव्ह बोललं की दुसऱ्याने त्याला आपटू न देता उचकवत आव्हान देत पॉजिटिव्ह करत वरती आणावं....
त्यात मग आजचा विषय माझ्या 'ब्रेकअपच्या फिलिंगचा' असावा..
मग त्याने विचारावं, "भेंडी दरवेळी तुला सारखसारखं विचारायचंच का,
काय झालंय .... भडाभडा बोलून मोकळं होत जा .... पुन्हां त्याच्याशी वाजलं ?  "
त्याच्या या वाक्यानंतरचा माझा सन्नाटा त्याने समजून घ्यावा.. 
मी बोलायला जावं, "हो .... आज शेवटचं... " मी ठामपणे म्हणावं.
"ओ मोहतरमा.... हे गेल्या ४-५ महिन्यापासून हाच टेप ऐकतोय ... चल तेरे अंदाज में सुना आखिर ऐसा अलग आज हुआ क्या ?...." त्याने उचकवत पण, माझं ऐकून घेण्याच्या आग्रहात म्हणावं.
आणि मग मी सुरु करावं,
"हो ! तोंडावर पडूनही आज त्याच्या स्पर्शात शेवटचं एकदा जिव्हाळा शोधत होते मी ...
हात धरावा, चंद्र दाखवावा, आकाशातला सुकून दाखवावा ... 'आयुष्यभरासाठी माझी होशील का ?' ही कुठूनतरी पाठ केलेली ओळ चिकटवावी आणि अचानक त्याने एक दिवस सोडून जावं ...?
सोप्प असतं ना हे तुम्हा मुलांना?
हे सोडून जावंच लागतं का ? हा बावळट प्रश्न मला पडावा....
मग नंतर...?
मग नंतर सुरु व्हावा माझा असा 'एकटा' प्रवास ...
संपूर्ण काळोख, निगरगट्ट आठवणी आणि एक कणही 'आम्ही पुन्हा एकत्र न येण्याची उमेद नसलेली' आयुष्याची वाट ..."
मित्राने यावर शांत राहावं... 
विषय सेक्स किंवा रोमांसचा आलाच तर बाहेरचा कितीही जवळचा असेल त्याने शांतच बसावं. कारण त्या पलंगावर नेमकं काय घडलंय हे त्या दोन बावळटांशिवाय कोणालाच कळलेलं नसतं... फार फार तर त्याबद्दल गौसिप करावं पण त्या दोघांच्या संभोगाविषयी तुम्ही आत्मविश्वासाने छाती ठोकू नाही...
ते मित्राला माहित होतं, त्याला आमच्या सेक्स लाईफमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याला फक्त मी महत्वाची होते.
मलाही त्याचं ते  शांत राहणं आवडावं, म्हणून माझे रडगाणं उरकून मी त्या माझ्या टाईपच्या मित्राला शुक्रिया अदा करावा...
त्यावर त्याने खदखदा माझ्यावर हसावं...
आणि यावेळी मी त्याला म्हणावं,"चल मेरेही अंदाज में सुनाती हूं... "
आणि मग मी सुरु व्हावं,
"या ब्रेकअपनंतर मी माझी उठायला जाणार होते...
मेलेला आत्मविश्वास आधाशासारखा शोधत होते आणि बर्रोबर इथे-च थोडं उचकवणारा, थोडा चॅलेंज देणारा, आणि जास्त माझ्या भावनांशी घेणंदेणं नसलेला पण माझा गमावलेला आत्मविश्वास मला परत करणारा कुणीतरी हवा होता आणि इथ्थे मला तू भेटलास... बिलकुल मला हवा तिथे आणि तसा! 
अर्थात मला ब्रेकअप नंतर मी पूर्ण एकटी हवी होती. मला शब्दाश: एकांत हवा होता.... 
पण तू आला आणि वचवच सुरु केली. आयुष्य शांत, ओसाड भकास होण्याऐवजी चॅलेंजिंग वाटायला लागलं. 
स्वतःच स्वतःच्या भावनांना कसं कंट्रोल करून जपायचं, हे आव्हान मी त्या काळात पेललं. मी जिंकले, मी आतून खुश राहू लागले...
आणि त्याच थोडबाहोत क्रेडिट हे या हरामी तुला...." त्याच्याकडे बघून हळूच डोळा मारत मी त्याच्याकडे पाहिलं.  
आज कें दिन मेरेही अंदाज में थॅंक्यू म्हणायचं आहे तुला... 
"कारण ब्रेकअपनंतर माझी ज्योत मी तेवत ठेवायचा अतोनात प्रयत्न करतच होते, तिथे दोन्ही हातांनी ती वात विझू नये म्हणून आधार देणारे हात तुझे होते.
ते हात मला ओरबडणारे नव्हते ... मला जिवंत ठेवणारे होते ..."
म्हणून ही गुलाबी रात्र तेरे नाम ...
मैत्री प्रेमपेक्षा कैक पुढे आहे...............


तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस!!!" आणि मी बोलायचं थांबले...
"आणि अशाप्रकारे तुमचा निबंध संपला आहे... टाळ्याssss" त्याने एका झटक्यात सगळा शुक्रिया आहे तसा माझ्या तोंडावर मारला आणि मग तो बोलू लागला,
... 
" प्रेम आणि मैत्री याच्या कैक पुढे आहे आपलं नातं म्हणूनच आपल्या नात्याला मर्यादा नाही .. ते कायम रिक्त असत ...म्हणूनच आपल्या नात्याला नाव नाही... 
आणि तू कोण गं शुक्रीया करणारी .. तुला नाही अधिकार तो.. मला नको तुझं शुक्रीया... घाल चुलीत ते शुक्रिया आणि तुझ्या त्या हरामी प्रियकराला.... 
आणि लक्षात ठेव, मी तुला काहीच नाही दिलं, कधीच नाही... ते देऊही नाही शकत.. तुझ्यात आहे ते सगळं.... तुझ्यात जे दिसलं ते फक्त शब्दात दिल मी तुला.... 
लय बेक्कार.. वाईट .. 
इतकं सिरियस कुणी होत का? चल स्माइल दे ती खदाखदा आणि संपव हे ... हि सिरीयस लोक कशी बोलत असतील यार एवढा वेळ... " 
आणि आम्ही दोघे एकमेकांच्या खदखदणाऱ्या हसण्याकडे पाहून विनाकारण हसू लागलो...
असेच काही क्षण खर्रच खूप सुंदर असतात ... उगाच अशा नात्याचा हेवा वाटून जातो ...
स्साला मित्र असतातच खास, हरामी, कमीने, पण सगळ्यात जास्त जीव लावणारे ! 
म्हणून गुणगुणणे माझं सार्थकी लागतं,
मी गर्वाने गुणगुणू लागते, 
"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं,
ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| "


दोस्ती आझादी हैं |

by on डिसेंबर २८, २०१८
"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं, ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| " काही क्षण कित्ती कित्ती बक्कळ सुंदर असतात म्हण...

ज जेव्हा 'जावळी' बघायला जाऊयाच.' म्हणत मित्राने आग्रह केला तेव्हा "जावळी म्हणजे नेमकं काय असतं.? हे मला ठाऊक नव्हतं, ना वेळच्या अभावी जाणून घेण्याचं कुतूहल चावळलं."
पण वेगळ्या कार्यक्रमाला जाणार म्हणून मी वेगळ्याच उत्साहात होते.
"साहित्य, कलाक्षेत्रातील कुठलाच कार्यक्रम आपल्याला काहीच देणार नाही, असं होणार नसतं, त्यामुळे अपेक्षेची निराशा इथे होत नसते, यात मला आनंद असतो."
म्हणून 'जावळी'ला जाणं स्वीकारलं आणि त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. ठराविक वेळ दवडता काही वेळातच समोर स्टेजवर या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते समोर येऊन 'जावळी'चा परिचय सांगू लागले.  मुळात त्यांच्या कंपनीने या नवख्या प्रयोगाचे आव्हान स्वीकारले ही कौतुकाची बाब, त्यापलीकडे जाऊन त्यांनी जी 'जावळी'ची ओळख करून दिली, त्यातून 'यशोदा'ला बघण्याचं आणि हे नेमकं आहे तरी काय? हे कुतूहल मनाच्या गडबडीत खूप उफाळून आलं.
जावळीचा थोडक्यात परिचय त्यांनी दिला तो असा;
देवदासी स्त्रियांनी सुरु केलेली हि नृत्यापरंपरा... जावळी...
जावळी म्हणजे केरळ किंबहुना दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक नृत्यांपैकी एक. तेथील प्रादेशिक भाषेतून त्या काळातील संस्कृती, समाज, प्रेम आणि शृंगार रसाची भावना अर्पण करणारी ही रचना. मुरुगा किंवा कृष्णासारख्या देवतांना आणि कधीकधी संरक्षणासाठीदेखील हे नृत्य समर्पित केले जात असे. देवदासींनी सुरु केलेली हि नृत्यपरंपरा म्हणजे नृत्यांचा पाया होती. परंतु कालांतराने ब्रिटिशांनी  देवदासींना 'वेश्यांचा' दर्जा दिल्यामुळे ही कलाही लोकांनी तुच्छ समजण्यास सुरुवात केली. त्यामुळे 'या अशा नृत्यप्रकाराला मी येणं, का त्याचा आस्वाद घेणं हे मला आता आवडू लागलं.'
आता मनात अनेक प्रश्न उभे राहिले, म्हणजे प्रत्यक्षात जावळी म्हणजे तमाशासारखं काही असणार का? मग हा प्रकार तिथल्या लोकांचा आपल्याला काय उमजणार तो,? मग यात शास्त्रीय नृत्यप्रकाराचा टच असेल का ? असे अनेक प्रश्न समोर आले.
आणि त्यातच समोर 'यशोदा' आली.
स्टेजवरच्या त्या एका लाईटीच्या प्रकाशात तिचा शृंगार आणि त्यात नटलेली ती सुंदर फ्रेमिंग होती. तिच्या शरीरयष्टीत 'मला इथे बसलेल्या प्रत्येकाला जावळी समजवायची आहे, त्यांच्यापर्यत पोहोचवायची आहे.' हे ठासून दिसत होतं.

जावळी बघताना, या नृत्यप्रकारात एक सामर्थ्य जाणवते कि,  'एक भावना त्या मनाच्या डोहातील प्रत्येक काठाने अनुभवावी आणि ती कशी व्यक्त करावी, ती व्यक्त करण्याची ताकद जावळीत आहे.  त्याचबरोबर, डोळ्यांतील हालचाली, त्यातली चुळबुळ आणि सगळ्याच ठिकाणी प्रियकराला बघण्याची कंठी आलेली आस....' या प्रेमयातना, प्रेमकंठी भावना हे सगळं अगदीच तंतोतंत त्या नजरेच्या बाहुल्यांतून प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांनाही स्वप्रेमाच्या भावनेत सामावून घेणं हे मुख्य असतं. किती सुंदर संकल्पना आहे कि, माझ्या प्रेमाचा इजहार, माझं प्रेम मी उघडउघडपणे आलेल्या प्रत्येकाला सांगून ते साजरं करू शकते. जावळी ही मुळातच कमी लोकांसाठी सादर केली जात असे. आजही ५०-६० (त्या मानाने बरेच प्रेक्षक) लोकांच्या प्रतिसादात जावळी सादर झाली. त्यामुळे याला 'मेजवानी' असेही संबोधतात. मेजवानी या शब्दाचा उगम हा 'मेजवाण' या शब्दापासून झाला. मेजवान म्हणजे यजमान (किंवा त्या काळातील जमीनदार). या नृत्यप्रकारात जमीनदार घरी जेवणासाठी आलेल्या पाहुण्यांना देवदासी स्त्रियांकडून 'जावळी'ची मेजवानी देत असे.   
हा नृत्याचा प्रकार असला तरी या नृत्यप्रकारातून नृत्यांगना बहुअंशी अभिनयाला जोडली जाते.
यात मुख्यत्वे जावळी, पदम आणि वर्णम असे प्रकार असतात.
हे सगळं वर्णन आणि माहिती केवळ एका कुचिपुडी आणि देवदासी नृत्यांगना 'यशोदा राव ठाकूर' हिला बघून सुचत जाते.
कारण मुळात हा नृत्यप्रकार इतका कमी आणि काळाच्या गतीत दुर्मिळ होत गेल्यामुळे हे नृत्य युट्युबसारख्या ठिकाणी दुर्मिळ एखाददोन चित्रफितींतून रंगवलेलं त्यामुळे 'जावळीसारखे' प्रयोग बघणे डोळ्याला, डोक्याला आणि मनाला एक चवदार खुराक असतो.
सादर नृत्यकलेतील जावळीची थीम प्रामुख्याने 'श्रृंगारावर आणि प्रेमावर' आधारित होती. त्यामुळे माझ्या मनाला अजूनच ताजेतवाने करण्याची क्षमता मला त्यात जाणवत होती.
मला समजलेल्या या नृत्यात यशोदा ठाकोर यांनी प्रेमातील अनेक अवस्थांचे प्रत्येक वेगळ्या लकबीने सादरीकरण केले आहे.
त्यातील स्वीय-  या पहिल्या प्रकारात यशोदा तिच्या हातवारे आणि नजरेतून सांगते कि, एक विवाहित स्त्री आहे, जिच्याकरिता तिचा चंद्रही आणि तिचं आकाशही तिचा पतीच आहे. तिचा स्वर्ग तोच आहे. ती पूर्णपणे त्याला कमिटेड आहे.  - अशी स्त्री जी पतीशिवाय कुणाचाच विचार करत नाही... कारण तिची धारणा आहे कि, "तू एकटा आहेस, जो मला या जगातील सगळं देणारं आहेस..." अशा भावनेने नटलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहणारी ती स्त्री आहे.
परकीय या दुसऱ्या प्रकारात ती सांगते, हि स्त्री एक विवाहित स्त्री आहे, परंतु तिचे परपुरुषाबरोबर भावनिक संबंध आहेत. याचे वर्णन हातांच्या मुद्रांनी वर्णाताना ती सांगते कि काल हि स्त्री त्या परपुरुषाला भेटण्यास जात नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा परपुरुष तिला विचारतो कि, "काल तू मला भेटली का नाहीस? "
त्यावेळी ती म्हणते, "काल मला माझ्या लग्नाच्या पतीच्या डोळ्यात प्रेम दिसले. मग थांबले"
काहीसा असुरक्षित होत तो विचारतो " मग आज का आलीस?"
ती म्हणते, "आज त्याच मनाने आणि डोळ्यांनी तहानलेपणाने तुला एकदा बघण्याची इच्छा व्यक्त केली. मग आले"

आणि सामान्य या तिसऱ्या प्रकारात यशोदा सांगते, "एक स्त्री आहे. जी विवाहितही नाही आणि तिला प्रियकरहि नाही. ती मादक आहे, तिच्या शरीराकडे पाहून कामुक अवस्था उचंबळून येते. तिला तिच्या शरीर संपत्तीचा आणि शृंगाराचा गर्व आहे आणि त्यामुळे ती त्याच थाटात तिच्या कट्ट्यावर बसलेली असते. तिच्या त्या एका ग्राहकाची वाट पाहत. कारण ती वेश्या असते. तिचा आवडता ग्राहक आलेला नसल्यामुळे तिच्याजवळ आलेल्या दुसऱ्या ग्राहकाशी ती जो संवाद साधते तो मजेशीर आणि 'ग्राहकांतही आवडता ग्राहक असणं' हे नवखेपण देणारा आहे. ती सेक्स वर्कर....तिला तिच्या सौंदर्याचा मोरपिशी अहंकार आहे. ती तिच्या कोठीवर आलेल्या पुरुषाला म्हणते की, "तू स्वतःला माझ्या लायक समजतोस?..." यावर त्यांच्यात वाद होऊन ती त्याला काढून देते आणि तिच्या त्या एका ग्राहकाच्या प्रतीक्षेत तळमळत राहते.

चौथ्या प्रकारात यशोदा समाजवते, एक अविवाहित मुलगी आहे जिला तिच्या प्रियकराने फसवले आहे. आणि त्यामुळे ती मुलगी तिच्या प्रियकराला या नृत्यातून प्रश्न करते की,  'का?'
केवळ 'का?' या प्रश्नाचे स्वरूप ती या नृत्याचा आधार घेऊन व्यक्त करते.
तोयाचक्षी म्हणजेच पाचव्या प्रकारात ती सांगते कि, १६ वर्षाची मुलगी प्रेमात पडते. तिला प्रेम या भावनेची ओळख नसते. ती तिचं प्रेम उघडेपणाने व्यक्त करते आणि या न कळत्या वयात ती तिच्या मैत्रिणीला तिच्या प्रियकराला बोलावून आणायला सांगते.
ती म्हणते, " माझी नजर शांत होणार नाही तो समोर आल्याशिवाय... त्यामुळे तू जा आणि त्याला घेऊनच ये!"
( नृत्यांगना यशोदा ४६ वर्षाच्या आणि त्यांनी साकारलेली मुलगी हि १६ वर्षाची. त्या मुलीच्या भावना, तिचं प्रेम आणि तिचा भोळेपणा हे त्यांनी डोळ्यांनी आणि पायांतील त्या झपझप पडणाऱ्या हालचालींनी आणि पैंजनाने व्यक्त करताना समजते,
"कलेला वय कळत नसतं, तिच्यासाठी समर्पण महत्वाचं.! "

सहाव्या प्रकारात म्हणजेच जावळीच्या शेवटी गप्तुवर्स येते... यात नृत्याची रचना म्हणजेच कोरियोग्राफी ठरवलेली नसते. मनात चाललेला कल्लोळ प्रेक्षकांसमोर नृत्यकलेतून मुक्तपणे सादर करणे हा त्यातला शेवटचा प्रकार. यात लाऊड संगीत असते. ज्यात तळमळ असते. अति दुःख असते, अति प्रेम असतं,  किंवा अति हुरहुरही असते. हा प्रकार प्रामुख्याने भावना अनावर झाल्यावर त्या व्यक्त करण्यासाठी केला जातो. या प्रकारात यशोदाने तरुणवयीन मुलीची भूमिका साकारून नृत्य केले आहे, ती यातून सांगते कि, त्या रात्री त्या मुलीत आणि तिच्या प्रियकरात प्रणयक्रीडेचे काही क्षण रंगले होते. त्यात त्याने तिचे चुंबन घेऊन तिला स्पर्श केला आहे आणि तो निघून जो निघून गेला आहे तो परतलाच नाही पुन्हा... त्याची वाट बघत ती बेचैन आणि रुखरुखीत झाल्यामुळे ती पुन्हा तिच्या सखीला घडलेला प्रकार सांगते आणि त्याला बोलवायला पाठवते आहे.
असे हे जावळीचे अनेक प्रकार सादर करताना यशोदा ठाकोर कमालीच्या भिन्न व्यक्ती भासत होत्या. कारण प्रत्येक अवस्थेतील परिस्थिती हि वेगळी असल्यामुळे ते सादर करणे तेवढेच जिकिरीचे कार्य होते. परंतु त्यांचे स्वतःच्या आवडीसाठी आणि कलेसाठी असलेले समर्पण हि एवढीच गोष्ट त्यांना कळली होती. आणि ती अंगातील प्रत्येक नसेल भिनवून त्यांनी हे सादरीकरण केले होते आणि सभागृहातील प्रत्येकाला स्वतःकडे खेचून घेऊन थांबण्यास भाग पडले होते.

या सादरीकरणावरून जाणवते कि, जावळी गातांना संगीतकार लयीचे आणि वळणाचे स्वातंत्र्य अंगीकारून हि रचना करतात आणि नृत्यांगना या गीतातील शब्दांना अंतर्मनात घेऊन त्यांच्याशी आपापल्या भावनेशी एकरूप होऊन खेळतात.
यातील संगीत लाऊड म्हणजेच वरच्या पट्टीतील असते, त्यात प्रामुख्याने 'वायोलिन, मृदुंगा आणि नटुवङ्म('टाळ' सारखे एक वाद्य) या वाद्यांचा वापर केला जातो. हे संगीत आकर्षक असते त्यामुळेच यावर सादर होणारी नृत्य हि हलक्या शैलीची म्हणजेच नाजूक हातवार्यांचा वापर करून केली जातात. त्यामध्ये संगीताची भाषा हि स्थानिक लोकांची बोलीभाषा आणि वर्णन कामुक रचनेने केले जाते.

जावळीची खासियत ही असते कि, त्यात असंख्य मुद्रा असतात. पण या कलेचे वेगळेपण असे कि यातील अनेक मुद्रा ह्या नैसर्गिकरित्या त्या नृत्यांगनेच्या अंतर्मनातून येतात. उदाहरणार्थ नर्तिकेला लाजणं किंवा शृंगार करणं हे शिकावं लागत नाही...  
यशोदाने वर्णिलेली, समजवलेली आणि मला वैयक्तिकपणे आवडलेली तिची अदा म्हणजे, " नृत्यातून कामुक किंवा मादकपणा दाखवताना स्त्रियांनी लाऊड होऊन छाती बाहेर काढून त्या पद्धतीचे एक्स्प्रेशन दाखवण्यापेक्षा नजरेतून आणि शरीराच्या चालीतून लयीतून आतल्या आत मुद्रा करून तो मादकपणा दाखवावा. कारण प्रणयक्रीडा हा चारचौघांपेक्षा त्या दोघांतील संवाद आहे त्यामुळे त्याचे सादरीकरण उघड्यावर पण खाजगीत करावं कारण एखाद्या नृत्याचे सादरीकरण करताना कधीच आपण त्याचा एक भाग सादर नसतो, आपण ती परंपरा पुढे नेत असतो... त्यामुळे ती कला जबाबदारीने सादर करणं हि कलाकाराची जबाबदारी असते. " 
             आजच्या जावळीने माझ्या छंदाच्या, ज्ञानाच्या आणि प्रेमाच्या कक्षा अधिक वृंदावल्या. जावळी जितकी आवडली तितकीच समजली आणि आपलीशी वाटली. काय बघावं आणि काय स्वीकारावं यासाठी सगळंच पाहावं आणि सगळ्याच कलांचा आस्वाद घ्यावा. त्यानंतर आवडीनिवडीचा प्रश्न ठेवावा कारण आपल्या रोजच्या अनुभवण्यावर आपल्या विचारांची श्रीमंती वाढत जाते. त्यामुळे रोज काहीतरी नवं घ्यावं मनाच्या समाधानासाठी, जावळी त्यातलीच!

(जावळीची भाषा, उच्चार आणि अर्थ आणि या प्रकाराची आज समजली ती माहिती सोडून मला अतिरिक्त माहिती नसल्यामुळे या लिखाणात काही अंशी चुका असू शकतात. जाणकारांनी क्षमा करून त्या चुका दुरुस्त कराव्या, हि विनंती.)

एक गोष्ट सांगते,
एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते.
आयुष्य हैराण होतं. कारण या खामोशीमुळे कधीच त्याच्याजवळ कुणीही आलेलं नसतं, ना येणार असल्याच्या पूर्वखुणा असतात पण, ख़ुशी येते...
प्रचंड ख़ुशी येते. आयुष्य खुश राहायला लागतं. आयुष्याला माहीत असतं, खूप कमी वेळ 'ख़ुशी' माझी आहे, तरीहि आयुष्य खुशीच्या अधीन होत जात. ॲडिक्शन वाढत जातं.... 
ख़ुशी एका मिनीटाला खूपशा आत्म्यांना जिवंत करते ताकद देते, त्यांच्या कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या ओठांना खरं हसायला शिकवते... 
पण तो क्षण येतोच, ख़ुशीची वेळ संपते... तिला जायचं नसतं , मृत्यूने कवटाळलेलं असतं आणि तिच्या थांबण्यासाठी प्रार्थना करणारे हातही तिला सोडत नसतात.
'काहीतरी जादू होईल' या आशेवर आयुष्य खुशीच्या लंबी उम्रची दुवा मागतो पण आयुष्याने उशीर केलेला असतो, ख़ुशी मरते.
आणि मग मागून आवाज येतो
"बाबूमुशाय ज़िंदगी और मौत उपर वाले के हाथ है ... उसे ना तो आप बदल सकते है ना मैं ... "

अशा धाटणीतला हा 'आनंद' चित्रपट ...

आताच्या माध्यमांतून डायलॉग्जमध्ये सर्रास 'बाबूमोशाय' हे विशेषण वापरलं जातं. पण त्या बेंगॉली शब्दाचा खरा प्रवास आणि ट्रेंड 'आनंद'ने सुरु केला. विविध संस्कृतीचा गोडवा पोहोचवून, एकमेकांच्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्याची ताकद चित्रपटांमध्ये असते खरी.!
जुने चित्रपट बघताना संयम खूप असावा लागतो कारण त्यांची कथा आताच्या कथानकांसारखी (म्हणजेच आधी घटना, मग फ्लॅशबॅक आणि शेवटी ट्विस्ट) या  तीन टप्प्यात न सांगता, ती तशी हळूहळू उलगडत आणि रंगत जाणारी असते. त्यामुळे त्यासाठी 'दिग्दर्शकाच्या' कामावर विश्वास असणं फार महत्वाचं ठरतं, आपला संयम सत्कारणी लागतो.
'आनंद' हा तसा एका ओळीतील चित्रपट. थोडक्यात, चित्रपटातल्या नायकाला  'आपण मरणार असं कळतं' तेव्हा तो हे गांभीर्याने हाताळणारं आयुष्य कशा प्रकारे जगू लागतो त्याची हि कथा.
अगदी सरळ, साधा आणि अस्खलित खुश चित्रपट. ना कुठला भडक इफेक्ट, ना एक्सटेर्नल व्हीएफएक्सचा अति वापर, नाही कुठल्या पात्रांचा बळजबरीचा अभिनय. चित्रपटाचे संगीत, याबद्दल वेगळे काय सांगू चित्रपट हा १९७०चा तरीही, आजच्या तरुणाईत 'कहीं दूर जब दिन ढल जाए साँझ की दुल्हन बदन चुराए' हे गीत माहिती नसणारे अपवादच. आणि एवढ्यावर हे गाणं थांबत नाही त्याचे अनेकानेक रूपं बनत आधुनिकतेत मॅशअप बनत जातात त्यामुळे त्या गाण्याचे बोल, संगीत आणि ती धून आजही कातरवेळेत आयुष्य सुकर करण्यासाठी गुणगुणणारे असंख्य आहेत. हे त्या चित्रपटाचे यश ! 
आकर्षक गोष्ट म्हणजे अत्यंत साधं चित्रण आणि इफेक्ट्सपेक्षा चित्रपटाच्या कथेवर केलेला फोकस. त्यात पर्वणी म्हणजे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र अभिनयाची जुगलबंदी आणि गुलजार यांच्या लेखणीची भर.
खरेतर वेगळी अशी नाही पण, खूप विचारपूर्वक आणि लोकांना सामावून घेईल अशा ठेवणीतली संहिता (स्क्रिप्ट). 'गुलजार' हे अनेकांना त्यांच्या शायरीच्या किस्स्यांकरिता प्रसिद्ध वाटणारे व्यक्तिमत्व आहे, पण या चित्रपटातील त्यांचे लेखन हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक भावनेला न्याय देणारे ठरते.
चित्रपट संहितेत थोडासा बदल आणि वेगळेपण म्हणजे चित्रपटाशी जोडलं जावं म्हणून वापरलेल्या मराठी, बेंगाली आणि हिंदी या भाषेचा टच. आणि हे सगळं लेखन तेव्हा यशस्वी ठरतं जेव्हा चित्रपटासाठी अचूक पात्र पारखली जातात. आणि त्यामुळे चित्रपटातील प्रमुख आकर्षण म्हणजे डायलॉग डिलिव्हरी, ती इतकी सुरेख कि इतके दिवस शुंभ असणारा मनुष्यही शेवटात 'आनंद'च्या मृत्यूवेळी विरघळेल.
आणि हे सगळं निरीक्षण करीत करीत आपण येतो, चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात ... हा टप्पा इतका काळजातला वाटतो कि तो असा समीक्षणातून सांगण्यापेक्षा अनुभवावा इतका जिवंत आहे, इतका वैयक्तिक दुःख हलकं करणारा आहे.
आणि याच शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शकाची खरी परीक्षा असते, कारण चित्रपटाच्या शेवटात एवढी ताकद आणावी लागते कि, चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यावरही तुम्हाला प्रेक्षकांच्या मनात, चर्चेत जिवंत ठेवायचं असतं.  त्यासाठी त्या कथेचा क्रम आणि ठेवण तशी जुळवून आणायला हवी. ते या चित्रपटास काठोकाठ लागू होते.  दिवा लावायला जावा नि लाईट यावी, इतका परफेक्ट टाईमिंग/ इतका तंतोतंत शेवट दिग्दर्शक मुखर्जींनी या चित्रफितीतून गुंफला आहे.
चित्रपट डोळ्यासमोरून असा निघून जाताना दिसतो, फक्त तीन तासांची चित्रफीत असते ती. पण आपल्या आनंदाचा आणि विचारांचा 'किस्सा' बनून जाते आणि पडदा पडायच्या आतच आपण 'आनंद' व्हायला लागतो. आणि आपण स्वतःला जाणीव करून द्यायला लागतो कि, "बाबूमुशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए ... लंबी नहीं" 

बाकी काही नाही, चित्रपट पाहिल्यावर स्वतःच्या आयुष्याचं डोक्यावर असलेलं ओझं किंचितसं हलकं होऊ लागतं.

#Must_watch
#Best_composition_of_Indian_cinema



बाबूमुशाय...!

by on नोव्हेंबर २८, २०१८
एक गोष्ट सांगते, एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते. आयुष्य हैराण होतं. कारण य...


सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह... 
दूर दूरवर नजर जाता नजर कमी पडेल इतकी स्वतःतच मग्न अशी शांतता...
हळूहळू राज्य तिथे वर चांदण्यांचं येतं.
तीत हरवून जात मी स्वतःचा हात हातात घेते...
शांततेत त्या भोवतालच्या मी स्वतःशी आपसूक बोलू लागते, उगाच एखाद्या विचाराशी चाळा करू लागते.
तेव्हा, अलगद हातात घेतलेला माझा दूसरा हात मला स्पर्श करून म्हणतो , नको, शांत रहा जरावेळ . काहीच गरज नाही विचार आणण्याची. एकदम स्तब्द हो मनाच्या शांततेत, या पाण्यासारखी.
पण,
मन ते असं शांततेत शांत राहणार कसं!
हळूहळू राज्य मनाचं येऊ लागतं.
मी अडखळत स्वतःशी हसत स्वतःबरोबरचा संवाद टाळू लागते.
हळूहळू राज्य पाण्यावर येतं.
ते तिथे बसूनही माझ्यावर मोहिनी घालत शांत करते मज आतून बाहेरून...
त्याची ती मोहिनी लपेटत मी शब्द हे शोधत जाते,  प्रवास हा शब्दातून नवखणण्याचा हा असा घडत जातो...

जल ते वृंदावन मानुनी, ढीम्म होतो तो पाषाण,         
पसरत जाते काळोखाची किमया, 
उजेडास या कवेत घेते।।
.
वाऱ्याचेही रिते शहाणपण, न उरे या काळोखातही,
जादू त्याची तिथेही चाले, घेतो कुशीत वाऱ्यासही।।
.
.
न लवे पापणी माझी, उडे आकाशी माझीच स्वप्ने,
सौम्य रवीही आड जातो,
अंधाराला त्या साम्राज्य सोपवुनी।।
.
.
उरे शेवटी राज्य काळोखी, स्वप्न माझी हि स्तब्द होतात,
त्याच त्या पाषाणावर, मी ठिम्मपणे एक स्वप्न जन्मवते।।
 .
.
गडद होतो काळोखही तो, स्वप्न माझे सुरक्षित होते,
निराधार ते आजपर्यंतचे स्वप्न, ठामपणे खरे होत जाते।।
 ........................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!.......................


#कुठल्याच_शब्दाला_कुठल्याच_शैलीत_न_बांधता_सुचलं तसंच


निसर्गाचा पसारा...

by on नोव्हेंबर २७, २०१८
सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह...  दूर दूरवर नजर ज...

मी - काय बोलु? काय बोलु? ............
हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु?
हाश्ह्ह्ह....... मला काहीच समजत नव्हत. पुरती चलबिचल, धांदल,गडबड,थरथर सगळ एकदाच....
हां.....पाण्याचा घोट घेतला नि ठरवल कि हेल्लोच बोलते...तितक्यात फोन वाजला ... त्याचा फोन होता तो. ओ माय गॉड……. माझा श्वास त्या फोनवरच्या आवाजात थांबला होता.
तो – हेलो
मी - हेलो कोण ?
तो – कशी आहेस.... ?
मी मनातल्या मनात हसून म्हटलं, नशीब त्याने त्या 'कोण'चं उत्तर दिलं नाही.
मी - यावर तर बरं आहे, ठीक आहे, मस्त आहे की मग मजेत ? काय उत्तर देउ? की सरळ सरळ विचारून टाकु , का फोन केला म्हणून ........ नाही, नको ....
तो - ते जाऊदे सगळं. "मला सांग कुठे आहेस आत्ता? ?"
"हेलो?"
मी - हं..... मित्राबरोबर.....
तो - काही प्लान आहे का आजचा?
मी - नाही......
तो - मी येतोय. नेहमीच्या ठिकाणी भेट. नो एक्सक्यूझेस....बाय.
“काय पटापट बोलून गेला हा.. बस्स ? मी गारठली होते, अंगात सनसनीत झणक गेली होती. त्याच्या त्या अनपेक्षित शांत शब्दांनी. जाऊ की नको ? नाहीतर मेसेज टाकते, काम आहे आज नक्कोच भेटायला... पण भेटावसही वाटतय. आज तब्बल ४ महिन्यांनी त्याने फोन केलाय, नक्कीच काहीतरी काम असणार. सोबत नीशाही असेल ? सुंदर दिसते तशी ... दोघे सोबत छान दिसतात, नाही? ओह काम ऑन आयशा , स्टॉप थिंकिंग टू मच…….” मी स्वतःलाच समजावल.

“एनी प्रॉब्लेम?” मित्राने विचारलं.
मी - नो, नॉट ऐट ऑल...
फोन कट झाला होता. काहीच बोलली नव्हते मी, कारण आजचा हा फोन नि त्यानंतर झालेल संभाषण, आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, की आज त्याला माझी गरज आहे.
आम्ही भेटलो. तो आला. मी पाहिलं.
माहीत नाही का ? पण आज पहिल्यांदा सोबत असलेल्या मित्राला मी 'मीठी मारुन बाय' केल. तो बघतच होता. माझं मन आज चक्क शांत होत, निगरगट्ट गार. जे हृदयाचे ठोके त्याला बघून धडधडायचे ते आज जणू नव्हतेच.
शर्ट तर तोच घातलाय, पहिल्या भेटीचा. पर्फ्युर्मही तोच, स्पाइक्स, स्टॅंड कॉलर, ब्लॅक शर्ट बस्सच... याआधी तर कद्धी असं झालं नाही ..? काही हवंय का याला? ती सोबत नाही दिसतेय ... काही गडबड तर नसेल?
तो हसला. मला खोट हसावं लागलं. चार बाय सहाच्या खोलीत जितकं गुदमरत नाही, तितकी घुसमट त्या एसी गाडीत होत होती. कारण, काहीही झाल तरी 'माझ प्रेम संपलय' हे त्याला दाखवायचं होतं, आणि यावेळी ते गरजेचही होत. अवघड होत? नाही… बिलकुल नाही ... मी असे एक ना असंख्य विचार करत होते.
गाडी सुरू झाली, पण संवाद मात्र नव्हताच. नजरानजरही झाली नाही किंवा मुद्दाम टाळली त्यानेही... २० मिनिटांचा वेळ गेला.
आम्ही दोघेही शांत होतो, इतके शांत की आवाज होता, फक्त एसी नि रेडियोच्या 'आपकी मुलाक़ात'चा.
तो - गाणं बदलू..? नाहीतर तूच लावते का एखादं? असही तुला माझी प्लेलिस्ट आवडत नाही ना ....
मी - हां :) ..... ( पुन्हा एकदा मनाला समजावलं, प्रेम संपल आहे आणि ते पुन्हा होणार नाहीच , बस्स ..यापुढे काहीही विचार करायचाच नाही) या तन्द्रित अजाणतेपणी मी 'ब्रेकअप सॉँग' लावलं.
हश्ह्ह्ह्ह.... दोघांची नजरानजर झाली आणि एकदाची ती शांतता भंग झाली, आता मात्र दोघेही खळखळुन हसलो.
तो -तू केव्हापासून अशी गाणी ऐकायला लागलीस ? ' त्याने सहजच विचारल'
मी - नवाब साब, मोहब्बत क़ी थी इसलिए, मोहब्बत जी रहे थे|
अब दिल टूटा है, तो उसे भी अपने दर्द की खुशी बाटने का मौका दो||
तो - तू बिलकुल नही बदललीस |
“मी आताही शांतच होते. खरं सांगायचं, तर केव्हा एकदा बडबड करते अस झालं होतं. या शांततेची बिलकुल सवय नव्हती, ना मला ना त्याला. माझा तो थंडावा त्याला आतून खात असावा, तो तेवढा ओळखतोच ना मला ?.... नक्कीच आयशा, हा काय प्रश्न झाला?
पण मग “निशा नि माझ्यामध्ये त्याने निशाला निवडल,” माझ्यावर प्रेम होत ना? ..” तो असतानाही मी स्वतःबरोबर बोलणं अधिक पसंत करत होते ......... पण तरीही कदाचित काहीतरी वाटल असावं किंवा नाहीसुद्धा किंवा मग मी बोलावं म्हणून…म्हणूनच त्याने "लग जा गले" लावलं. माझं भयानक आवडतं गाणं.!
आता मात्र माझ्या मनातल्या आठवणी, प्रेम, एकत्र घेतलेला चहा, ज्ञानप्रबोधिनीची एसपीडीपी, डाकेची दाबेली , वडापावचा चटका, डॉमीनोझचा पिझा, ऐन पावसात छत्री नसताना उडालेली धांदल, राग, रुसवा, त्याचं मनवनं ,चीडचीड, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक आल्हाददायी क्षण यांना ओहोटीसारख उधाण आलं होतं. ४ महिन्यात सहन केलेला तो दुरावा, तो एकटेपणा त्या एका गाण्यामुळे मी पुरती विसरून गेले, स्वतःलाच मन म्हणत होतं,
"लग जा गले के फिर ये, हसीं रात हो ना हो|
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो || " गाण्याचे बोल मला बोलतं करू पाहत होते. ओठांवर शब्द इतके ऊसळुन आले होते की, कोणत्याही क्षणी तोल जाऊन बाहेर पडतील,
पण मग मनाने प्रश्न केला,
"आठवते ती रात्र.? जेव्हा तू सोबत होती. तू अडचणीत होतीस. तो ही सोबत होता. हेच गाणं बाजूला चालू होतं. तो तुझा हात धरून विचारू शकत होता की " पिल्लू काय झालयं? मला सांग बरं..... मी आहे ना सोबत ... ही अशी रुखीरखी परी छान नाही वाटत बघ...." पण तेव्हाही त्याला फोन आला. काळजी घे, म्हणून तो निघून गेला, तो गेलाच.
त्यामुळे आज तू काहीही बोलणार नाहीस हे कन्फर्म. कारण तुझं प्रेम तू मारलं आहेस, तुझ्या भावनांना तू मारलं आहेस नि ते कायमचंच.! आता कोणतीही तडजोड नाही, कारण नातं वाचवण्यासाठी जी तडजोड करत होतीस तू, ते नातंच आता राहील नाही, मग तडजोड ती कशासाठी?”
त्याने माझी तंद्री तोंडात विचारलं,
तो - आज उपवास आहे?
मी - अं...?
तो - नाही, इतकी शांत तू कधी नसतेस ना, म्हणून विचारलं.
मी - हमारे चेहरें पे तो हरदम मुस्कुराहट हुआ करती थी| शायद, हमारा वही अंदाज आपको रास नही आया ||
तो - असं तुटक का गं बोलतेयस ? बोल ना काहीतरी एकदम धाडधाड फाडफाड आधीसारखं.... तुझी ही शांतता पोखरतेय मला.
"एकदा माफ कर ना!"
मी - माफी ? कशासाठी?
तो - सगळ्याच गोष्टींसाठी.
मी - कोणत्या गोष्टी ? मला काहीच कळत नाहीए...
तो - पिल्लू, तुला सगळं कळतय. नको ना अस करुस. मला नाही ना राहता येतंय तुझ्याशिवाय....
मी - मला खरंच नाही रे कळतेय, तू कशाबद्दल माफी मागतोयस ते.
तो - बर मी काय करू म्हणजे तू आधीसारख वागशील ?... सांग ना .........
मी - अरे थांबव..... थांबव..... थांबव.... घर आलं ना माझं. चल बाय, छान वाटलं भेटून ... :)
तो - तू बदललीस.... इतकी की, तू शांत झालीयेस प्रचंड आणि मला त्रास होतोय त्याचा. कान तरसलेत गं तुझ ते "आज जाने की ज़िद ना करो " ऐकायला. आज हवं तितका वेळ थांबेल, तू जा म्हटली तरी नाही जाणार, पण तू बोल गं… मी खूप एकटा पडलोय गं..... काहीतरी तर बोल....प्रेम करतो गं मी तुझ्यावर..........
मी - "बस्सससस्स्स्स्स्स्स हां.......... यापुढे एक शब्दही नकोय मला....... नॉट ए सिंगल वर्ड ... प्रेम ? वाह बॉस.... सवयीला प्रेमाच नाव देऊन मोकळा झालास ?,ज्याला तू प्रेम म्हणतो, ती निव्वळ एक तडजोड आहे , आपल्या या सो कॉल्ड तडजोडीला कंटाळून प्रेम कधीच लुप्त झालय.. हे जे आपण भेटलोय ते काही प्रेम म्हणून नाही , मुळीच नाही. आपण भेटलोय, कारण आपल्याला एकमेकांची सवय झालीय. तुला भीती मला गमवण्याची मुळीच नाहीए, तू घाबरतोय त्यानंतर येणार्या एकटेपणाला नि तुझा तो एकटेपणाच आज माझ्यासमोर माफी मागतोय.... त्यामुळे ना....".
पुढे बोलणारच तितक्यात फोन वाजला......” हे! कैसे हो ? बहोत दिनों बाद ....? ” फोनवर बोलता बोलताच त्याला अलविदा केल नि मी निघाले.
मी शरिराने तर घरी आले होते, पण मनात विचारांनी घरच्या घर बांधली होती, आसवांची अतिवृष्टी होतानाही, का कुणास ठाऊक, पण मनाचा एक कोपरा इतका सुखावला होता की, डोक बंद होतं नि मन तूटल होतं तरीही तो आनंदित होता ...पण का ?.... .........
आता सगळच संपल होतं... हो ना?. सगळंच....
मग का ? रात्री रेडियोवर लागलेल्या ''आज जाने की ज़िद न करो '' ऐकताना मी रडले? का पुन्हा 'त्याच्या नसण्याच्या'नुसत्या कल्पनेने कोलमडले आणि याहीवेळी नेहमीसारखंच माझ्या अश्रुंचा समुद्र बघण्यासाठी ती रात्र नि तिचा काळोख होता….. तो नाहीच….!



प्रेम? सवय? तो ?

by on नोव्हेंबर २३, २०१८
मी - काय बोलु? काय बोलु? ............ हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु? हाश्ह्ह्ह....... मला...